Thursday, December 27, 2007

तातियानाची अमानुष हत्या

जीवात जीव असेपर्यंत स्वातंत्र्यासाठी प्रयत्नं करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
स्वातंत्र्याची आयती संधी चालुन आली असेल तर तिचा पुरेपूर फायदा उठवावा.
गुलामगिरीच्या काळात असहायतेचा फायदा उठवणार्‍या शक्तिंना नामोहरम करावे.
ख्रिसमसच्या दिवशी ईश्वराची प्रार्थना करण्याचे सोडुन आपल्या मुलांना "करमणुकीसाठी" प्राण्यांच्या कारागृहात (गोंडस नाव: प्राणिसंग्रहालय) नेणार्‍याबद्दल मुळीच सहानुभुती वाटण्याचे कारण नाही. निष्पाप मुलांवर बिकट प्रसंग ओढवला ही चुकही वडिलांचीच.
ख्रिसमसच्या दिवशी सॅनफ्रॅन्सिस्कोच्या प्राण्यांच्या तुरूंगात बघ्यांनी काहीतरी उपद्व्याप केले. त्याचा फायदा घेऊन स्वतःची मुक्तता करू पहाणार्‍या तातियाना वाघिणीने एकाला ठार व दोघांना जखमी केले आहे.
वन्य प्राण्यांपासून एक सुरक्षित अंतर राखायलाच हवे. त्यांनी जे क्षेत्रं आपले समजले आहे, त्याचे रक्षण करण्याची त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. तिथे अनाहुताचा शिरकाव ते सहन करू शकत नाहीत.
तातियानाने पळून जाऊ नये म्हणून तिच्या सेल भोवती एक खंदक खोदला होता तसेच खंदकाच्या बाहेर जाडजुड,उंच कुंपणही लावले होते. कोणी तरी कुंपणावर चढुन खंदकावर लोंबकळल्याचा पोलिसांचा संशय आहे. कुंपण आणि खंदकाच्यामधे एक जोडा आणि रक्तं आढळले आहे. तसेच जोड्याचे ठसे कुंपणावर आढळले आहेत. जोडे घालण्याची पद्धत एका विशिष्ट प्राण्यामधेच असल्यानी तुरुंगातील इतर कैद्यांचा या प्रकरणात हात (अथवा पाय,शिंग,शेपूट वा पंख) असण्याची शक्यता फेटाळून लावण्यात येत आहे.
तातियानाने जे केले ते सामान्य व्याघ्रं वर्तन आहे. कारगृहातील अधिकार्‍यांनी मात्रं कुठलीही चौकशी नं करता ताबडतोब तातियानाची गोळी घालुन हत्या केली. स्वतःला स्वातंत्र्यप्रेमी,बुद्धिमान,न्यायप्रेमी,नितीवान अशी अनेकानेक बिरुदे चिकटवुन घेणार्‍या मनुष्याला मात्रं हे वर्तन शोभले नाही.
वरील प्रसंगावरून आपल्या प्राणिविषयक कायद्यात काही सुधारणा सुचवाव्याशा वाटतात:
१. कधी कधी अपरिहार्य कारणामुळे काही वन्यप्राण्यांच्या पोषणाची जबाबदारी आपल्यावर येऊन पडु शकते. अशा परिस्थितीतील प्राण्यांसाठी एक सुरक्षित निवासस्थान करावे. तेथील रहिवाशांचे पोषण, आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे हे तिथल्या कर्मचार्‍यांचे एकमेव कार्य असावे.
बघ्यांनी या निवासात स्वतःच्या जोखमीवर शिरावे. तसा काही प्रसंग उद्भवलाच तर कर्मचार्‍यानी रहिवाशांना कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
२. शिक्षण, संशोधन अशा गोंडस नावाखालीही त्यांचे शोषण करू नये. प्राण्यांवर संशोधन करायचेच असेल तर त्या प्राण्याचे कल्याण हा त्यामागचा एकमेव हेतु असावा. तसेच संशोधनात प्राण्याला काडीचीही इजा होऊन नये याची दक्षता घ्यावी.

३. लहान मुलांना स्वतःचे हित कळत नाही व स्वतःची बाजु मांडता येत नाही. त्यामुळे कायद्याने त्यांना विशेष संरक्षण दिले जाते. प्राण्यांसाठीही तसेच करावे. त्यांच्या वतीने बाजु मांडतील, त्यांच्या हितासाठी जबाबदार असतील अशी माणसे नियुक्तं करावीत.
आपल्या नितीमत्तेचे वर्तुळ अधिक विस्तृत करायची वेळ आली आहे....

Wednesday, December 26, 2007

ख्रिसमस इन द आश्रम

एटमच्या आग्रहाखातर गाण्यांचे शब्द व अधिक माहिती खाली देत आहे.
टॉम प्रसाद राव यांचे ख्रिसमस इन द आश्रम ऐका:





तसेच गेल्या नाताळात बॉयमुंगुसने आमची भरपूर करमणुक केली होती ती व्हिडीओ इथे पहा:



टॉम प्रसाद राव यांची इतर गाणी ऐकण्यासाठी त्यांचे मायस्पेस पान इथे बघा
http://profile.myspace.com/index.cfm?fuseaction=user.viewprofile&friendID=123197801

ख्रिसमस इन द आश्रम:
From the west to the east
They left their homes in search of peace
A transcendental mystic yogi
Took them in, he was kind and holy

California to Bombay
They travelled far to sing and pray
But on the last week of the year
Their songs became a little weird


Chorus

Singing Om Alleluia - Hare Hare Krishna
In Excelsis Deo - Rama Bolo Rama Bolo
Gloria Gloria - Govinda Gopala
Om Noel - Jay Siya Ram
Christmas in the Ashram

The guru must be out of town
There's tinsel in Vishnu's crown
Someone hung a Christmas star
From one of Shiva's extra arms

There's egg nog in the black spice tea
Lotus petals on evergreen
Incense burners green and red
Santa hats on shaven heads

(Repeat Chorus)

They sang Gospels and Upanishads
Psalms and Vedas praising God
Maybe Christ and Krishna are amused
When humans get a little bit confused

(Repeat Chorus)



ट्वेल डेज ऑफ ख्रिसमस:

On the first day of Christmas,
my true love gave to me
A totally insufficient dowry

On the second day of Christmas,
my true love gave to me
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the third day of Christmas,
my true love gave to me
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the fourth day of Christmas,
my true love gave to me
Four Hari Krishnas..... (Is that Indian)
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the fifth day of Christmas,
my true love gave to me
Five Indian games..... (I want to be the cowboy)
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the sixth day of Christmas,
my true love gave to me
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the seventh day of Christmas,
my true love gave to me
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the eighth day of Christmas,
my true love gave to me
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the ninth day of Christmas,
my true love gave to me
Nine telemarketers..... (Good Evenin.. This is Kaalin jones. Are you waanting greater kaalrits)
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the tenth day of Christmas,
my true love gave to me
Ten-minute yoga..... (Think the lotus, feel the lotus, drive the lotus)
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the eleventh day of Christmas,
my true love gave to me
Eleven syllable name..... (PEESARAVANMUTHUDBLEEKVAAS)
Ten-minute yoga
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five Indian games
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

On the twelfth day of Christmas,
my true love gave to me...
Twelve cricket ball tamperers..... (I was simply correcting the stitching)
Eleven syllable name
Ten-minute yoga
Nine telemarketers
Eight Bollywood films
Seven-11 workers
Six IT graduates
Five minutes of fame
Four Hari Krishnas
Three butter chickens
Two nosy in-laws
And a totally insufficient dowry

कठिण शब्दं
सेवन-इलेव्हन वर्कर्स: सेवन इलेव्हन नावाची कॉफी शॉपची एक चेन आहे. बर्‍याच भारतिय लोका शाखांचे मालक आहेत.
लोटस: या नावाची एक लक्झुरी कार आहे.

सर्व प्रताधिकार व श्रेय मुळ कलाकारांचे आहे.
बॉयमुंगुसचे संकेतस्थळ व माय स्पेस पान इथे पहा:
http://www.boymongoose.com/
http://www.myspace.com/boymongoose

Friday, December 21, 2007

खुदा के लिये

शोएब मन्सूरचा "खुदा के लिये" हा पाकिस्तानी सिनेमा पुरोगामी मुस्लिमांची बाजू दाखवतो. इंग्लंड,पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि अमेरिका अशा चार देशात कथानक उलगडते. सप्टेंबर ११ च्या पार्श्वभुमीवर मुस्लिम समाजातील अंतर्गत संघर्ष,विरोधाभास व अन्यायाचे बर्‍यापैकी परिणामकारकपणे चित्रण केले आहे. या समाजाच्या अनेक ज्वलंत प्रश्नांना हात घालत एका सुसुत्रं कथेची यशस्वी मांडणी केली आहे.
नासिरुद्दिन शहाने साकारलेला कोर्टातील साक्षीचा प्रसंग लाजवाब.
सर्वात जमेची बाजु म्हणजे संगीत. अप्रतिम.

http://mastibox.com/songs/?p=/Pakistani/Khuda%20Ke%20Liye&c=10

काही ठिकाणी दिग्दर्शन व अभिनय जरा अशक्तं वाटतात, कलाकारांना पुरेसा अनुभव नसल्याचं अधुन मधुन जाणवतं. तरीही वेगळं काही तरी दाखवणारा हा चित्रंपट आवर्जुन बघावा.

Wednesday, December 19, 2007

विव्हर स्ट्रीट मार्केट

हे चित्रं पहा:
"प्लॅस्टिक पिशवी नको मला. माझी पिशवी आणली आहे बरोबर" जरा वैतागुनच किराणा दुकानातल्या कर्मचार्‍याला म्हंटले. त्याबरोबर त्याने प्लॅस्टिक पिशवीतल्या माझ्या वस्तु बाहेर काढल्या आणि प्लॅस्टिक पिशवी कचर्‍याच्या डब्यात टाकली. हसावे की रडावे आता?

दोष त्याचा नाही. वॉलमार्ट थवा त्सम (वॉअत) दुकानात आले ही माझीच चूक आहे. हल्ली खपतात म्हणून वॉअत दुकानातही ऑर्गॅनिक भाजीपाला विकला जातो. एखाद दोनच वस्तु घ्यायच्या होत्या म्हंटलं जवळच्या जवळ जाऊन याव.

शेजारच्या गिर्‍हाईकेच्या ढकलगाडीत थोड्याथोडक्या नव्हे, २०-२५ प्लॅस्टिक बॅगा. आधीच दोन-तीन आवरणात गुंडाळलेली प्रत्येक वस्तु ठेवायला आणखी भारंभार पिशव्या. दुकानात जाताना पिशवी नेण्याची तसदी घ्यावी लागत नाही या आनंदात गिर्‍हाईके. गिर्‍हाइकांच्या हातात पिशव्या नसल्याने चोरीची शक्यता कमी झाल्याच्या आनंदात वॉअत कंपन्या.

व्यापारी कंपन्या, गिर्‍हाईक, कर्मचारी, दुकानातील माल, तो पुरवठा करणार्‍या कंपन्या इ. या व्यवस्थेतील घटक हे "मी" या एकाच सूत्राने बांधलेले असतात. "आपला" हा शब्दं सगळ्यांनीच घरी ठेवलेला असतो. "तू नही तो और सही, और नही तो और सही" हा मंत्र जपत इथले सगळे व्यवहार सुरू असतात.
कमीत कमी पगारात काम करायला तयार होणार्‍यांना नोकरी देणार्‍या या कंपन्या. कुठल्या ओळीत काय आहे ह्या पलिकडे मालाविषयी काहीही ज्ञान नसलेले निरुत्साही कर्मचारी.

त्यांनी अधिक पगार मागु नये म्हणून त्यांना फारसे व्यवसायिक प्रशिक्षण नं देता सरकारी अनुदान कसे मिळवावे याचे प्रशिक्षण दिले जाते.
आपणच भरलेल्या करातुन अप्रत्यक्षितरित्या या कामगारांचे वेतन काही प्रमाणात आधीच चुकते होते याचा गंधही नसलेली गिर्‍हाइके. आत्ता मात्रं दोन डॉलर वाचल्याच्या समाधानात बाहेर पडतात.


आता हे चित्रं पहा:
कारबरो येथील व्हिव्हर स्ट्रीट मार्केट- सहकारी किराणा दुकान. कारबरोच्या जनजिवनाचा केंद्रबिंदु

बाहेरील दृष्य:
मोठा सायकल स्टँड. छोटा कार पार्किंग लॉट. बसमधुन,पायी, सायकलवर, मित्रंमैत्रिणींचा कंपु जमवुन, लेकुरवाळी, कुत्रुळवाळी अशी येणारी गिर्‍हाईके.

दुकानाच्या बाहेर मोठ्ठे अंगण. अंगणात छोटी मोठी झाडे. झाडांखाली व अंगणात टाकलेल्या टेबल खुर्च्या. आत तयार केलेले सुग्रास,ताजे, गरमागरम पदार्थ वाढुन घेऊन भोजनाचा आनंद घेणारी मंडळी.



पोराबोळं खेळतायेत, झाडावर चढतायेत, लोंबताहेत . कधी कुत्र्या, माणसांचा फ्रिस्बी चा खेळ रंगलाय. कधी संध्याकाळी एखादा ड्रम सर्कल जमलाय. नर्तक किंवा कमरेभोवती गरगर हुलाहुप फिरवणारे कलाकार त्याच्या त्यालावर फेर धरताहेत.


आतील दृष्य:
दुधाच्या, पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरायला आणायच्या. भाज्या,फळे इ प्लॅस्टिक पिशव्यांमधे नं भरता तशाच ढकलगाडीत ठेवायच्या.
प्रत्येक वस्तु वेष्टणात बांधलेली असतेच असं नाही. बल्क सेक्शनमधुन खुले तांदुळ, दाणे,बेदाणे, तिखट, हळद,ओटमिल, सिरियल इ जिन्नस घरून आणलेल्या किंवा दुकानात ठेवलेल्या वेष्टणात बांधुन घ्यायचे. तसे करताना गिर्‍हाइकाने आधी दोन काजु चाखुन पाहिले तरी हरकत नाही.

तर्‍हे-तर्‍हेची ताजी ताजी ब्रेड, केक,बिस्किटे रोज आतच तयार होतात. एकटा जीव सदाशिव असाल तर अर्धाच ब्रेड मागु शकता.
काऊंटरवरील कर्मचारी घरून आणलेल्या पिशवीसाठी ५ सेंटची का होई ना सुट देतो.
सहकारी तत्वावर चालणारे दुकान असल्याने गिर्‍हाईक तसेच कर्मचारीही बहुधा मालकच असतात. कर्मचार्‍यांना माल कुठुन आला, कसा तयार झाला याची सर्व माहिती असते. स्थानिक मालाला प्राधान्य दिले जाते.



आपली गिर्‍हाईके, आपले व्हिव्हर स्ट्रीट मार्केट, आपले कर्मचारी, आपला माल असं मानणारे घटक इथे एकत्रं आले आहेत. आपले गाव, आपला समाज, आपला निसर्ग याची काळजी घेतल्याच्या आनंदात गिर्‍हाईक बाहेर पडतात- ते पुन्हा परत येण्यासाठी.

नोंद:वरील फोटो अज्ञात छायचित्रकारांचे आहेत त्यामुळे श्रेय देता आलेले नाही.

Tuesday, December 04, 2007

नरो वा कुंजरोवा?

मैत्रिण बार्बरा हल्ली बराच काळ टांझानियात घालवते आहे.
गेल्या खेपेला भेट झाली तेव्हा तिने एक विचित्रं गोष्ट सांगितली - आफ्रिकेतील हत्ती र्‍हायनोसॉर्सवर बलात्कार करून त्यांना ठार मारताहेत. त्यानंतर काही दिवसांनी फुलफ्रेममधे बघितलेल्या एका माहितीपटातही त्याचा उल्लेख होता. एनिमल प्लॅनेटवरही ह्या विषयावर एक कार्यक्रम आला होता असे ऐकण्यात आले. कसंकायने या विषयावर अधिक माहिती संकलित करायचे ठरवले:

१९९० पासुन हत्ती अधिक आक्रमक झाल्याच्या नोंदी जगभरात सगळीकडे होत आहेत. हत्तींचा अभ्यास करणार्‍यांनी आता मानव-हत्ती संघर्ष अर्थात एका वेगळ्याच अर्थानी नरो वा कुंजरोवा या नविन विषयावर अभ्यास करायला सुरूवात केली आहे.
झारखंडमधे २००० ते २००४ या दरम्यान हत्तींनी ३०० माणसांचा बळी घेतला. २००१ नंतर आसाममधे हत्तींनी मारलेल्या माणसांची संख्या २३९ आहे. (अर्थात चवताळलेल्या माणसांनी हत्तींचा पुरेपूर बदला घेतला हे सांगणे न लगे.)

आफ्रिकेतील अनेक गावात हत्तींनी हल्ला करून ग्रामस्थांना पळता भुई थोडी केली आहे. कधी कधी हल्ले पूर्वनियोजित असतात. हत्तींनी गावाला वेढा घालुन सर्व पळवाटा बंद केल्याच्या नोंदी आहेत.(माणसाशी माणसासारखेच वागावे लागेल हे त्यांना कळले असेल का?)
या बदलत्या वर्तणुकीमागचे नक्की कारण काय असावे ते अजुन आपल्याला कळलेले नाही, कदाचित कधीच कळणार नाही. अंदाज लावणे मात्रं सहज शक्य आहे.
हत्तींचा कळप हा दाट ऋणानुबंधांनी जोडलेला एक अनुभवी समाज असतो. ह्या समाजाचे तानेबाने फार गुंतागंतीचे असतात. लहान पिल्लं ही आई, आजी, आत्या, काकुं,मोठ्या बहिणींच्या देखरेखीखाली वाढतात. ही नातीगोती आयुष्यभर - सुमारे सत्तर एक वर्षे जपली जातात. जन्मापासून आठ वर्षांचे होईपर्यंत पिलु आईला सतत बिलगलेले असते. त्यानंतर मादी पिल्लांची इतर तरूण माद्यांच्या गटात तर नर पिल्लांची तरूण नरांच्या गटात तालिम सुरू होते. वयात आल्यावर पुन्हा ते प्रौढांच्या गटात सामिल होतात.

हत्ती समाजात एक प्रगत संदेशवहन प्रक्रिया अस्तित्वात आहे. जवळच्या संदेश वहनासाठी विविध प्रकारचे आवाज, शारिरिक हालचाली- सोंड, शेपटी हालवणे, अंग घासणे इ चा उपयोग करण्यात येतो.

दूर संदेशवहनासाठी सबसॉनिक लहरींचा वापर करण्यात येतो. कित्येक मैलांवर असलेले हत्ती एकमेकांना धोक्याची सुचना, कार्यक्रमातिल बदल किंवा कुणाच्या मृत्युची वार्ता कळवु शकतात. तळव्यांच्या गुबगुबीत भागात हया लहरीं ग्रहण करण्याची क्षमता असते.
कळपातील हत्तीचा मृत्यु झाल्यावर एक आठवडाभर अंतक्रियेचा विधी चालतो. या दरम्यान शवाची सतत राखण केली जाते. मृतदेह नीट माती व फांद्यांनी झाकला जातो. त्यानंतर अनेक वर्षे समाधीस्थळाला नियमित भेट दिली जाते. या भेटी दरम्यान मृत हत्तीच्या हाडांना स्पर्ष करून अभिवादन केले जाते.

असे हे विलक्षण, सुंदर, बुद्धिमान, संवेदनक्षम हत्ती अचानक असे का वागत असावेत? उत्तर तुम्ही ओळखलं असेलच. एका विशिष्ट प्राण्याने क्षुद्र गरजा भागवण्यासाठी, मनोरंजनासाठी हत्तींना बंदीवान करणे, मारणे, जंगले नष्टं करणे सातत्याने सुरू ठेवले असल्यामुळे हत्तींच्या समाज जीवनावर दुष्परिणाम होतो आहे. वरील कारणांमुळे कळपाची वाताहात झाली की पिल्लांना प्रौढ हत्तींचे मार्गदर्शन नं मिळाल्याने त्यांच्या सामाजिक व नैतिक जाणिवा अप्रगत रहातात.

युगांडातील नॅशनल पार्कमधे अशा आक्रमक हत्तींना प्रौढ नरहत्तींमधे सोडण्यात आले. हळुह्ळु त्यांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होऊन आक्रमकपणा नाहीसा झाल्याचे लक्षात आले आहे.

तुर्तास तरी प्रश्नावर तोडगा सापडला असला तरी पुढे असे घडणार नाही याचीही शाश्वती देता येत नाही. प्राण्यांना आपल्याशी बोलता येत नाही असे आपल्याला वाटत असले तरी ते आपल्याला सतत काही तरी सांगत आहेत. आपल्याच ते ध्यानात येत नाही. हत्तींना आपला विनाश कोणाच्या हातुन होतो आहे याची जाणिव झाली असावी का? अस्तित्वासाठी लढाई लढण्याचे त्यांनी ठरवले असेल का?...नाही सांगता येत.

Thursday, November 22, 2007

खबरदार पुनर्जन्म घ्याल तर!

तिबेटमधल्या लामांनी सरकारी परवानगी शिवाय पुनर्जन्म घेऊ नये असा आदेश चिनी सरकारनी काढला आहे. आदेश हास्यास्पद वाटला तरी चिनी सरकार मात्रं या बाबतीत गंभीर आहे. खुद्द दलाई लामांनी नियुक्त केलेला पंचेन लामा सरकारनी पळवला आहे आणि त्या जागी सरकारी उमेदवार नेमला आहे.

"श्रीमंत व्हा पण स्वातंत्र्य मागु नका" हा चीनी सरकारने जनतेला दिलेला मंत्र आहे.

चीनचे कम्युनिस्ट सरकार जनतेच्या स्वातंत्र्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवते आहे यात काहीच नवल नाही. या कार्यात ते आधुनिक तंत्रज्ञानाचाही चांगलाच उपयोग करून घेतात हे ही अपेक्षितच आहे. मात्रं सिसको, याहु, गुगल,मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या पैशावर डोळा ठेवुन चीन सरकारच्या या मुस्कटदाबीत बरोबरीचे भागीदारी बनतात ही बाब फारच गंभीर आहे.

व्यक्ति स्वातंत्र्य, अभिव्यक्ति स्वातंत्र्य,लोकशाही या तत्वांवर आधारित समाजव्यवस्थेत जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या या बहुराष्ट्रिय कंपन्या ह्या तत्वांशी किमान निष्ठा राखतील अशी अपेक्षा होती.

इंटरनेटसारखे खुले माध्यम जन्माला आले तो मानवजातीच्या इतिहासातला एक महत्वाचा क्षण होता. इंटरनेट खरं तर अनेक स्वप्नं घेऊनच जन्माला आले. अख्ख्या विश्वाचे एक सपाट,इवलेसे खेडे बनवण्याचे स्वप्नं. समान संधी, समान हक्कांचे स्वप्नं. जगभरातील स्वातंत्र्य प्रेमी, समता प्रेमींच्या हातात आलेले हे एक अमुल्य शस्त्रं. या आधुनिक शस्त्रामुळे स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍यांच्या मनात एक नविन उमेद निर्माण झाली. जनमानसावर आपली हुकुमत गाजवणार्‍या जुलमी सत्तांविरुद्ध संघटित होणे, आवाज उठवणे आता सामान्यांना सहज शक्य होणार होते. चीन, उत्तर कोरिया, म्यानमार या सारख्या देशांना माहितीच्या देवाण-घेवाणीवर नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य होईल अशी स्वप्ने स्वतंत्र वृत्तीच्या लोकांना पडू लागली.


पण नाही, ते स्वप्न दिवा स्वप्नंच ठरले. उलट चीनी सरकार इंटरनेटचाच गळा दाबण्यात यशस्वी झाले. चीनची बाजारपेठ बहुराष्ट्रिय कंपन्यांना खुणावत होती. त्या मोहापायी चिनी सरकार जे म्हणेल त्याला या कंपन्यांनी होकार दिला. त्याही पुढे जाऊन, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुस्कटदाबी अधिक प्रभावशाली कशी होईल त्याचे शिक्षण या कंपन्यांनीच चिनी सरकारला द्यायला सुरूवात केली!



मायक्रोसॉफ्टच्या चिनी ब्लॉग सर्व्हिसमधे व शोधयंत्रामधे स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी ह्क्कं हे शब्द ब्लॉक केलेले आहेत. सरकारी हुकुमावरून ब्लॉगज बंद करण्याचे प्रकार सर्रास चालु आहेत.

२००५ मधे शिताओ नावाच्या एका पत्रकाराला चीनी सरकारनी शिक्षा ठोठावली. ह्या पत्रकाराच्या कारवायांची याहुने पुरवलेली माहिती त्याच्या विरुद्धचा पुरावा म्हणुन देण्यात आली.

सिसको कंपनीने चिनी सरकारला एक खास टेहळणीची यंत्रणा उभी करून दिली आहे. या यंत्रणेमुळे नागरिकांच्या इंटरनेटवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येणे सहज शक्य झाले आहे.

वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की आहे त्या तंत्रज्ञानाचा नुसता गैरवापर होतो आहे असे नाही. मुलभूत हक्कांवर गदा आणण्यासाठी जाणिवपूर्वक तंत्रज्ञान पुरवण्यात येते आहे.

जगभरातील जनजिवनावर प्रभाव टाकण्याची प्रचंड क्षमता बहुराष्ट्रिय कंपन्यांकडे आहे. त्यांची संपत्ती कित्येक छोट्या देशांच्या एकुण उत्पन्नापेक्षा जास्त आहे. दुसरीकडे चीन दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावशाली बनत चालला आहे. आफ्रिकेतल्या तेल विहीरी एका पाठोपाठ एक ताब्यात घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. अमेरिकेसारखे प्रगत देश सुदानसारख्या मानवी अधिकाराची पायमल्ली करणार्‍या देशाशी आर्थिक संबंध ठेवत नाही. परंतु चीन मात्रं कुठलाही शहानिशा नं बाळगता या देशांना तंत्रज्ञान पुरवते आहे. नायजेरियन डेल्टा व सुदान सारख्या भागांमधुन चीनची वसाहत बनते आहे. चिनी कंपन्या स्थानिक तरूणांना रोजगार नं देता चीनमधुन मनुष्यबळ आयात करत आहेत. यामुळे स्थानिक लोकांमधे बराच असंतोष आहे.


भारतात जनेतेने विरोध केल्यामुळे बरेचदा प्रकल्प रखडतात. चीनमधे तसा प्रकार नसल्याने आर्थिक प्रगतीच्या दिशेने ते भरधाव निघाले आहेत. चीन एक यशस्वी, प्रगत देश झाल्यावर ती शासन यंत्रणा आदर्श म्हणुन इतर देशात राबवली जाण्याची दाट शक्यता आहे.
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन कंपन्यांचे हितसंबंध रशियात गुंतलेले नव्हते. खुली बाजारपेठ आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेची एकमेकात सरमिसळ झाली नव्हती. ती परिस्थिती आता राहिलेले नाही. त्याचे चांगले अथवा वाईट परिणाम होऊ शकतात. चीनी सरकार देशाला हळुहळु लोकशाहीकडे नेईल ही शक्यता सद्ध्या तरी दिसत नाही. उलट ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला असेच म्हणायची परिस्थिती आत्ता तरी आहे.

न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधे नोंदणी झालेल्या चिनी कंपन्यांमधे अमेरिकन गुंतवणुकदार पैसे गुंतवत आहेत. या पार्श्वभुमीवर चिनी लोकशाही चळवळीला बाहेरच्या देशातुन पाठिंबा कितपत मिळेल ही शंकाच आहे. राज्यव्यवस्थेत अमुलाग्र बदल आणायचा म्हणजे तात्पुरती का होईना आर्थिक अस्थिरता येणारच. त्यामुळे चिनी लोकांना स्वतंत्र होऊ द्यायचे की स्वतःचे आर्थिक नुकसान करून घ्यायचे हा निर्णय करायची वेळ आल्यावर आंतर-राष्ट्रिय समुदाय लोकशाहीच्या बाजुने उभा राहु शकेल का नाही ही शंकाच आहे.
कालची आर्थिक बलस्थाने स्वातंत्र्य, मानवी हक्कं व लोकशाहींचे गोडवे गात होती. उद्याची बलस्थाने मात्रं जाचक, हुकुमशाही धार्जिणी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Thursday, November 15, 2007

पहाटेस अर्घ्य दे दोन अर्ध्या स्वरांचे

उतरवुनी ठेव गंधार अन धैवत जरासे
पहाटेस अर्घ्य दे दोन अर्ध्या स्वरांचे

पॅट मथेनींचा आणि सकाळच्या रागांचा काही एक संबंध नसावा. पण त्यांच्या कार्यक्रमात अचानक सुचलेल्या या दोन ओळी. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम फारसा आवडला नाही. गेल्या वर्षीच्या रोमांचकारी अनुभवाची आस लावुन शेवटपर्यंत ऐकला. पण अखेरपर्यंत सूर सापडला नाही. नाही म्हणायला एंतोनियो सॅंचेझने ड्रम्समधे अक्षरशः जीव ओतला.
कार्यक्रमाचं मुल्यमापन करायला वापरण्यात आलेली (अशास्त्रिय) पद्धत:
स्वरलहरींवर जीव तरंगायला लागला का?
तरंगताना तो एका अनामिक प्रदेशात भटकायला गेला का?
तिथे किती वेळ थांबला?
परतल्यानंतर काही क्षण तरी आयुष्यात सगळं भरून पावलं ही भावना मनात भरून राहिली का?
हॅंग ओव्हर किती वेळ/दिवस टिकला?

Monday, November 12, 2007

व्हेजिटेरियन थॅक्स-गिव्हिंगचे निमंत्रण व मेन्यु

भारतात दिवाळीचे दिवस सरतात, त्याच सुमाराच इथे अमेरिकेत सणासुदीचे दिवस सुरू होतात.

ऑक्टोबरच्या अखेरिस बाळ-गोपाळांचा आवडता हॅलोविन येतो.

त्यानंतर येते थॅंक्स गिव्हिंग आणि अर्थातच मग ख्रिसमस व नविन वर्षाचे स्वागत.

१६२१ साली मे फ्लॉवर या जहाजातुन आलेले यात्रेकरू व इथले स्थानिक रेड इंडियन यांनी मिळुन चांगले पीक आल्याबद्दल मेजवानीचे आयोजन केले.

त्यानंतर काही वर्षे अनियमितपणे थॅंक्स गिव्हिंग साजरे केल्या गेले. सुमारे दोनशे वर्षांनी थॅंक्स गिव्हिंगला राष्ट्रीय सण म्हणुन मान्यता मिळाली.

आजच्या काळात कुटंबातील मंडळी एकत्रं येऊन जेवणाचा आनंद घेतात. या जेवणात टर्कीचे जेवण बनवतात. त्या पाठोपाठ पम्पकिन पायचा समावेश असतो.

थॅंक्स-गिव्हिंग आणि टर्की हे आज अविभाज्य मानले जात असले तरी मूळ मेजवानीत टर्की अथवा पम्पकिन पाय या दोन्हीचा ही समावेश नव्हता. टर्की नक्की कधी पासून आणि का या सणाशी जोडली गेली याच्या बर्‍याच आख्यायिका आहेत.

स्थानिक ट्रॅंगल व्हॅजिटेरियन सोसायटीने व्हेजिटेरियन थॅंक्स गिव्हिंगचे आयोजन केले आहे. अर्थातच टर्कींचा बळी नं देता जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

यंदा या मेजवानीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळातो आहे. दुपारचे बुकिंग हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे संध्याकाळचे जास्तीचे सिटींग उघडण्याचा आयोजकांचा प्रयत्नं आहे.

अधिक माहिती, रिझर्वेशन तसेच मेनु बघण्यासाठी इथे क्लिक करा:

http://www.trianglevegsociety.org/thanksgiving07/index.html

Tuesday, November 06, 2007

मंजुसाठी मुलगा पहा.....

कुणासाठी स्थळबिळ बघण्याइतकी मॅच्युरिटी माझ्यात मुळीच नाही. त्यातुन या मनस्वी मुलीसाठी स्थळ बघायची वेळ माझ्यावर यायलाच नको होती. मंजु एका चांगल्या घरातली मुलगी आहे,म्हणजे तिच्या वागण्यावरूनच तसं लक्षात येतं. उंचीपुरी, देखणी आहे. मी तिच्या हातचा चविष्टं स्वयंपाक चाखला आहे, रांगोळ्या, मेंदीची कलाकुसरही बघितली आहे.
बडनेरा स्टेशन. रात्रीचे १२ वाजुन गेलेले. बडनेर्‍याचं एक बरं आहे. दोनच प्लॅटफॉर्म्स आहेत. एका बाजुला मुंबईहुन येणार्‍या गाड्या आणि दुसर्‍या बाजुला मुंबईला जाणार्‍या गाड्या. नाही म्हणायला तिसरा एक प्लॅटफॉर्म आहे - खास अमरावतीच्या गाडीसाठी!
स्टेशनवर जरा अंधारच होता. पोचे-पोचे पर्यंत आम्हाला उशीरच झाला होता. पुलावरून खाली गाडी उभी असलेली दिसत होती. प्लॅटफॉर्मवर आलो तर ही गाडी आमची नसल्याचं लक्षात आलं (नशीब लक्षात आलं !)
सेवाग्राम एक्स्प्रेसमधे आपला डबा कुठे येणार तो अंदाज करून त्या दिशेनी चालु लागलो. अंधारात समोर दोन-चार आकृत्या दिसल्या. चक्कं ओळखीच्या वाटणार्‍या. तेच का ते? जरा डोळे चोळल्यासारखे करून बघितले. हो. तेच ते. मंजुचे बाबा श्री शंकर पापळकर मंजुशी खाणाखुणा करून काही तरी बोलत होते. बरोबर आणखीही काही लोक होते. बापरे, म्हणजे ही सगळी मंडळी मला निरोप देण्यासाठी चक्कं वझ्झरहुन खास आली होती.
आम्हाला बघताच ही मंडळी पुढे सरसावली. मंजुच्या हातात फुलांचा गुच्छ होता, आणि बाबांच्या हातात तिचा फोटो. नमस्कार चमत्कार झाले.
मंजुशी बोलायचा मी एक केविलवाणा प्रयत्नं केला. तिची खाणाखुणांची भाषा काही मला येत नाही. मंजुच्या बाबांच्या मध्यस्थीनेच तिच्याशी संवाद साधावा लागतो. तिच्या बाबांनी आधी अक्षता टाकल्याची आणि मग विमान उडाल्याची खूण केली.
या क्षणी मंजुच्या डोक्यात भविष्याबद्दल काय काय कल्पना आहेत आणि माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत हया विचारानी खरं तर मला दडपणच आलं. पण चेहेर्‍यावर तसं नं दाखवता तिचा फोटो नीट पर्समधे ठेवला.
"ताई, इथेच याच स्टेशनवर मंजुला पहिल्यांदा घ्यायला आलो होतो मी."मंजुचे बाबा म्हणाले.
तेव्हढ्यात कोणीतरी चहा-बिहा मागवल्यामुळे विषयांतर झाले. पापळकर जरा जुन्या आठवणींमधे रमले.
"मुंबईच्या गाड्या कमी होत्या ताई आधी. तिकीटासाठी स्टेशनमास्तरच्या खोलीत जायचो आम्ही, तेव्हा प्रतिभाताई पण असायच्या लायनीत."
गाडी हलायची लक्षणे दिसु लागताच मंजुचे बाबा पुन्हा मुळ मुद्यावर आले.

"ताई, तिकडचं एखादं स्थळ बघाच मंजुसाठी. किती मोठी गोष्ट आहे ताई, तुम्हीच सांगा, किती मोठं नाव होईल आपलं! पापळकरांची मुलगी लग्नं होऊन अमेरिकेत गेली म्हणजे आज काही साधी गोष्टं नाही..."
काय बोलावे ते मला सुचेना. मी आपलं हो ला हो लावत होते.

गाडी सुटली. वरच्या बर्थवर स्थिरस्थावर झाले. डोळ्यात जबरदस्तं झोप होती. फुलांचा गुच्छ उशाशी होता. त्या गुच्छातुन अपेक्षप्रमाणे तिखाडीच्या गवताचा सुगंध येत होता. हा सुगंध माझ्या चांगला ओळखीचा आहे. हा अगदी टिपिकल वझ्झरचा वास आहे. लोक कुलदैवताला जातात तशी मी वझ्झरला पापळकरांच्या इथे जात आले आहे. अमेरिकेत येण्याच्या आधीपासुनच तिथल्या भेटी ठरलेल्या आहेत.

मंजुचे बाबा शंकर पापळकर म्हणजे काही साधीसुधी व्यक्ती नाही. आधी एक, नंतर दोन, असे करत करत थोड्या-थोडक्या नव्हे तर शहात्तर मुलांना त्यांनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक मुलाला कसले तरी शारिरिक अथवा मानसिक आव्हान आहे. काहींचा बुदध्यांक शुन्याच्या जवळपास आहे. अख्ख्या महाराष्ट्रात अपंग अनाथ मुलांसाठी असलेले हे एकमेव रिमांड होम आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन किंवा बाहेरूनही ही मुले इथे आली आहेत.
त्या प्रत्येकाची कथा त्यांचे बाबा सांगु शकतात. कोण अनाथ, कोणाला जन्मदात्यांनी कुठे टाकले, बाबांकडे ते कसे आले, कोण ब्राम्हणाचा मुलगा, कोण मुसलमान, कोण एड्सग्रस्त. बहुतेक मुले अगदी तान्ही असतानाच त्यांच्याकडे आलेली आहेत.
बाबांच्या संगोपनात लहानाचे मोठी होऊन बर्‍याच जणांनी आपले संसारही थाटले आहेत. मतिमंद मुली सुखाचा संसार करताहेत, त्यांना निरोगी मुले-बाळेही झाली आहेत.
त्या सर्व कथा सांगताना बाबांचा चेहेरा अभिमानानी फुलतो.


बाबांच्या पंखाखाली मंजु आली तेव्हा चौदा पंधरा वर्षाची होती. आल्यापासूनच तिने घरचा बराच भार उचलला आहे. आतलं बाहेरचं सगळंच बघण्याची जबाबदारी तिच्यावर असते. गेल्या दोन-तीन वर्षापासुन तिच्या लग्नाची खटपट बाबा करतायेत. मंजु अतिशय स्वाभिमानी आहे आणि आत्तापर्यंत दोन मुलांना तिने नाकारले आहे! त्यामुळे सहाजिकच बाबा जरा अस्वस्थ आहेत.

पापळकरांचे कार्य म्हणजे खरं तर आमट्यांच्या तोडीचे आहे. त्यांचा जग प्रसिद्ध होण्याचा दिवस यायचा आहे एव्हढेच. आनंदवनाचा जसा कुष्ठंरोग्यांनी कायापालट केला आहे, तसाच या परिसराचा कायापालटही या अनाथ,अपंग मतिमंद मुलांनी केला आहे. एकेकाळी उघडे-बोडके असलेले ते डोंगर आता विविध वृक्षवल्लींनी नटले आहेत.

बाबांचा स्वभाव प्रसिद्धि परांगमुख म्हणा किंवा प्रसिद्धीवर ते नियंत्रण ठेवतात म्हणा. परवानगीशिवाय आश्रमात कोणी आलेले त्यांना आवडत नाही. मुलांसाठी पाहुण्यांनी काय खाऊ आणावा हे सुद्धा एक जागरूक वडिल या नात्यानी तेच सांगतात.

त्यांच्याच इच्छेला मान देऊन इतके दिवस मी त्यांच्या विषयी लेख लिहिण्याचा मोह टाळत आले आहे. पण आता मात्रं त्यांनी माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली आहे. ती पार पाडण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे.

मंजुसाठी मुलगा पहा. फार पैसेवाला नसला तरी चालेल. होतकरू, सालस, गुणी मेहेनती हवा. अमेरिकेतच असायला हवा असं काही नाही हं...कृपया माझं एव्हढं काम करा. कोणी चांगला मुलगा लक्षात आला तर मला kasakaay@gmail.com वर जरूर कळवा.

Tuesday, October 30, 2007

प्रवासाचे क्षण

प्रवास करायचा म्हंटला की कोणाच्या अंगात उत्साह संचारतो तर काहींच्या अंगावर मात्रं काटा येतो. आता क्वचित कधीतरी प्रवास करावा लागण्याचे कारण खेदजनक असु शकते. पण बहुतेक वेळा मात्रं आपण नातलगांना/मित्रांना भेटायला, कुठल्याशा प्रसंगाला उपस्थित रहाण्यासाठी, नोकरी धंद्यानिमित्त किंवा नुसतंच भटकायला प्रवास करतो. त्यामुळे एअरपोर्टवर गेलं की सगळीकडे आनंदी वातावरण असायला हवं की नाही? पण प्रत्यक्षात मात्रं तसं अजिबातच दिसत नाही.

न्यूयॉर्कहुन न्याहारीकरून निघालेला सदु जेवणाच्या वेळेच्या आत शिकागोला पोचलेला असतो. हया प्रवासासाठी सदुने घोडागाडी किंवा आगगाडी ऐवजी विमानाचा वापर केल्याने त्याचे कितीतरी दिवस, किमान काही तास तरी नक्कीच वाचले आहेत. पण हा वेळ वाचल्याचा आनंद म्हणा किंवा कृतज्ञता म्हणा सदुच्या चेहेर्‍यावर कधीतरी दिसते का? सदुच काय, पण विमानातुन उतरलेली कोणतीही व्यक्ति बघा, जमिनीवर पाय पडताच अगदी सुसाट पळू लागते. जणु काय आत्ताच्या आत्ता बाहेर पडलं नाही तर हे मुक्कामाचं गावच नाहीसं होणार आहे. हातात धरलेली पुलमन बिचारी त्यांच्या मागे घरंगळत असते गरर्र्र गरर्र गरर्र आवाज करत.
बरं चालावं लागु नये म्हणून लांबच्या लांब वॉकवे म्हणजे सरकणारे पट्टे केलेले असतात. त्यावर तरी हसत खेळत शांततेने उभं रहावं की नाही? नाही, हे त्यावरूनही धावत जाणार. जणू काही तो वॉकवे कुठेतरी जमिनीच्या आत लुप्तं होणार आहे अगदी पुढच्या मिनिटाला.
बरं ह्यांच्याशी दोन शब्दं बोलावं म्हंटलं तर कानात बोळे घातलेले असतात - कापसाचे नाही, स्पिकरचे. गरम तेल ओतावं कानात तसं संगीत ओतणारे ते बोळे. समोरच्याचा आवाज बंद केला की त्याच्या अस्तित्वाची दखलही घेण्याची गरज नसते. त्यामुळी ही मंडळी निर्जन प्रदेशात एकटेच चालल्यासारखी शून्यात बघत चालत असतात.
कामकरी महिला कानात बोळे नं घालताही शुन्यात बघत चालतात. कडक इस्त्री केलेले बिझनेस फॉर्मल, इस्त्री केल्यासारखेच दिसणारे केस. चेहेर्‍यावर पदाच्या तोलामोलाचा मेकअपचा मुखवटा. ताठ मान, ताठ पाठ. उगाच वाकलं तर हाडबिड मोडायचं. नजर अगदी सरळ समोर. मागे धरलेल्या अगदी ताठ हातातून घासल्या जाणार्‍या सामानात ऑफिसच्या फायली आणि लॅपटॉप. "मी ऑफिसच्या कामाने जातेय ना? यावेळी मी आई नाही, बायको नाही आणि स्त्री तर नाहीच नाही. आत्ता मी आहे फक्त एक निर्विकार एक्झिक्युटिव्ह". उंच टाचांच्या चपलांच्या टॉक टॉक आवाजानेच त्यांना झपाटले असते बहुदा. टॉक टॉक टॉक गरर्र गरर्र गरर्र.. यंत्रवत चालणे सुरू.
अहो, सुट्टीला जात असाल किंवा कामानिमित्त जात असाल, जरा घडीभर तरी आस्वाद घ्याकी तुमच्या प्रवासाचा!
तिकडे सदुला घ्यायला येणार्‍याचीही अवस्था त्रिशंकुसारखी असते. पार्किंगला पैसे पडू नये म्हणुन आणि आपल्या सदूला अगदी मिनिटभरही जादा एयरपोर्टवर घालवाला लागू नये म्हणुन हा माणूस एयरपोर्टच्या प्रदक्षिणा घालत असतो.

तीन चकरा. आली का फ्लाईट? बरं अजुन चकरा मारतो.
दहा चकरा. सामान घेतलंस का? हं मं बाहेर ये, मी येतोच आणखी एक चक्कर मारून.
बरं प्रवासात कंटाळले असतील म्हणुन असे वागतात म्हणावं तर सुरूवात कशी होते पहा.
बोर्डिंग सुरू व्हायच्या आधीच गेटसमोर रांगेत उभे रहातील. अहो सीट नंबर मिळालाय ना? मग आता विमानात सर्वांच्या आधी चढलात म्हणून मुक्कामाला इतरांपेक्षा पाच दहा मिनिटं आधी पोचणार आहात की काय? आणि विशेष म्हणजे प्रवास जितका मोठा तितकी ही रांग लवकर सुरू होते. आठ-दहा तासाची फ्लाईट असली तरी त्या हवेतुन जाणार्‍या कोंडवाड्यात घुसायची यांना किती घाई. खरं म्हणजे बोर्डिंगच्या आधी सर्व प्रवाशांनी मिळून काही तरी व्यायाम करावा किंवा गाण्याच्या भेंड्या, मामाचं पत्रं हारवलं सारखे खेळ खेळावे. पण नाही. तिथे रांगेत उभे रहातील अर्धा अर्धा तास.

बरं आता मुक्कामाला जातील, छान निसर्गरम्य ठिकाणी. तिथे जाऊन तरी जीवाला शांतता लाभू देतील का? तो निसर्ग रम्य देखावा तासनतास नुसता डोळ्यात साठवावा, निसर्गाशी एकरूप व्हावं, अंतर्मुख व्ह्यावं. चिडीचुप राहुन पाखरांची गाणी ऐकावी. झर्‍यात पाय सोडावेत, एखाद्या कातळावर चढुन डुलकी घ्यावी, सुरेल सोबत असल्यास हात हातात घ्यावा. वारा प्यावा, मावळत्या सूर्याला निरोप द्यावा, उगवत्या चंद्राचे चांदणे अंगावर सोसावे. त्या प्रदेशाची जमेल तितकी माहिती काढावी, तिथल्या माणसांच्या संस्कृतीविषयी जाणून घ्यावे. त्यांचे रोजचे जीवन कसे असेल ते अनुभवावे.
छे छे तसं काही होत नाही आपल्या सदुच्या बाबतीत. सदु आणि मंडळी डोंगराच्या टोकापर्यंत जातील. तिथे उभे राहुन फोटो काढतील. तेव्हढ्यात कोणी तरी विचारतं तुमच्या सगळ्यांचा एकत्रं फोटो काढु का? हो, हो छान, धन्यवाद. झालं. पुरावा मिळाला जाऊन आल्याचा. आता पुढचा पॉंईट. आलो आहोत ना इतक्या दुरून, मग सगळं बघायला नको? कुणीच नं दिलेलं टार्गेट पूर्ण करायच असतं, ते ही यशस्वीपणे.
या दृष्यापेक्षा पुढचं दृष्य जास्तं चांगलं असेल. या क्षणापेक्षा पुढचा क्षण जास्तं चांगला असेल म्हणून हा क्षण सरायला हवा. आजच्यापेक्षा उद्या जास्तं चांगला असेल. या चांगल्या उद्यासाठी आजचे बलिदान व्हायलाच हवे का?






नोंद: ते आम्ही नव्हे.

Friday, October 26, 2007

वणवा

दक्षिण कॅलिफोर्नियातील आग अजुन आटोक्यात आलेली नाही. लाखो लोक विस्थापित झाले आहेत आणि अब्जावधी डॉलरची मालमत्ता आगीत भस्मसात झाली आहे. तेथील मराठी ब्लॉग लेखक, वाचक तसेच इतर सर्व या संकटातुन सुखरूप बाहेर पडतील अशी आशा करू या.
अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही अशा आपत्तींचा सामना करणे शक्य नाही. आपण इथले कर्ते करविते नाही हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. कॅलिफोर्निया, नेवाडा, युटा, एरिझोना, कोलोरॅडो या राज्यात असलेल्या वाळवंटी प्रदेशात निसर्गाने अनेक आश्चर्यांची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. ग्रॅंड कॅनियन, ब्राईस कॅनियन या सारखी सौंदर्य स्थळे बघण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातुन आलेले प्रवासी इथल्या प्रतिकुल हवामानाचा सामना करत या स्थळांना भेटी देतात.
या भागात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे, तरीही ही आश्चर्यकारक स्थळे निर्माण होण्याला पाणीच कसे कारणिभूत आहे हे आर्चिस नॅशनल पार्क मधे दाखवण्यात येणार्‍या माहितीपटात बघायला मिळते.
आजच्या लेखाचा विषय अर्थातच पाणि नसून आग आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगींच्या मागची कारणे काय?
दगड धोंड्यांनी भरलेला वाळवंटी प्रदेश, पाण्याचा अभाव, बहुतांश खुरटी झाडे. जमिनीच्या ज्या भागात नियमितपणे थोडेसे का होईना, पाणि झिरपत असले की त्या आधारावर थोडी फार मोठी झाडे तग धरतात. वातावरणात आर्दता नसल्याने खाली पडलेली पाने, काटक्या इ. सहजा सहजी कुजत(डिकंपोज) नाहीत. उलट वाळल्यानी ती अधिकच ज्वालाग्राही बनतात.
प्रश्नं:
लाखो वर्षांपासून जर हीच परिस्थिती आहे तर हे जंगल आधीच का भस्मसात झालं नाही?
उत्तर: त्याचं कारण आहे निसर्गानी केलेली एक सोय. अशा जंगलात जेव्हा वादळ होते आणि विजा चमकतात, तेव्हा छोट्या छोट्या आगी सतत लागत असतात. एका विशिष्टं प्रकारे झाडावर वीज पडली की त्या झाडातील सर्व बाष्प एका क्षणात बाहेर पडते आणि झाडाला आग लागते. ती आग आजूबाजूला पसरते आणि त्या परिसरातील छोटी झाडे, झुडपे व इतर ज्वालग्राही पदार्थ जळून खाक होतात. मात्रं त्याच बरोबर पाऊसही पडत असल्याने आग फार मोठी होत नाही. अशा रितीने ज्वालाग्राही कचरा वरचे वर नष्टं होतो. त्याशिवाय मोठ्या झाडांमधे योग्य अंतरही राखले जाते. ही आग नेहेमीचीच असल्याने येथील जीवसृष्टी त्यापासून आपला बचाव सहज करू शकते.
प्रश्न:
मग आताच मोठी आग का लागली? तीही मनुष्य वस्तीच्या जवळच का लागली?
उत्तर:
अशा प्रतिकुल परिस्थितीत जेव्हा प्रगत माणसे तिथे रहायला आली तेव्हा जंगलातील एकुण एक झाड आपल्या उपयोगी तरी पडावे असे त्यांना वाटु लागले. त्यामुळे त्यांनी नैसर्गिकपणे लागलेल्या या आगी विझवायला सुरूवात केली. सुरवातीला त्यामागे कदाचित चांगलीच भावना असेल. वाळवंटात झाडांना आगीपासून वाचवणे म्हणजे निसर्ग संवर्धन करणे असेही बर्‍याच लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. भावना चांगल्या असल्या तरी निसर्गाच्या कामात ढवळा ढवळ करण्याचे परिणाम हानिकारकच असतात. गेल्या काही दशकात या छोट्या आगींची उपयुक्तता जंगल नियोजन करणार्‍यांच्या लक्षात आली आहे. (हल्ली जमेल तिथे मुद्दाम अशा आगी लावण्यात येत आहेत. याला प्रिस्क्राईब्ड फायर असे नाव आहे.)
पण दरम्यानच्या काळात इथे मोठमोठ्या वस्त्या उभारल्या गेल्या. विहीरी, छोटी धरणे वाढत गेली आणि शहरे वसली. कोलोरॅडो नदीवर बांधलेल्या हुवर धरणाचे पाणि आले आणि लॉस एंजिल्स, सॅन दियेगो अशी प्रचंड आकाराची शहरे तयार झाली. मनुष्य वस्तींजवळ आगी नकोत म्हणून तेथील आगी विझवण्याचे काम सातत्याने सुरू राहिले.
अशा रितीने मनुष्य वस्त्यांजवळ ज्वालाग्राही पदार्थांचा खच वाढतच गेला. एका दृष्टिने हा बॉंब बर्‍याच वर्षांपासून टिकटिक करतो आहेच. तज्ञांना ते माहिती असुनही फार काही करता येत नव्हते. त्यात कोणी नतद्रष्टं माणसांनी जोराचा वारा वहात असताना मुद्दाम तीन आगी लावल्याचा संशय आहे. आता याला काय म्हणावं?
अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस?

Wednesday, October 03, 2007

टेंप्लेट मधील बदल व टयुलिपची नाराजी इ.

मी सध्या बाहेरगावी आहे. मला इंटरनेटचा अगदी गरजेपुरताच वापर करता येतो. पण त्यातही मला काही लेखांचे प्रिंट आऊट काढायचे आहे. ते नीट यावेत म्हणुन टेंप्लॆट मधे तात्पुरते बदल केले आहेत. त्याबद्दल क्षमस्व.
ट्युलिपने माझ्या आधी वंदु आणि नंतर ...? वर नाराजी व्यक्त करणारा भला मोठा लेख प्रसिद्ध केला आहे. तो
इथे वाचा.
माझ्या लेखाची इतकी मोठी दखल घेतल्याबद्दल ट्युलिपचे आभार. टाळ्या आणि टिकांचे सारखेच स्वागत.
एक समाज म्हणुन आपण प्रश्नांना थेट हात घालणार आहोत की याला काय वाटेल, त्याला काय वाटेल असा विचार करत अस्तित्वात असलेली माहितीही दाबुन ठेवणार आहोत?
प्रश्नं तुमच्यासमोर मांडला आहे पुराव्यांसहित. आता वाईट बातमी घेऊन येणार्‍या दूताचाच शिरच्छेद करा अथवा प्रश्नं मिटवण्यासाठी प्रयत्नं करा.
तुमच्या भागातील गणेश मंडळांशी संपर्क साधा. त्यांना हे फोटो पाठबा, आपल्या उत्साहाच्या उधाणाचे काय परिणाम होतात ते त्यांना कळू द्या.
ट्युलिपला या विषयावर चर्चा करायची नाही. पण तुम्हाला करायची असेल तर जरूर इथे प्रतिक्रिया द्या.
टीप:
अश्विनी अंतिम युद्धचे पुढचे भाग प्रसिद्ध करते आहे. ते मी प्रवास संपल्यावरच इथे जोडणार आहे.

Saturday, September 22, 2007

आधी वंदु आणि नंतर?

दहा दिवस सळसळत्या उत्साहाचे, चैतन्याचे. आरास,प्रसाद,आरत्या, मिरवणुका. दहा दिवस कसे निघुन जातात कळतही नाही. लगेच येते अनंत चतुर्दशी. या दिवशी आपण आपल्या भक्तिचे,चैतन्याचे आणि मांगल्याचे सार्वजनिक विसर्जन करतो. आपल्या लाडक्या गणेशाचे पुढे काय होते?
http://www.ultrabrown.com/posts/the-battle-of-kurukshetra वरून घेतलेली ही छायाचित्रे:


आक्रमणकार्‍यांनी आपले देव भ्रष्टं केले आहेत मुर्तीभंजन केले आहे हे आपल्याला कदापिही मान्य नाही.

चित्रकार हुसेन आपल्या देवादिकांची उघडी नागडी चित्रे काढतात म्हणजे काय? हा घोर अपमान आहे...

समुद्रातुन जहाजांना जागा करून देणे म्हणजे हिंदु धर्माची अक्षम्य अवहेलना आहे....

आपण आहोत तरी कोण?

Tuesday, September 18, 2007

सतारीचा क्लास

आज सहज युट्युबवर रेंगाळताना ही व्हिडिओ सापडली:

Saturday, September 01, 2007

सलमान खान व संजयदत्त यांना झाली की नाही?

सलमान खान व संजयदत्त यांना बद्धकोष्ठं म्हणजे मराठीत कॉन्स्टिपेशन झालं आहे का?

तुरूंगात सतत येणं-जाणं असलेल्या या थोर गुन्हेगारांच्या प्रकृतीबद्दल मला जरा काळजी वाटु लागली आहे. देशवासियांना त्यांच्या दिनचर्येची माहिती क्षणोक्षणी कळवण्याचे सामाजिक कार्य आपले थोर पत्रकार रात्रंदिवस करत आहेत. या दोन गुन्हेगारांनी काय खाल्ले, रात्री झोप लागली की नाही ,भेटायला कोण सगे-सोयरे आले, त्यांनी कोणाशी हास्तांदोलन केले, कोणाला मिठी मारली अशी बहुमुल्य माहिती छापायला आपली लोकहितवादी, समाजाभिमुख व स्वतंत्र बाण्याची माध्यमे तत्पर आहेतच. परंतु या सगळ्या वर्णनात या दोन गुन्हेगारांनी शौचालयाचा वापर केल्याची बातमी काही वाचनात आली नाही (तुरूंगात ती सोय असते का हो?). त्यामुळे जरा काळजी वाटु लागली आहे. माध्यमांनी जनतेच्या उत्सुकतेची दखल घेऊन कृपया खुलासा करावा.

Wednesday, August 15, 2007

बदलत्या भाषा

मराठीवर आक्रमण होत असल्याची तक्रार बरेच वर्षांपासुन ऐकायला मिळते आहे. याला आक्रमण म्हणायचे की समृद्धतेत पडलेली भर म्हणायचे या विषयी मतभेद आहेतच.
मराठीवर इंग्रजीचाच नव्हे तर मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातुन सतत भडिमार झाल्यामुळे हिंदीचाही प्रभाव पडु लागला. नंतर संगणक आणि इंटरनेट वापरणार्‍या माझ्यासारख्यांनी इतर भाषेतील शब्दं वापरण्याबरोबर व्याकरणाचे नियमही सैल करायला सुरूवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात बारहासारखी सुविधा अस्तित्वात नसताना बर्‍याच लोकांनी रोमन लिपीत मराठी लिहायला सुरूवात केली.
हौशी ब्लॉग लेखकांनी जर नियमांची पायमल्ली केली तर ते समजण्यासारखे आहे. मात्रं काल प्रत्यक्ष
महाराष्ट्र टाईम्स मधे "इतकी सारी कठीण परिस्थिती असतानादेखील तिच्या आईने आपल्या मुलीचं म्युझिकप्रति असलेलं पॅशन तसंच राहावं याची दक्षता घेतली" असं हिंग्लिशमधुन अनुवादित केलेलं वाक्य वाचुन मलाही गरगरलं. याला अक्ष्यमं हलगर्जीपणा म्हणावे की असे वाक्प्रचार मराठीत प्रचलित झाल्याची मान्यता म्हणावे?
अर्थात बदलत्या भाषेविषयी किंवा ती नष्टं होण्याच्या मार्गावर असल्याची भिती वाटणे हे फक्तं मराठीच्याच बाबतीत घडते आहे असे ही नाही. इथे अमेरिकेत कायदेशिर अथवा बेकायदेशिर मार्गाने येणारे मेक्सिकन लोक इंग्रजी शिकत नाहीत याविषयी बहुजनांमधे बराच असंतोष दिसुन येतो. वैश्विकीकरणामुळे सर्वच भाषांचा एकमेकांवर प्रभाव पडु लागला आहे. संगणकावर टाईप करताना you चा u आणि for चा 4 होतो. हिंग्लिश, मॅंल्गिश (मॅंडेरिन आणि इंग्लिश) आणि स्पॅंगलिश (स्पॅनिश आणि इंग्लिश) अशा संकरित भाषाही नव्याने तयार होत आहेत. आपण सगळे मिळून नकळत एका जागतिक भाषेकडे वाटचाल करत आहोत का?

Wednesday, August 08, 2007

उजळो तुझा असाच मंद प्रकाश

अमेरिकन दुतावासाने डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना पुरेसे (?) उत्पन्नं नसल्याच्या कारणास्तव व्हिसा आधी नाकारला आणि मग चुक लक्षात आल्यावर ओशाळून प्रदान केल्याची बातमी कुठेतरी वाचली होती. त्यावरून अखेर त्यांचा अमेरिकेत येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे कळले होते. मात्रं प्रत्यक्षात त्यांच्या भेटीचा योग येईल अशी कल्पनाही नव्हती.
रॅले येथील निशा मिरचंदानी यांनी बाबांच्या जिवनावर "विसडम सॉंग" नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचा अमेरिकेतील प्रकाशन सोहोळा ड्युक विद्यापिठात एका छोटेखानी कार्यक्रमात पार पडला.


आपला व्यवसाय सोडून सामाजिक कार्यात उतरलेल्या निशा मिरचंदानी यांनी वेळोवेळी भारतात जाऊन बाबांच्या आणि आमटे कुटुंबाच्या सहवासात बराच काळ घालवला. त्याचेच फलित म्हणजे हे पुस्तक.

पुस्तकाचे प्रकाशन करताना लेखिका आणि डॉ. प्रकाश.


त्यानंतर आमटे कुटुंबावर केलेला माहितीपट दाखवण्यात आला कारण मुळात मितभाषी असलेल्या या दांपत्याला स्वतःविषयी बोलायला लावणे कठिणच आहे असे लेखिकेने सांगितले आणि त्याची प्रचितीही आली.

इतके मोठे काम करत असुनही अहंकाराचा लवलेश नाही. नवरा बायकोत इतके सामंजस्य की शब्दांचीही गरज पडू नये. व्यक्ति कोण आणि छाया कोण हे कळू नये इतकी एकरूपता.





छायाचित्रे नवर्‍याच्या सौजन्याने.




Tuesday, July 31, 2007

ड्युक व्हिडिओ इंस्टिट्युट - २००७

मागे फुल फ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलबद्दल लिहिलं होत ते आठवतंय का? तेव्हा ते सगळे सिनेमे बघुन आपणही असं काही तरी करून पहावं असा किडा डोक्यात वळवळला. त्या किड्याने नुसती वळवळ नं करता ड्युक विद्यापिठाच्या डॉक्युमेंटरी बनवण्याच्या कार्यशाळेत प्रवेश घेतला.

http://cds.aas.duke.edu/courses/workshops.html#video

शनिवारपासून अभ्यासक्रम सुरू झाला. ८ दिवस रोज बारा तास. अमेरिकेच्या काना-कोपर्‍यातून आलेले विद्यार्थी बघुन नामांकित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्याचा शोध लागला. पस्तीस एक विद्यार्थ्यांपैकी फक्तं ३ पुरूष आहेत हे एक उगाचच केलेले विशेष निरिक्षण!
व्हाईट बॅलंस, आयरिस, एक्स्पोजर, एफ स्टॉप, फोकस हे नवर्‍याच्या कोषातले अगम्य शब्दं आता मलाही कळु लागले आहेत. त्या सगळ्या शब्दांच्या व्याख्या इथे तुम्हाला सांगत बसत नाही. पण एका शिक्षकची टिपणी: वाईट व्हिडिओचे उदाहरण म्हणजे बाजूच्या खोलीत सुरू असलेल्या टिव्हीचा नुसता आवज ऐकून संपूर्ण कथानक कळु शकणे.

Wednesday, July 18, 2007

आतंकवाद आणि २१ वे शतक

इंग्लंडमधे झालेल्या अतिरेक्यांच्या अपयशी हल्ल्यात उच्चंशिक्षित भारतिय तरूण संशयित म्हणून पकडल्या गेले आहेत. हे वृत्त वाचुन काहींना आश्चर्य वाटलं असेल तर काहींना "बघा आम्ही म्हणत होतो ना? आता तरी जागे व्हा" असंही म्हणावसं वाटत असेल.
आत्मघातकी अतिरेकी म्हणजे "गरीब, अशिक्षित पाकिस्तानातल्या कुठल्या तरी गावातून आलेला, थोड्याश्या पैशांसाठी जीवावर उदार झालेला" ह्या प्रतिमेला आता तडा गेला आहे.
ही बाब फार गंभीर असल्याने जरा खोलात जाऊन कारणे आणि उपाय यावर विचार करायला हवा.
एकविसाव्या शतकातही मानवी समाज हिंसेने प्रश्न सोडवायचा प्रयत्नं करतो आहे. ठोशास ठोसा हा तर सध्याचा आंतरराष्ट्रिय न्याय किंवा परराष्ट्रिय धोरण झाले आहे.
दुसर्‍या महायुद्धाच्या सुरवातीला अलिप्तं राहणार्‍या अमेरिकेने पराभूत जपानला सन्मानाची वागणूक देऊन प्रचंड आर्थिक मदत देऊ केली आणि पुनर्निमाणात महत्वाचा हातभार लावला. त्याच अमेरिकेने आता मात्रं "प्रिएम्प्टिव वॉर" सुरू करून सद्दामांना फाशी देण्यापर्यंत पलटी खाल्ली आहे. अबु गरेब आणि ग्वांटानामोच्या तुरुंगातून लाजिरवाण्या छळ्वादाच्या कथा बाहेर येऊनही इंग्लंड आदि देशांनी त्यांना आंधळा पाठिंबा चालूच ठेवला आहे.
इकडे भारतात हिंदु शक्तिप्रदर्शन, राम मंदिर, गुजराथ हत्याकांड,गोध्रा, मुंबईतील स्फोट, स्वामी नारायण मंदिरावरील हल्ला, संसदेवरील हल्ला अशा घटनांनी मने दुभंगली आहेत. आपल्याच देशात पोरकेपणा आणि असहायतेने ग्रासलेल्या हिंदु आणि मुस्लिम समाजाच्या भावनांचा फायदा उठवण्यासाठी कट्टरपंथीय धार्मिक नेते, राजकारणी आणि आय एस आय तयार आहेतच.
युद्ध हा श्रीमंत देशांचा आतंकवाद आहे आणि आतंकवाद हे गरिबांचे युद्ध आहे ही गोष्टं लक्षात ठेवायला हवी. हिंसाचाराचे मूळ धैर्यामधे नसून भितीमधे असते. नष्टं होण्याची भिती माणसाला टोकाची भूमिका घ्यायला लावते. बहुतांशवेळा ती भिती अनाठायीच असते आणि ती दूर होण्यासाठी खरी धैर्याची गरज असते.
आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आजची प्रसार-माध्यमे. एकतर माध्यमे बहुतांश मॅनेज केलेली आहेत. आणि दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकण्यासाठी तत्वे सोडून पैशाच्या पाठीमागे लागलेली आहेत. प्रक्षोभक वक्त्यव्ये करणार्‍यांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी शांततामय मार्गाचा अवलंब करणार्‍यांना मिळत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना आकर्षित करण्यासाठीही हिंसाचाराचा अवलंब केला जातो.
या परिस्थितीत आपल्या मानसिकतेचा जरा विचार करू. भारतात सुरू असलेल्या मुस्लिमेतर आतंकवादाची उदाहरणे घ्या - तामिळ दहशतवाद्यांचा राजीव गांधींवर प्राणघातक हल्ला, आसाममधे प्रांतवादातून उफाळलेला हिंसाचार, तसेच इतर भागात नक्षलवाद्यांनी आणि माओवाद्यांनी केलेले हल्ले. अशा घटनांची संख्या खरे तर मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्तं आहे. पण त्या बातम्यावाचून आपल्या भावना भडकत नाहीत. प्रसारमाध्यमेही त्याचे फार भांडवल करत नाहीत. याचे कारण काय असावे? शासन, सुरक्षा यंत्रणा अथवा लष्कर या बंडाचा आज ना उद्या बिमोड करेल असा आपल्याला कुठे तरी एक विश्वास आहे. मात्रं मुसलमान भडकले तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही ही भिती हिंदूच्या मनात कायम आहे. आणि हा देश हिंदुंचा असल्याने वेळ प्रसंगी आपलेच शेजारी मित्रं आपल्यावर उलटतीत आणि सरकारही आपल्या मदतीला येणार नाही ही भावना मुसलमानांच्या मनात घर करून आहे. इतिहास आणि पूर्वग्रह भितीच्या या मानसिकतेला खतपाणी घालतातच.
ही मानसिकता सोडण्यासाठी सर्व थरावर सतत सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुसलमानांना हिंदु वस्तीत घर भाड्याने अथवा विकत मिळणे कठीण आहे. तसेच मुसलमान वस्तीत एकटे जायला हिंदु धजत नाहीत. ही परिस्थिती बदलायला हवी. जाती धर्माधारित वस्त्या हळुहळु कमी करत प्रसंगी कायद्याचा वापर करून नाहीशा कराव्यात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करण्याचे व्यासपिठ उपलब्ध असावे. अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन उभे करावे. अविश्वास, भितीची जागा विश्वास आणि धैर्याने घ्यावी. जामा मस्जिदीतील धर्मगुरूच्या व्यतिरिक्त इतर मुसलमानांची मते जाणून घ्यायचा प्रयत्नं प्रसारमाध्यमांनी करावा. पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्रं येऊन कट्टरपंथीयांना एकटे पाडावे. मवाळांनी गप्पं राहू नये.
उभयपक्षांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विषय कठीण असला तरी पेपर सोडवायलाच हवा.

Sunday, July 15, 2007

कथा एका - नव्हे दोन लग्नांची

तो: आपल्याला एका लग्नाला जायचे आहे.
ती: कुणाच्या?
तो: जेनी आणि विनोदच्या
ती: आपण मुलाकड्चे का मुलीकडचे?
तो: जेनीची आणि माझी जुनी ओळख आहे. खरं म्हणजे जेनीच्या पहिल्या लग्नालाही गेलो होतो मी. फोटोही काढले होते तेव्हा.
ती: हं....लग्नं अमेरिकन पद्धतीचे आहे की भारतिय? काय घालायचे ते ठरवावे लागेल त्याप्रमाणे.
तो: इथले लग्नं ख्रिश्चनपद्धतीचे आहे. त्यानंतर ते भारतात जाऊन वैदिक विधी करणार आहेत.
ती: अरे वा, छान.
तो: मुलाच्या घरच्यांनी दोघांची पत्रिका जुळवून बघितली आहे. त्यानुसार इथल्या लग्नाचा मुहुर्त काढला आहे म्हणे!
ती: अय्या!! मुहुर्त काढून लावलेले हे पहिलेच ख्रिश्चन लग्न असावे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार असणार आहोत!
ती: अरे पण त्या जेनीच्या पहिल्या लग्नाचे काय झाले म्हंटलंस?
तो: काय झालं माहिती नाही. खरं म्हणजे जेनीपेक्षा ल्युसीचा स्वभाव खूप छान होता
ती: आता ही ल्युसी कोण आली मधेच आणि जेनीचा आधीचा नवरा कोण?
तो: जेनीचे पहिले लग्नं ल्युसीशी झाले होते - हे बघ तुला फोटो दाखवतो त्यांचे.... पण तुझा चेहेरा असा गोरामोरा का झाला आहे? बरी आहेस ना?
ती: नाही, काही नाही - पाणी प्यायलं की जरा बरं वाटेल... अं अं ...म्ह म्ह म्हणजे जेरी साईनफिल्ड म्हणतो त्याप्रमाणे "नॉट दॅट देअर इज एनिथिंग रॉंग विथ इट."

Tuesday, July 10, 2007

सिको, लेटर्स फ्रॉम इवो जिमा आणि व्हॉट अ वे टू गो...

शुक्रवारी रात्री मायकल मूरचा "सिको" बघितला. सिनेमा फार छान आहे. अमेरिकेतल्या आरोग्यसेवेची कशी वाट लागली आहे ते बघण्यासाठी अमेरिकेत रहाणार्‍यांनी आणि येऊ पहाणार्‍यांनी हा सिनेमा जरूर बघावा.
शनिवारी सकाळी इनो रिव्हर फेस्टिवलला जायचे असे नवर्‍याने जाहीर केले. त्यासाठी तो चक्कं लवकर उठलाही. मला खरं तर सतारीची प्रॅक्टिस करायची होती विकेंडला. पण हे असे प्लॅन असल्यावर कसला रियाज अन कसलं काय! अखेर लग्नाच्या ह्या साईड इफेक्टला शरण जात मी त्याच्याबरोबर जायचे मान्य केले. (लग्नं झालेले असल्यानेच खरं तर शहिद परवेजांसारखी सतार वाजवता येत नाही!) फेस्टिवल छान होता. संध्याकाळी घरी आलो आणि लगेच आर्ट म्युझियमच्या आऊटडोर थियेटरमधे "लेटर्स फ्रॉम इवो जिमा" हा तद्दन हॉलिवुडी युद्धपट बघायला गेलो. सिनेमा (माझ्यामते) टुकार असला तरी मोकळ्या मैदानात गवतावर पसरून आरामसे लोळायला मजा आली. रात्री घरी आलो तेव्हा बारा वाजून गेले होते. "उद्याचा - खरंतर आजचा रविवार मी मला हवा तसा घालवणार" असे नवर्‍याला सांगून पलंगावर अंग टाकले.
सकाळी उठून पाहिले तरे नवर्‍याची इ-मेल होती. (हो - आम्ही घरातल्या घरात एकमेकांना इमेल पाठवतो आणि फोनही करतो). एका मित्राने "व्हॉट अ वे टू गो" नावाच्या डॉक्युमेंटरीचे स्पेशल स्क्रिनिंग असल्याची माहिती पाठवली होती. "नो वे - ओळीने दोन दिवस सिनेमे पाहिले आता तिसरा नको" असं उत्तर पाठवायचे होते, पण सिनेम्याचा विषय पाहून "मे बी" असं उत्तर पाठवलं.
नवरा उठेपर्यंत जरा सतारीच्या तारा छेडल्या. दुपारी बाहेर जाऊन बाजारहाट केला, सासू सासर्‍यांची खबरबात घेतली आणि मग आता सगळी कामं झाली असल्याने गिल्ट फॅक्टर दूर झालेले होते, त्यामुळे सिनेमा बघायला गेलो.
हा सिनेमा अजुन प्रदर्शित झालेला नाही, पण कदाचित प्रदर्शित झाला आणि तुमच्या गावात आला तर जरूर बघा. सिनेमाचा विषय आहे "Life At The End Of Empire - A middle class white guy comes to grips with Peak Oil, ClimateChange, Mass Extinction, Population Overshoot and the demise of theAmerican Lifestyle"
http://whatawaytogomovie.com/
हा सिनेमा बघण्याच्या आधीच मी अंतिम युद्ध लिहिले हे बरेच झाले. नाही तर बर्‍याचशा कल्पना माझ्या स्वतःच्या आहेत असं मला म्हणताच आलं नसतं.
हा माहितीपट फार क्लिष्टं आहे. सुरूवातीलाच तशी सुचना दाखवली आहे. वैज्ञानिक, लेखक, सामान्यं माणसं यांच्या मुलाखती आणि दिग्दर्शकाचे स्वगत या माध्यमातून आपली संस्कृती आणि पर्यावरणाचा र्‍हास याविषयी संवाद घडवून आणलेला आहे. काही काही संवाद फार परिणामकारक आहेत. उदा. सुरूवातीला पेट्रोलचे साठे संपल्यावर काय होईल याचे विदारक चित्रण केले आहे. "पण मग इतर प्रश्नं इतके गंभीर आहेत की पेट्रोलचा प्रश्नं फारच क्षुल्लक आहे असं वाटायला लागतं" दिग्दर्शक म्हणतो.
त्यानंतर लगेच एक वैज्ञानिक "ग्रीन हाऊस इफेक्टमुळे हवाच नसल्यामुळे पेट्रोल जळणारच नाही - त्यामुळे साठे आहेत की नाही हा प्रश्नंच दुय्यम ठरणार आहे" असं म्हणतो. दिग्दर्शकाचे स्वगत : "बघा - आत्ताच तुम्हाला पेट्रोलच्या साठ्यांची काळजी वाटेनाशी झाल्यमुळे जरा बरं वाटतंय ना?"
आपण सर्व मानव मिळून रोज २०० प्रजातींना अस्तंगत करत आहोत यावर एक वैज्ञानिक म्हणतो - "रहात्या घराच्या रोज २०० विटा काढल्या तर घर किती दिवस घर उभे दिसेल?"

पण या सगळ्यावर उपाय काय? दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे खरं तर काहीच उपाय नाही. असला तर एकच - सर्व भौतिक प्रगतीचा त्याग करायचा. मानव शेती करायला लागायच्या आधी ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत परत जायचे. अगदी ठरवून. लोकसंख्या आधी कमी करायची. नाहीतरी हे होणारच आहे, मग आपत्तींमुळे होण्याची वाट कशाला बघायची?

बघुन मन सुन्नं झालं. बर्‍यापैकी विवादास्पद मत आहे खरं....




Monday, July 02, 2007

पडद्यामागचे कलाकार

हरेकृष्णाजींनी गणेश मुर्ती बनवणार्‍या कारागीरांना तुमच्या समोर आणलं आहे.
त्यावरून मला काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला. इथे जवळच शहिद परवेज आणि शशांक यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम छान झाला. शहिदांची काळी भोर सतार फार देखणी दिसत होती. म्हणून कार्यक्रम संपल्यावर आवर्जुन त्यांना त्याविषयी विचारले. त्यांना आवडतो म्हणून सतारीला काळा रंग देऊन घेतल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत त्यांनी सतार गवसणीत घातल्यामुळे बनवणार्‍याचे नाव वाचता आले नाही. म्हणून सहजच सतार कोणी बनवली? हा प्रश्न विचारला. तेव्हा मात्रं त्यांनी फारच उडवा उडवीची उत्तरे दिली. "मी स्वतः मला पाहिजे तशी बनवून घेतली आहे. सतारीपेक्षा वाजवणारा महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझ्यासारखी सतार घेतली म्हणजे तुम्हाला वाजवता येईल?" वगैरे वगैरे असंबद्ध उद्गार काढले.
वाद्ये बनवणे ही एक कला आहे. सतारीसारखे नाजूक वाद्य बनवायला तर खासच कसब लागते. दर्जेदार,कसलेले लाकूड मिळवणे, योग्य आकाराचा भोपळा मिळवणे, वाद्याची जुळवाजुळव करणे, नक्षिकाम करणे, थाट बसवणे, जवारीचे काम करणे. ही सगळी कामे अत्यंत गुंतागुंतीची आहेत. सुमार दर्जाच्या सतारी बनवणारे अनेक कारागीर आहेत. पण उत्कृष्ट दर्जाच्या सतारी बनवणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत. संगीतकारांच्या असतात तशाच त्यांच्याही पिढ्यानपिढ्या या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. पडद्यामागच्या (अक्षरशः - की तारांमागच्या?) या कलाकारांना जराही श्रेय नं देता उलट खिजगणतीही नं करण हे मला फारच चुकीचे वाटते.
दिल्ली येथील रिकीराम घराण्याने रविशंकरांच्या घराण्यासाठी सतारी बनवल्या आहेत. आता रिकीराम यांचे सुपुत्रं श्री संजय रिकीराम ही परंपरा चालवतात. अनुष्का यांच्या सतारीही तेच बनवतात. माझी सतार त्यांच्याकडूनच घेतली आहे.
संजय रिकीरामांपर्यंत पोचण्याच्या आधी मला अनेक लोकांनी चुना लावला आहे. अमेरिकेतल्या पहिल्या गुरूंनी तर भरमसाठ (चार आकडी) डॉलर घेऊन अतिशय सुमार सतार मला विकली. सतार पहिल्यांदा घरी आली आणि उघडली तेव्हा तर मला रडूच कोसळायचे बाकी होते. कारण जिथे कारागीराचे नाव लिहिलेले असते ती पट्टीच गायब होती. इतके पैसे दिले आहेत तर चांगल्या नावाजलेल्या कारागीराचे नाव तिथे बघण्याची माझी अपेक्षा पार धुळीला मिळाली. ते माझे गुरू आहेत याचा जराही मुलाहिजा नं बाळगता सतार त्यांना साभार परत केली. स्वतः कलाकार असून इतका संकुचित दृष्टिकोन कसा काय असु शकतो?
शहिद परवेजांसारख्या कलाकारानी इतर कलाकारांचा आदर करावा. भारताबाहेर राहून ही कला पुढे नेऊ पहाणार्‍या माझ्यासारख्या नवशिक्या, हौशी विद्यार्थांना जमेल तितकी माहिती देऊन मार्गदर्शन करावे ही विनंती.




Tuesday, June 26, 2007

परतिबाताई राष्ट्रपती होनार?

"आवं तात्याबा कुटं गेल्ता? कवाधरून शोधू रायली तुमाले? येक टाप बातमी सांगायची व्हती - आपल्या परतिबा ताई राष्ट्रपती होते म्हंते" बायजाक्का
"बायजाक्का, ते म्या आधीच वाचलं म्हनून तर गेल्तो चौकातल्या विंटरनेट कापेमधे - म्या कांप्युटर उघडून आपल्या सद्याचे राष्ट्रपतीच र्‍हावू द्या म्हनून सांगूनशानी आलो" तात्याबा
"आता बाई! आवो, परतिबा ताई आपला इकडच्या हाये" बायजाक्का
"आसन आसन, पण त्याहीनं काय दिवे लावले आतापर्यंत? आपल्या अमरावती जिल्ल्याच्या पर्तिनिधी आसताना कधी डुंकून बी बघंनात आपल्याकडं! आपल्या शयराची, जिल्ल्याची काय बी प्रगती झाली नाई त्याईच्या टायमात."
"आवं पन सोनियाबाईनं परतिबा ताईचंच नाव फुडं केलं म्हंते ना?"
"आता बायजाक्का, येक इद्वान, पारमानिक मानूस पहिल्याच टाइमाले राष्ट्रपती झाला त्याले कायच काढाव म्हनतो मी? कलाम सायेब लई हुशार हायेत त्यायची राष्ट्रपती होन्याआधीची कामगिरीबी लई मोठी हाये. लहान-पोरासोरांना बी लई चांगला उपदेश करते ते. त्यायच्या मुळं आपल्या गावची शेंबडी पोरंसोरंबी त्याइच्यावानी थे सायंटिस का काय होतो म्हंते. परतिबा ताईची येकबी कामगिरी न्हाई."
"आवं परतिबा ताई लई भाविक हायेत - त्याईला कोन्या बाबानं सांगितलं हाये म्हने " बायजाक्का
" थोच तं फरक हाये बायजे, कलाम सायेब बाबाच्या भरोशावर सोडनार न्हाईत देशाले. आपुन सोताच हातपाय हलवा लागते."
"आवं पन आपल्या कॉंग्रेसच्या निष्ठावान उमेदवार हायेत ना वं त्या?"
"नेत्याईची निष्ठा जन्तेशी हाये का ते बघा लागते. आनीबानीच्या टाईमात परतिबा ताईनं जन्तेले दिलं लोटून आन केला खुर्चीशी लाळघोटेपना. लोकाईची इच्छा तं बगायला पाहिजे होती कॉंग्रेसनं. दुसरा उमेदार काऊनच उबा केला?"


http://timesofindia.indiatimes.com/Pratibha_claims_divine_premonition_on_greater_role/articleshow/2151402.cms

Friday, June 22, 2007

पुण्यजला गंगा

हिंदू धर्मात ज्या गोष्टी अतिशय पवित्रं मानल्या जातात त्या गोष्टींची स्वतःच अक्षम्य अवहेलना, विटबंना करायची हा आपला खाक्या आहे. पावित्र्यं आणि स्वच्छता याचा अर्थाअर्थी काही संबंध असल्याचे आपल्याला वाटत नाही. या उलट इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळी जाऊन पहा. शांतता,स्वच्छता, प्रसन्न वातावरण हे तिथे अनुभवायला मिळते.
गंगेचे उदाहरण घ्या. गंगा ही आपल्याला पूजनीय असल्यामुळे या विषयावर अनेक श्लोक आणि काव्ये रचली आहेत. गंगेच्या काठावर काय करू नये ते आपल्या पूर्वजांनी पुराणात सांगितले आहे:
गंगा पुण्यजला प्राप्य त्रयोदश विवर्जयेत।
शौचमाचमनं चैव निर्माल्यं मलघर्षणं॥
गात्रसंवाहनं क्रीडा प्रतिग्रहमथो रतिम।
अन्यतीर्थरतिं चैव अन्यतीर्थप्रशंसनम॥
वस्त्रत्यागमथाघातं सन्तारं च विषेशतः।
नाभ्यंगित प्रविशेच्च गंगाया न मलार्दित:॥
न जल्पन्न मृषा वीक्षन्न वदन्न्नृतं नर:।
स्वैर अर्थ:
पुण्यजला गंगेमधे मल-मूत्रत्याग, तोंड धुणे, दात घासणे, चुळा भरणे, निर्माल्य फेकणे, मळलेले अंग घासणे इ करू नये. स्त्री पुरूषांनी जलक्रीडा करू नये. दानाचे ग्रहण करू नये. अन्य तीर्थांची स्तुती करू नये. घातलेले कपडे गंगेत सोडू नयेत, पाण्यावर आघात करू नये तसेच पोहू नये. अंगाला तेल लावून अथवा मळलेल्या अंगानी गंगेच्या पाण्यात प्रवेश करू नये. गंगा किनार्‍यावर वृथा बडबड, खोटारडेपणा करू नये व अपदृष्टीने पाहू नये.
इतकं सगळं अगदी तपशीलात लिहिणार्‍या आपल्या पूर्वजांनी आपलं आताचं वर्तन पाहिलं तर ते काय करतील?
साबण लावून लावून कपडे धुणे,केस कापणे, मृतदेह टाकणे, शहरातील तसेच कारखान्यातील सांडपाणी सोडणे - अशी सर्व तर्‍हेनी चालेलेली ही विटबंना पाहून ते जीवच देतील (गंगेत नव्हे).
आपल्या स्वार्थासाठी धर्माचा वाट्टेल तसा अर्थ लावणारे पंडे आणि डोके नं वापरता, एकही प्रश्न नं विचारता त्यांच्यावर विश्वास ठेवणारे ते भाविक थोर आहेत!
धन्य गंगा धन्य तीचे भक्तं!


संदर्भ:


"श्री गंगाजी का दुरुपयोग":कल्याण मासिक वर्ष ८१, अंक सहा:गीताप्रेस, गोरखपुर

Wednesday, June 20, 2007

गुगल रिडर - तुमच्या आवडत्या ब्लॉग्जचा इन बॉक्स

आवडत्या ब्लॉग्जची यादी करायची आहे? तुमच्या आवडत्या ब्लॉगवर नविन लेख आला आहे का हे बघायचे आहे? गुगल रिडर वापरा.
http://www.google.com/reader/
आजकाल काही लोक ब्लॉगवर जाहीराती टाकू लागले आहेत. गुगल रिडरवर लेख वाचला की त्या जाहीरातींपासून सुटका होते. मी अशा ब्लॉगवर वेगळ्या खुणाच करून ठेवल्या आहेत.

Friday, June 15, 2007

अंतिम युद्ध:वाचकांच्या प्रतिक्रियांची उत्तरे

अंतिम युद्धाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वाचकांच्या प्रतिक्रियांमधे एक समान धागा आहे.
अश्विनी:काय गं? एकदम असा ऍब्रप्ट का शेवट केलास?बरचसं तू वाचकांच्या तरल का काय कल्पनाशक्तीवरच सोडून दिलेलं दिसतंस.पण आम्हाला थोडा एक्सप्लिसिट शेवट आवडला असता. भले अजून एक भाग का लागेना.
हरेकृष्णाजी:मधेच जरासे डोक्यावरुन जाते
हर्षद:I think you are suggesting about the problems we are facing nowadays because of pollution and all. You should go beyond it and let them show the way to save the mother Earth.

अश्विनी, शेवटाला मिळालेली नेमकी हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती.खरं म्हणजे मला इतकंही स्पेल आऊट करायचं नव्हतं. फार जड वाटतील असे लेख लिहायचे नव्ह्ते म्हणून कथेचे माध्यम निवडले. काही तरी रोमांचकारी,रहस्यमय लिहून वाचकांचे मनोरंजन करण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता. उलट वाचकांना सगळंच आवडू नये,बराचसा भाग वाचून त्यांनी बेचैन,अस्वस्थ व्हावे,विचार करावा हा खरा उद्देश होता. (कोणीतरी चांगली जळजळीत प्रतिक्रिया लिहावी ही माझी अपेक्षा मात्रं पूर्ण झाली नाही)
हरेकृष्णाजी, वाचकांच्या डोक्यावरून जाणारे काही लिहिण्याचा उद्देश नव्हता. ती माझ्या लेखनातली उणीव आहे हे मात्रं खरे.
हर्षद, भविष्यातील हे युध्द टाळण्यासाठी आपण काय करावे हा प्रश्नं महत्वाचा आहे. या विषयावरचा माझा इंग्रजी ब्लॉग वाचा: http://planetatpeace.blogspot.com/.
आपल्या विचारसरणीत अगदी मूलभूत बदल झाल्याशिवाय इतर बाह्य उपायांचा विशेष उपयोग होणार नाही. आपली आक्रमणकारी असल्यासारखी वृत्ती आधी बदलायला हवी. मानव-केंद्रितता सोडून पृथ्वी-केंद्रितता अंगिकारायला हवी. प्रगतीपेक्षा टिकणे/टिकवणे जास्तं महत्वाचे आहे.पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात अमूलाग्र बदल व्हायला हवा. प्राण्यांचा उपयोग आपल्या क्षुल्लक गरजा भागवण्यासाठी करायला नको. निसर्गाचे संतुलन राखण्याची एक मोठी जबाबदारी मानव सोडून इतर प्राणी लक्षावधी वर्षांपासून पार पाडत आले आहेत. याबाबतीत ते आपल्यापेक्षा खूप अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. या महत्वाच्या जबाबदारीतून बाहेर काढून आपल्या ताटातले,कपातले पदार्थ बनण्याचे क्षूद्रं काम त्यांना देऊ नये. आपल्या पाळीव प्राण्यांमुळे जैविक-विविधता धोक्यात आली आहे, जंगलांची प्रचंड हानी होते आहे. इतकंच काय, त्यांच्या चरण्यामुळे शेतीसाठी उपयुक्त असलेला मातीचा वरचा थर (टॉप सॉईल) ही नष्टं होतो आहे.
वनस्पतींचीही तीच अवस्था आहे. फुलांनी डवरलेल्या बागा,घरासमोरचे लॉन,फुलांच्या दुकानातले सुंदर गुच्छ इ बघून हरखून जाऊ नका. बहुदा ती फुलवण्यासाठी वापरण्यात आलेल्या किटकनाशकांनी पाणी प्रदूषित आणि जमिन निकृष्टं झाली असावी. मागच्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही विकत घेतलेल्या गुलाबाच्या गुच्छाने खोल समुद्रातले एखादे कोरेल नष्टं झाले असण्याची दाट शक्यता आहे. जिथे मानवाचा हस्तक्षेप झाला तिथे विनाश झालाच म्हणून समजा.
आपल्या साध्या जगण्याने आकाश,जमीन आणि पाणी या तत्वांचा नायनाट होतो आहे - हे जगणेच बदलले पाहिजे हे सांगण्याचा खरा उद्देश होता. केवलला जशा दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यायचा आहे तसाच आपल्यालाही घ्यायचा आहे.

Thursday, June 14, 2007

अंतिम युद्धं - भाग ८ (शेवटचा भाग)

कम्युनमधून निघून निलोने धावत पळत डॉ. लेकशॉंचे घर गाठले. काही तरी कारण काढून ती केवलला त्याच्या खोलीत घेऊन गेली. नविन सदस्य फॉर्मची मेमरी स्टिक केवला दिली.
"केवल तुझा निर्णय झाला असेल तर हा फॉर्म भरून दे मला जायच्या आधी. पण जरा सांभाळून. संध्याकाळी पार्टीच्या निमित्त्याने अनेक महत्वाच्या व्यक्ति येणार आहेत. ते कारण साधून ब्युरो ऑफ इडियटसच्या कारवाया वाढतील."
"ब्युरो ऑफ इडियटस?" केवल
"ज्याला तुम्ही ब्युरो ऑफ इंटेलिजन्स म्हणता ते." निलो "आता तुला संघटनेतले नविन वाक्प्रचार कळू लागतील."
"बरंय - मी बघतो. फार वेळ गायब होऊन चालणार नाही. खाली बरीच कामं करायची आहेत. पण आज जमलं नाही तर पुढच्या वेळेला आणू भरून?" - केवल
"नाही. ते फारच धोक्याचं आहे. तू भरणार नसलास तर मी त्यातली माहिती लगेच नष्टं करेन. नियमच आहे तसा." - निलो
"दादा, दादा, तुला बाबा बोलावतायेत ..." आंद्रेशा दारावर जोरजोरात थापा वाजवू लागली.
संध्याकाळ झाली तशी पाहुणे यायला सुरूवात झाली. शासकिय अधिकारी, अंतराळ संशोधन केंदातील शास्त्रज्ञ, संरक्षण विभागातील अधिकारी, पत्रकार, विद्यापिठातील प्रमुख मंडळी अशी दिग्गज मंडळी जमली होती. बहुतेकांच्या संभाषणात दोनच गोष्टी होत्या- डॉ. लेकशॉंचे संशोधन आणि दहशतवाद. डॉ. लेकशॉंशी प्रत्यक्ष बोलायची संधी मिळण्याची बरेच लोक वाट पहात होते. एका कोपर्‍यात मात्रं जरा वेगळ्या विषयावर चर्चा सुरू होती.
विरिता: आज दुपारपासून तुमच्या निलोने खूप मदत केली हं आम्हाला.
नि.ची आई: अहो त्यात काय, मीच सांगितलं होतं तिला तुम्हाला जरा हातभार लावायला.
दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन सलगी करणार्‍या निलो आणि केवलच्या जोडीकडे कौतुकाने बघत विरिता म्हणाली: किती भराभर मोठी होतात नाही का ही मुलं! अगदी कालची गोष्टं असल्यासारखं ह्यांचं बालपण मला आठवतं आहे.
नि.ची आई: हो ना, पण मोठे झाले की काळजी लावतात जीवाला. जीव भांड्यात पडला या दोघांची गाडी रूळावर येतेय ते बघून. तिचं ते कम्युनमधे जाणं कमी झालं तेव्हापासून एक मोठ्ठं संकट टळल्यासारखं वाटतंय मला. सुंठेवाचून खोकला गेला. कसलं गं बाई ते कम्युन! शी! -अगदी जनावरांसारखं रहाणं!
"हॅलो यंग कपल, हाऊ डू यू डू? मी कॅप्टन गोर्की!" स्वतःची ओळख करून देत कॅप्टन गोर्कींनी केवल आणि निलोशी हास्तांदोलन केले.
निलो आणि केवलने आपापली ओळख करून दिली.
"अरे वा, मग इतक्या मोठ्या शास्त्रज्ञांचे नातू म्हणजे तुमच्याकडूनही बर्‍याच अपेक्षा आहेत आमच्या..."
"आमच्या? " केवलने प्रश्नं केला.
"आमच्या म्हणजे आमच्या संरक्षण विभागाच्या! तरूणांनी चुकीच्या मार्गाला लागू नये ही आमची जबाबदारी समजतो आम्ही." कॅप्टन गोर्की.
"अरे वा - मग तुमच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे?" निलो (वरकरणी)
"हो का? इडियट भामट्या, आमचा मार्ग चुकीचा का? बघच आता." निलो (मनात)
"संरक्षण विभागाने एक कार्यशाळा आयोजित केली आहे पुढच्या महिन्यात. त्यामधे तरूणांना अतिरेकी संघटनांपासून स्वतःचे कसे संरक्षण करावे त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे." कॅप्टन गोर्की.
"अरे वा - फारच छान - आम्हाला प्लिज कळवा हं. जाऊ यात का केवल? " निलो (वरकरणी)
"शहरातल्या सगळ्या सदस्यांना घेऊन येते तुमच्या या रिक्रूटिंग ड्राईव्हमधे. करा पैसे खर्च आमच्यावर! हॅ हॅ हॅ" निलो (मनात)
"दादा दादा, आजोबा बोलावतयेत" आंद्रेशा बोलवायला आली.
"माफ करा, मी येतो हं जरा. निलो, कॅप्टन साहेबांकडून माहिती घे हं" असं म्हणत केवल मध्यभागी बसलेल्या आजोबांकडे जायला वळला.
"आणि हा माझा नातू केवल" डॉ लेकशॉं "केवल, हे माझे बालमित्रं एडमिरल बिर्मन्डी, पण मी मात्रं याला अजूनही टर्क्या म्हणूनच हाक मारतो!"
"टर्क्या, माझा हा नातू फार हुशार आहे असं मला नुकतंच कळलं आहे - बेट्याला आमच्याच विभागात विशेष प्राविण्यासहित प्रवेश मिळाला आहे. " डॉ लेकशॉं
"अरे वा - म्हणजे आजोबा आणि नातवाच्या हातात मानव जातीचं भविष्य सुरक्षित बनतं आहे! फारच छान! अशाच आदर्श तरूणांची आज आपल्याला गरज आहे. तुमचं काम हे फार महत्वाचं आहे. तुमच्या मार्गातले सर्व काटे दूर करायला संरक्षण विभाग रात्रंदिवस झटत असते." सात मजली आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत एडमिरल बिर्मन्डी म्हणाले.
"कशाला वटवट सुरू आहे याची - ही पार्टी आहे, भाषण करायची जागा नाही. संधी मिळाली की लागले कंठशोष करायला - मार्गातले काटे दूर करतो म्हणे!चढलेली दिसतेय चांगलीच" निलो (मनात)
"अतिरेकी संघटनेची आम्हाला खडानखडा माहिती आहे. योग्यवेळ आली की आम्ही त्यांचा केवळ काही दिवसात नायनाट करू. त्यावेळी मात्रं कोणाचीही गय केली जाणार नाही - मग ती व्यक्ति कितीही मोठ्या पदावर असो. मानवी प्रगतीच्या आड येणार्‍या सर्वांना नामशेष व्हावेच लागेल." सगळ्या उपस्थितांना ऐकू जाईल अशा आवाजात बिर्मन्डी गरजले.
"टर्क्या, अरे पुरे तुझे भाषण, तुझ्यावर हा विश्वास आहे म्हणून तर माझ्या नातवाने माझ्याच विषयात संशोधन करायचे ठरवले आहे. हो की नाही केवल? " खो खो हसत डॉ लेकशॉ म्हणाले.
"अर्थातच!" खिशातली मेमरी स्टिक चाचपडत केवलने एक कटाक्षं डॉ लेकशॉंकडे टाकला आणि दुसरा निलोकडे.


समाप्तं....

Wednesday, June 06, 2007

अंतिम युद्धं - भाग ७

व्याख्या:
कम्युन: सामान्य लोकांची रहाण्याची जागा. इथे प्रत्येक जोडप्याला 5x10चे एक कुपे भाड्यानी दिले जाते. अविवाहित व्यक्ती व ५ वर्षाच्या वरील मुलांना डॉर्मिटरीमधे बर्थ भाड्यानी दिले जातात. त्याशिवाय सार्वजनिक स्वयंपाकघर, करमणूक घर,वाचनालय,बाथरूम्स इ वापरायला मिळतात. कम्युनच्या आवारातच सरकारी शाळाही भरतात.

रविवार सकाळ:
निलोची लाल रंगाची गाडी तिवसा कम्युनच्या आवारात शिरली तशा अनेक नजरा तिच्याकडे वळल्या.
"कोणी तरी बडी असामी दिसतेय" बर्‍याच चेहेर्‍यांवर कुतुहल स्पष्टं दिसत होत. गाडी गेट्रियममधे शिरताच कम्युनमधल्या राफाईश आणि किरेंब्लिक या दोन भाडेकरूंच्या नेटवर्क मेसेजिंग सिस्टिममधे "नोटेबल इव्हेंट" रजिस्टर झाले.
"अरे बापरे. मेलो. ही बला आता मला पार खतम करणार की काय? आता काय हवंय हिला माझ्याकडून? माझ्या प्रेमाचा पार धुव्वा उडवलाय, पण माझा पिच्छा मात्रं सोडायला तयार नाही...." राफाईशच्या मनात विचारांचे काहूर माजले.
किरेंब्लिकनी मात्रं लगेच आपल्या पोर्टेबल ग्लोबल सर्चवर भराभर कळा दाबायला सुरूवात केली. हातात आलेली माहिती बघून तो जवळ जवळ उडालाच. आपल्या कुपेमधे जाऊन त्याने लगेच वरिष्ठांशी संपर्क साधला. "सर, वॉच ऑब्जेक्ट ६५३८ तिवसा कम्युनच्या आवारात आहे. काल रात्रंभर ऑब्जेक्ट डॉ.लेकशॉंच्या घरी होते. त्याआधी ऑबजेक्ट आणि डॉ.लेकशांचा नातू हे ४ तास ३७ मिनिटे बरोबर होते. त्यावेळच्या ट्रेसमधे काही दिसत नाहीये."
"बातमी महत्वाची आहे. डॉ. लेकशॉंच्या घरात किडे शिरायला नकोत. पण ऑबजेक्ट ६५३८ आणि डॉ. लेकशांचा नातू एकाच वर्गात शिकल्याचे दिसते आहे, वैयक्तिक ओळखीमुळे लगेच काही कारवाई करता येणार नाही. पण अधिक बारकाईने लक्षं ठेवा."
निलो गाडीतून उतरून सरळ करमणूक विभागात आली. "नॅनो स्पिटिकलवरील पर्यटन स्थळे" हया पुस्तकाची सिम्युलेशन आवृत्ती तिने वाचायला घेतली.
पुस्तकातील पहिले प्रकरण होते "क्झोटिसॉर्सच्या पाठीवरबसून ग्रेट स्पिटिकल लेक्सची सफर". ते शिर्षक वाचूनच तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. "दुष्टांनो,आता तरी ही मग्रूरी सोडा. तुमच्यापेक्षा कितीतरी गुणवान आणि बलवान आहेत ते" मनातल्या मनात चरफडत ती म्हणाली. पण वरकरणी मात्रं खळखळून हसत सफरीचा आनंद घेऊ लागली.
किरेंब्लिकनेही कुठलेसे पुस्तक घेतले आणि दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन बसला.
"मॅडम तुम्ही नविन दिसताय इथे, आधी कधी बघितलं नाही तुम्हाला" मार्दवी आवाजात एक आगंतूक व्यक्ति निलोला म्हणाली.
"नाही, मी इथे माझ्या एका मैत्रिणिला भेटायला आले आहे." निलोने उत्तर दिले.
"खूप छान पुस्तक आहे तुम्ही वाचताय ते - मी बरेचदा वाचले आहे."
"हो का? मी पहिल्यांदाच वाचते आहे. फारच छान आहे" असे ती वरकरणी आणि "दुसर्‍या कोणावर जाऊन लाईन मार" असे मनातल्या मनात म्हणाली.
तेव्हढ्यात चंद्रमेरी निलोला शोधत आली. थोडा वेळ अवांतर गप्पा केल्यानंतर चंद्रमेरीने तिच्या बॅगेतून भरतकामाचे रूमाल बाहेर काढले आणि ती निलोला प्राचिन काळातील स्त्रियांचे नक्षिकाम शिकवू लागली.
"अरेच्या तुम्हाला प्राचिन कलाकुसरीमधे रस आहे वाटतं?" आगंतूक म्हणाला. "मी सद्धा इस २००० मधले मैदानी खेळ शिकतो आहे"
"अरे वा, आमची ही कलाकुसरही साधारण त्याच काळातली आहे" चंद्रमेरी म्हणाली.
"ए चंद्रा मला तो सिंधी टाका म्हणालीस तो दाखव ना गं?" निलो म्हणाली.
"अगं बाई, मग आधी सांगायचंस नं? ते डिझाईन माझ्या कुपेमधे आहे. चल मग तिकडे जाऊ यात." चंद्रमेरी
त्याबरोबर दोघी तिथून उठल्या. त्या बाहेर पडल्या तसा किरेंब्लिकने आगंतुकाला इशारा केला. आगंतुक दोघींच्या नकळत त्यांचा पाठलाग करू लागला.
वाटेत प्रार्थनेची जागा आली. दोघी आत शिरून प्रार्थना केल्याचे नाटक करू लागल्या. तेव्हढ्यात आरती सुरू झाली.
"श्रद्धा .. हा प्रकार मला फारसा कळत नाही. ह्या श्रद्धेमुळेच लोक तर्काशी फारकत घेत असतील का? 'राजाभोवती सूर्य चंद्र तारे फिरतात' ही श्रद्धा असणार्‍यांनी 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' हे विधान करणार्‍यांना जीवे मारले. श्रद्धा आणि तर्क एकत्रं राहू शकत का? श्रद्धेने तर्कावर पडदा पडू शकतो हे लक्षात का घेत नाहीत ही मंडळी? एव्हढी कशाची प्रार्थना सुरू आहे या लोकांची? काय हवं आहे यांना? नोकरी? प्रमोशन? ऑक्सिजन? लॉंजिटिव्हिटी ड्रग? क्झोटिसॉर्सच्या पाठीवरची सफर? एखादा तरी या पृथ्वीच्या कल्याणाची प्रार्थना करत असेल का? नुसती प्रार्थना केल्याने मिळणार आहे का ते? जे हातात आहे ते सोडून नाही त्याचा ध्यास कशासाठी?..."
"राफाईशला तुझे येणे पसंत पडलेले नाही" चंद्रमेरीच्या वाक्याने निलोची विचारांची तंद्री तुटली.
"मलाही काही फार हौस नव्हती इथे येण्याची - पण कामच तितकं महत्वाचं आहे." निलोने उत्तर दिले.
चंद्रमेरी कुपेकडे जायला वळली आणि निलो तिच्या मागून चालू लागली.
चंद्रमेरीने कुपेचे दार उघडले आणि दोघी आत शिरल्या. कोपर्‍यात दडून बसलेला राफाईश बाहेर आला. एकाच वेळी राग आणि प्रेम त्याच्या मनात उफाळून आले होते.
"बोल" नजर खाली ठेवत, निलोकडे नं बघताच तो म्हणाला.
"मला निदांना भेटायचं आहे" - निलो
"क्क्काय?" - राफाईश
"होय" - निलो
"वेड-बिड लागलंय की तुला? आणि निदांना भेटायचंय तर माझ्याकडे कशाला आलीस?" राफाईश
"कारण संघटतेन माझ्या ओळखीमधे तू सर्वात वरच्या पदावर आहेस" - निलो.
"बाई गं - इथे मोठ्यापदावर असलो तरी निदांपर्यंत पोचायची माझीही ताकद नाही." राफाईश
"माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर तुलाही निदांपर्यंत पोचता येईल" - निलो.
"हे बघ - तुझे हे कसले डावपेच चालले आहेत याची मला काही कल्पना नाही. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मला निदांना भेटण्याची काहीच गरज नाही." - राफाईश
"पण मला आणि त्यांना एकमेकांना भेटायची नितांत गरज आहे" - निलो
"अच्छा? निदांना तुला भेटायची काय गरज आहे?" राफाईश
"लॉंजिटिव्हिटी ड्रगचा डोस आणि चिरनिद्रा ड्रगचा फॉर्म्युला मिळवून देणार्‍या व्यक्तिला भेटायची निदांना इच्छा असेल नाही का?" - निलो.
"काय सांगत्येस काय? हे सगळं तू बोलतेयेस ते खरं आहे का तुझं डोकं फिरलं आहे तेच मला कळत नाहीये. एकीकडे तू माझ्या प्रेमाचा त्याग केल्याने मला वेड लागायची पाळी आली आहे. पण तुझेच स्क्रू ढिले झालेले दिसतायेत. एक क्षणभर तू म्हणतेयस ते खरं असलं तरी तूच का त्यांना भेटायला हवं? " - राफाईश
"मी फार मोठी जोखीम घेऊन हे काम करणार आहे - आपल्या संघटनेसाठी, ध्येयासाठी आणि निदांसाठी. पण माहितीची गोपनियता पहाता ती मध्यस्थांच्या हातात नं पडू देण्याची अट काही फार मोठी नाही." - निलो.
"हं...आय सी..." राफाईश म्हणाला, "मी बघतो मला काय करता येईल ते. पण प्रत्यक्ष निदांना भेटण्याने तुझी जोखीम आणखिन वाढू शकते." - राफाईश
"त्याची कल्पना आहे मला. तरीही त्यांना भेटायची माझी अट आहे" - निलो
"मी निरोप पाठवतो संघटनेच्या वरिष्ठांकडे, पण खात्री कसलीच देता येणार नाही मला." राफाईश
"थॅंक्स. आणि हो - मला नविन सदस्य प्रतिज्ञा फॉर्म ही हवा आहे" - निलो.
"नविन सदस्य? हं... माझ्या प्रेमभंगाचा आणि ह्या नविन सदस्याचा काही संबंध आहे का?" राफाईश
"राफाईश... ह्या विषयावर मला बोलायचं नाही...." असं म्हणून निलो कुपेच्या बाहेर पडली.
"हे एक अतिशिष्ठं वादळ मला सारखं उध्वस्तं करून जातं..." राफाईश पुटपुटला.

Monday, June 04, 2007

युद्धं संपणार आहे. कृपया प्रतिक्रिया द्या

अंतिम युद्धं येत्या एक-दोन भागात संपणार आहे. कथा आवडणार्‍यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी नं आवडणार्‍यांनी संयम बाळ्गलेला आहे. फिक्शन लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्नं आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे. काय आवडले,काय खटकले,काय पटले नाही ते बिनधास्त लिहा.. टाळ्या अथवा टिकांचे सारखेच स्वागत.

टिप: भाग ६ च्या शेवटातील निदांचे निवेदन मनासारखे उतरले नाही. ते कधीतरी पुन्हा लिहून काढणार आहे.

लिहा...

Wednesday, May 30, 2007

अंतिम युद्धं - भाग ६

ही बघा, नॅनो स्पिटिकलवर काढलेली क्झोटिसॉर्सची व्हिडिओ पहा. घाबरू नका. दिसायला विचित्रं असलेत तरी स्वभावानी अतिशय समंजस आहेत ते. हे जे ओंगळ्वाणे दिसणारे लोंबणारे अवयव आहेत, हे त्यांचे बघण्याचे आणि ऐकण्याचे काम करणारे संयुक्त सेन्सर्स आहेत. क्झोटिसॉर्सना तीनपेक्षा जास्तं परिमिती म्हणजे डायमेंशन्स दिसू शकतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांना जे कधीच दिसू शकणार नाही अशा गोष्टी ते पाहू शकतात. तसं पाहिलं तर सर्वच अवयव आपल्यापेक्षा सरस आहेत. मेंदूचा आकार आपल्या मेंदूपेक्षा मोठा आहे. म्हणजे आपल्याहून जास्तं कॉन्व्होल्युशन्स होत असल्याने ते आपल्यापेक्षा जास्तं संवदनाक्षम आहेत. हात-पायसदृश सहा अवयव त्यांच्या शरीराच्या कुठल्याही भागातून बाहेर येऊ शकतात. आवश्यकतेप्रमाणे ते द्विपाद, त्रिपाद किंवा चतुश्पाद बनू शकतात. शेपटीसारखे जे दिसते आहे ते खरे म्हणजे त्यांचे तोंड आहे. या तोडांत लहान लहान अशा शंभर एक जीभा असतात. एक दुसर्‍याला अभिवादन करण्यासाठी किंवा नविन गोष्टं आजमावण्यासाठी या तोंडानी ते समोरच्या व्यक्तिला किंवा वस्तूला विळखे घालतात. तसे केल्याने त्या जीभांमधून मग त्यांची लाल रंगाची लाळ बाहेर पडते. क्झोटिसॉर्सचे रक्तं जर्द पिवळ्या रंगाचे असते. दूधाचा रंग निळसर असतो.
आपल्या मिशन एन एस के ३२३ च्या रोबॉटसनी काही क्झोटिसॉर्सना बंदी बनवून त्यांना ५ टिलनवीर ह्या अंतराळातील प्रयोगशाळेत आणले. त्यांचा काही दिवस अभ्यासकरून त्यांनी ट्रॅकिंग कॉलर बसवून पुन्हा नॅनो स्पिटिकलवर नेऊन सोडले. त्या प्रयोगातून मिळालेल्या माहितीने तर मी अचंबित झालो.
ह्या ग्रहावरची जीवसृष्टी आपल्यापेक्षा अतिशय वेगळी आहे. नुसती वरकरणी नाही तर अगदी अंतर्भूत फरक आहेत. क्झोटिसॉर्स आणि इतर सस्तन प्राणी हे त्रैलिंगी आहेत. म्हणजे जननासाठी त्यांना तीन क्रोमोसोमची गरज असते. स्त्री,पुरूष आणि विरूष अशी तीन लिंगे आढळतात. क्झोटिसॉर्सचे सरासरी आयुष्य ५०० नॅनो स्पिटिकल वर्षांइतके (म्हणजे पृथ्वीवरच्या ६२४२ वर्षांइतके असते). वयाच्या पंच्याहत्तर ते शंभर वर्षांत त्यांना जनन क्षमता येते. गुंतागुंतीच्या समागम प्रक्रियेतून जाऊन क्झोटिसॉर्स स्त्रीची गर्भ-धारणा होते. मातेच्या उदरात ३८ नॅ.स्पि. महिने राहून बाळाचा जन्म होतो. तिघेही पालक बाळाचे चालता येईपर्यंत संगोपन करतात. त्यानंतर बाळ कळपात सामिल होते. कुटुंबामधे पुरूष आणि विरूष यांची जोडी आधी जमते. कालांतराने त्यात स्त्रीचा समावेश होतो. त्यांनंतर तिघे आयुष्यभराचे साथीदार बनतात. तिघांपैकी किमान दोन साथीदार दोन वेगळ्या कळपातून आलेले असतात.
क्झोटिसॉर्सचे सामाजिक आयुष्य समॄद्ध आहे. १.२ मायक्रो हर्ट्झ ते ८०००० मेगा हर्ट्झ पर्यंत त्यांच्या आवाजाची रेंज आहे. त्यामुळे अंतर कळप आणि आंतर कळप संदेशवहन सहज शक्य होते. एका कळपातील सदस्यांनी दुसर्‍या कळपाला भेट दिल्याचीही उदाहरणे बघायला मिळाली आहेत. या ग्रहावर इतर मांसाहारी प्राणि असले तरी क्झोटिसॉर्स मात्रं संपूर्ण शाकाहारी आहेत.
या वर्णनावरून नॅनो स्पिटिकलवरची जीवसृष्टी किती वेगळी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. इतर प्राणि तसेच वनस्पतीही त्रैलिंगीच आहेत. आपल्या मिशन्सनी तिथे पृथ्वीवरील झाडांच्या बिया पेरून बघितल्या पण त्यातून रोपे बाहेर आली नाहीत. आपण त्या जीवसृष्टीशी सुसंगती साधून सहजीवन करणे अशक्य आहे असा स्पष्टं निष्कर्ष आमच्या संशोधनातून निघत होता. त्यामुळे नॅनो स्पिटिकलचा विचार स्थलांतरासाठी करू नये व क्रिस्टो बिटावर जीव सृष्टी नसल्याने त्यावरच लक्ष केंद्रित करावे असे आमच्या अहवालात नमूद केले. पण त्यानंतरही नॅनो स्पिटिकलवर अंतराळ मोहिमा आखल्या जाऊ लागल्या तेव्हा मी अंतराळ संरक्षण केंद्रातील तसेच इतर संबंधित विभागातील लोकांना इन्फोटेशेन्स दिले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अंतराळ संरक्षण खात्याने मला दिलेले हे ठोकळेबाज उत्तर:
"नॅनो स्पिटिकलवरच्या जीवसृष्टीत समरस होणे आपल्याला फारच आव्हानात्मक आहे. शांततेचा मार्ग अवलंबिणे हाच आमचा उद्देश आहे. परंतू मानवी जीवन हे बहुमूल्य आहे. त्यावर कोणी हल्ला केल्यास त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. आपल्या लष्करी सामर्थ्याने आपण कोठेही मानवी आयुष्याची उभारणी करू शकतो याची अंतराळ संरक्षण विभागाला पूर्ण खात्री आहे. इतर संशोधन विभागांच्या अहवालानुसार नॅनो स्पिटिकलवरवर मानवी जीवन २५००० वर्षे अधिक टिकू शकते. त्यामुळे अधिक वेळ वाया नं घालवता सर्व शक्तिनिशी नॅनो स्पिटिकल स्थलांतर मोहिमेला सुरूवात केली जाईल."
माझे मन सुन्न झाले. मानवी जीवन बहुमूल्य आहे म्हणजे काय? इतर जीवांशिवाय मानवी जीवनाची काय किंमत आहे ते आज दिसतेच आहे. त्या आश्चर्यजनक क्झोटिसॉर्सचे जीवन कमी मूल्याचे आहे काय? त्यांच्या घरात तुम्ही गेलात तर ते तुम्हाला येऊन प्रेमाने विळखा घालतील. पण त्यांची लाळ तुम्हाला विषारी आहे हा काय त्यांचा दोष? मग तुम्ही मेलात तर क्झोटिसॉर्सनी तुमच्यावर हल्ला केला असे म्हणून त्यांना मारणार? हे योग्य आहे काय? नैतिकतेमधे बसणारे आहे काय? मानवतेला धरून आहे काय?
नॅनो स्पिटिकलवरवर मानवी जीवन २५००० वर्षे अधिक टिकू शकते म्हणजे काय? एकेका ग्रहावर जायचे, तिथले कोट्यावधी वर्षांचे जीवन केवळ काही हजार वर्षात नष्टं करायचे हे तुम्हाला मान्य आहे का? अशी टोळधाड बनण्यातच तुम्ही धन्यता मानणार का?
पृथ्वी आपली माता आहे, तिला तिचे पूर्वीचे वैभव परत करायची आपल्यावर नैतिक जबाबदारी आहे. तिच्याच आश्रयात पुन्हा आपले आणि इतर प्राणिमात्रांचे पुनर्वसन करायचे माझे स्वप्नं आहे. हे स्वप्नं सत्यात उतरू शकते यावर माझा आणि माझ्या सहकार्‍यांचा पूर्ण विश्वास आहे. परंतू त्याचबरोबर अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागणार आहे....

क्रमशः

Thursday, May 24, 2007

अंतिम युद्धं - भाग ५

"हे बघा २१ व्या शतकातील एक दृष्य. निळे आकाश, हिरवी झाडे, पिवळं ऊन, पक्षी, प्राणि, समुद्रं किनारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वातावरणात असलेला प्राणवायू - ऑक्सिजन! हे सगळं जणू कायमचं असंच राहिल याच भ्रमात ही मंडळी साधन-संपदा उपभोगत राहिली. एकामागून एक प्रजाती अस्तंगत होत गेल्या पण यांनी त्याची विशेष दखल नं घेता आपली रहाणी आणि विचारसरणी तशीच कायम ठेवली. मनुष्य प्राणि हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि इतर सर्व काही त्याच्या दिमतीसाठीच निर्माण करण्यात आलं आहे अशी त्यांची ठाम समजूत होती. त्या काळातला फूड ट्रॅंगल नावाचा तक्ता याचा पुरावा देतो. त्यांची ही समजूत अगदी चुकीची आहे हे आज जरी आपल्याला माहित असले तरी त्यावेळी तसे म्हणणार्‍यांना वेड्यात काढण्यात येई.
मानवाचे सुखसोयींवरचे अवलंबित्व कायमस्वरूपी करण्यात या समाजाचा मोठा वाटा आहे.
२७०० साली समुद्रातील उरले सुरले बर्फ वितळले त्याचवेळी हिमालयातील शेवटचे ग्लॅशियरही वितळले. भारत देशात अंतर्गत यादवीला सुरूवात झाली. समुद्र किनार्‍यावरून आत स्थलांतर करणारे लोक व गंगा यमुनेच्या खोर्‍यातून तापी-नर्मदा-गोदावरीच्या-कावेरीच्या खोर्‍यात स्थलांतर करणारे लोक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात दंगली भडकू लागल्या. त्यात अपरिमित जिवीत हानी झाली. या काळात भारत देशाची लोकसंख्या एक चतुर्थांशहूनही कमी झाली.
खरे म्हणजे भारताची प्रचंड लोकसंख्या पर्यावरणाच्या र्‍हासासाठी बर्‍याच अंशी कारणीभूत होती आणि लोकसंख्या कमी झाल्यामुळे अखेर पर्यावरणावरचा भार कमी होणार होता. परंतू जेमतेम २० वर्षांच्या शांततेनंतर अमेरिका आणि चीन या देशात आफ्रिका खंडात सुरू झालेल्या लढाईचे सहाव्या महायुद्धात रुपांतर झाले. आधीच अंतर्गत युद्ध आणि प्रमुख नद्यांचा विनाश झाल्याने खंगलेल्या भारताला आक्रमणाची भिती वाटू लागली. त्यापुढची २० वर्षे लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक स्त्रीला शक्य असेल तितके वेळा गरोदर रहाण्याची सक्ति करण्यात आली.
३००० साली गंगा यमुनेच्या पडिक खोर्‍यात युरेनियमचे प्रचंड साठे सापडले आणि जगभरातील सत्तांच्या तिथे उड्या पडू लागल्या. ३५०० साली जंगले संपत आल्याने वातावरणातील ऑक्सिजन कमी व्हायला सुरूवात झाली. त्याबरोबर वैज्ञानिकांसमोर दोन नवी आव्हाने उभी राहिली. ऑक्सिजनशिवाय जगण्याचा मार्ग शोधून काढणे आणि परग्रहावर जाण्याचा मार्ग शोधणे. परग्रहावर जाण्याचे स्वप्नं अनेक शास्त्रज्ञ हजारो वर्षांपासून बघत असले तरी अशा परिस्थितीत ती निकड तयार होईल हे अनपेक्षित होते. शेवटचा उपाय म्हणून पाळीव जनावरांची पैदास करणे थांबवण्यात आले. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीची २०० वर्षे पुरला.
इस ४१४५ वातावरणातील प्राणवायू पूर्णतया नाहिसा झाला. ऑक्सिजन आणि खाद्यं पदार्थांची निर्मिती करण्यासाठी कारखाने सुरू झाले होते. लोकांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध पडले. सामान्य लोकांना आपली घरे सोडून कम्युन्स मधे रहाणे भाग पडले. अतिमहत्वाच्या व्यक्तिंनाही इतर चार जणांबरोबर राहिल्याशिवाय स्वतंत्र घरात रहाण्याची परवानगी मिळेनाशी झाली. एके काळच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या उरल्या सुरल्या उर्जास्त्रोतांवर आज आपण जगत आहोत.
अशा रितीने १५ हजार वर्षांत होमोसेपियन्सने पृथ्वीला ४६ कोटी वर्षांपूर्वीच्या प्राथमिक अवस्थेत आणून सोडले आणि स्वतःला मोस्ट एन्डेंजर्ड बनवले. ही उर्जा संपायच्या आधी परग्रहावर स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग उपलब्ध होता. इंटेलिजंट स्पेसिज टिकू शकते का हया प्रश्नाने शास्त्रज्ञांना पछाडले आहे.

स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग नाही आणि इंटेलिजंट स्पेसिस टिकू शकते, एव्हढेच नाही तर या पृथ्वीला पुन्हा सुजलाम सुफलाम करणे शक्य आहे हे मानणारा एक शास्त्रज्ञ ४३५० च्या सुमारास होऊन घेला. त्याचे नाव होते व्हिलोकोविस सिंगनिझी. परग्रहावर जाण्यासाठी आणि प्रस्थापित होण्यासाठी जे तंत्रज्ञान, उर्जा आणि शस्त्रास्त्रे लागणार आहेत, तीच वापरून कार्बन सायकल रिव्हर्स करता येईल हे व्हिलोकोविसने सिद्ध केले. मात्रं व्हिलोकोविसचा पर्याय अशक्य म्हणून फेटाळून लावण्यात आला. खरे म्हणजे ऑक्सिजनविरहित वातावरणात लागणारी साधन सामुग्री तयार करणार्‍या कंपन्यांनी व्हिलोकोविसच्या पर्यायाला पराभूत केले.
अंतराळातील क्रिस्टो बिटा १२ आणि नॅनो स्पिटिकल या दोन ग्रहांची स्थलांतरासाठी निवड करण्यात आली. क्रिस्टो बिटा १२ हा नॅनो स्पिटिकलपेक्षा सहापट छोटा असल्याने केवळ १३० वर्षांचे प्रवास अंतर असूनही अखेर नॅनो स्पिटिकलची अंतिम निवड करण्यात आली आहे. नॅनो स्पिटिकलचे आणखी एक वैशिष्ट्य असे की तिथे जीव सृष्टी अस्तित्वात आहे.

नॅनो स्पिटिकलच्या जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्रज्ञ म्हणून मी वरूड अंतराळ केंद्रात रुजू झालो. तरूण वयातला उत्साह आणि मानव जातीला वाचवण्याचा ध्यास घेऊन मी पहिल्या दिवसापासूनच स्वतःला या कामात झोकून दिले.
नॅनो स्पिटिकलवरील सगळ्यात महत्वाचे प्राणी क्झोटिसॉर्स यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. नॅनो स्पिटिकलवर गेलेल्या यानांनी पाठवलेल्या व्हिडिओंचा मी अभ्यास करायला सुरूवात केली. तोपर्यंत एक भयानक, विचित्र,निर्दयी आणि अति-विषारी म्हणून त्यांची प्रसिद्धी माझ्या कानावर आलेली होती. आपण शांततेच्या मार्गानी नॅनो स्पिटिकलवर जाणार असलो तरी क्झोटिसॉर्सनी आपल्याला जगू दिले नाही तर त्यांच्यावर विजय मिळवण्याचे मार्ग शोधण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. परंतू माझ्या अभ्यासाचे निष्कर्ष या प्रस्थापित मतापेक्षा वेगळेच निघू लागलेत..."


क्रमशः

Monday, May 14, 2007

अंतिम युद्धं - भाग ४

मिस्टर आणि मिसेस लेकशॉ त्यांच्या खाजगी कार्यालयात आले. पाठोपाठ विरीताही आली.
मिसेस लेकशॉ: मेक अप फार भडक नाही दिसतंय नं?
विरीता: नाही आई, तुमच्या मेक-अपची काळजी नाही मला, पण बाबा, तुम्ही थोडा तरी मेक-अप करायला हवा. एव्हढी ग्लोबल जिओटेलवर मुलाखत आहे. सगळ्या जगातले लोक बघणार आहेत.
मिसेस ले.:आणि जगाबाहेरचेही. अख्खी स्पेस कम्युनिटी कान टवकारून बसली आहे तुम्ही काय सांगताय तुमच्या संशोधनाबद्दल ते ऐकायला.
मिस्टर लेकशॉ: हो ना?मग मेक-अप नाही केला तरी ते ऐकतीलच.
तेव्हढ्यात मिटिओरा चॅनेलच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. "मिस्टर लेकशॉ, नमस्कार. मी मिटिओराची प्रतिनिधी ल्युकसिमा बोलते आहे. बरोबर पाच मिनिटानी तुम्ही लाईव्ह जाणार आहात. आमच्या व्हिडिओ नेटवर्कनी अल्ट्रा-पोलिंग करायला सुरूवात केली आहे. कृपया "ए चार्टा बिट्वी फाईव्ह ३००" या सिग्नलला परवानगी द्या.
मिस्टर लेकशॉंनी त्याप्रमाणे चॅनेलला घरातल्या व्हिडिओशी कनेक्ट केले.
नमस्कार मंडळी! वेध भविष्याचा या आमच्या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. आजच्या या विशेष एपिसोडमधे आपण लॉंजिटिव्हिटी या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या पॅनेलचे चार सदस्य आहेत - मन्झोली येथून जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ.सुप्रियिनी प्लॅनियोतोव्हा, वडुरा येथून नोबेल पारितोषक विजेते जेनेसेसिस्ट डॉ.विधिस्तव लेकशॉ, रुमेंबेच्या आंतरराळ मोहिम केंद्रातून डॉ.अरिग्रॅव्हो केलूते आणि आशिया विभागाचे आरोग्य मंत्री श्री.चास्कोव्ह बोस्ता.
आपल्या सर्वांचे "वेध भविष्या" मधे स्वागत.
डॉ लेकशॉ, सर्वप्रथम नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन.
डॉ लेकशॉ: धन्यवाद ल्युकसिमा.
ल्युकसिमा: डॉ लेकशॉ, तुमच्या नेतृत्वाखाली दिग्रस विद्यापिठाच्या लॉंजिटिव्हिटी प्रोजेक्टच्या नविन संशोधनाबद्दल आजकाल बरीच शास्त्रिय माहिती प्रसिद्ध होत असते. पण आमच्या सामान्य प्रेक्षकांना कळू शकेल अशी माहिती तुमच्या या संशोधनाबद्दल सांगता येईल का?
दृष्य बदल:
केवल: निलो, आधी अमरावतीला चल. केक पिक अप करायचा आहे.
तेव्हढ्यात डॉ. लेकशॉंचा चेहरा पडद्यावर वर झळकतो.
निलो: बघ बघ - तुझे आजोबा मिटिओरावर मुलाखत देतायेत!
केवल: अरे हो, विसरलोच होतो. बघ बघ किती स्मार्ट दिसतात नाही का माझे आजोबा आणि किती मानसन्मान आहे त्यांना?
निलो: हो हो आहेत आहेत खूप स्मार्ट आहेत बरं, पण तू आपली व्हिडिओ सुरू कर.
केवल: बरं बाई, करतो.पण आधी गाडीचं ऑडिओ आणि व्हिडियो ट्रेस बंद कर.
निलो: ते आधीच केलंय. सुरू कर नं लवकर.
केवल: आ हा... जगातल्या मोस्ट वॉंटेड अतिरेक्यावर फिदा असलेल्या तरूणीला इतकी अधिरता बरी नाही. हे घे - आधी हेडसेट लावायला विसरू नकोस - बी सेफ दॅन सॉरी.
केवल व्हिडिओ सुरू करतो.
"२० व्या शतका अखेर, दुसर्‍या महायुद्धानंतर मध्यम वर्ग नावाचा एक महत्वाचा वर्ग उदयाला आला. " निदांचे निवेदन सुरू झाले.
निलो: व्हॉट अ सिड्क्टिव व्हॉइस.. गो ऑन निदा...
"त्याकाळातील मानवी समुहांना देश असे नाव होते. काही महत्वाच्या देशांमधे लोकशाही नावाची राजकिय व्यवस्था अस्तित्वात होती. या व्यवस्थेमधे माणसांना वाट्टेल ते करायची मुभा होती. कोणी किती साधनांचा विनियोग करायचा यावर कुठलेही कायदेशीर बंधन नव्हते. ज्या सुख सुविधा आधी फक्तं मूठभरांनाच उपलब्ध होत्या त्या आता या प्रचंड मोठ्या वर्गाला उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड वाढला. नफा वाढवण्यासाठी जगभरात मध्यमवर्गाच्या वाढीसाठी राज्यकर्ते आणि उद्योगपती प्रयत्नं करू लागले. पण हया सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे होमोसेपियन्सचे इकोलॉजिकल फूटप्रिंट प्रचंड मोठे झाले. एका दृष्टिने भौतिक सुखांना लालचवलेला मध्यमवर्ग आणि त्यांना चैनीच्या विविध वस्तू आणि सेवा विकणार्‍या बहुराष्ट्रिय कंपन्या यांनी या पृथ्वीच्या साधन संपदा ओरबाडायला सुरूवात केली. मुक्तं बाजारपेठेचा पुरस्कार करणार्‍या या समाजात प्रचंड विरोधाभास होता. एकीकडे "देअर इज नो फ्री लंच" असे ब्रिदवाक्य असलेल्या या समाजाने निसर्गाकडून घेतलेल्या संपत्तीची भरपाई कधीच केली नाही. हे सगळं जग हे मानवाने एक्स्प्लॉईट करण्यासाठी निर्माण झाले आहे अशी त्यांची ठाम समजूत होती. दुसरीकडे त्या काळात मानवी ह्क्कांच्या मूल्यांमधेही क्रांती झाली. माणसांनी माणसांची पिळवणूक करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. पण मुळात पिळवणूक हा या समाजाचा पाया असल्याने आता सर्व माणसांनी मिळून निसर्गाची आणि इतर प्राणिमात्रांची पिळवणूक सुरू केली. मानवी गरजा भागवण्यासाठी इतर प्राण्यांचे हॅबिटॅट नष्टं करणे, त्यांचे अनन्वित हाल करणे, त्यांना बंदी बनवणे यात त्यांना काहीच चुकीचे वाटत नव्हते. त्याकाळातील थोडे विचारवंत, शास्त्रज्ञ आणि इतर मूठभर लोक ही गोष्टं निदर्शनास आणून देत होते पण त्यांचा आवाज फारच दुबळा ठरला. "
दृष्य बदल:
डॉ. लेकशॉ: ल्युकसिमा, सद्ध्या मानवाचे सरासरी नैसर्गिक आयुर्मान ९५ वर्षाचे असले तरी आज उपलब्ध असलेल्या लॉंजिटिव्हिटी ड्रगमुळे ते जास्तीत जास्तं २५० वर्षांपर्यंत वाढू शकते. परंतू अनेक वर्षांपासून ही २५० वर्षाची आयुर्मर्यादा ओलांडण्यासाठी आम्ही प्रयत्नं करत आहोत. ते संशोधन सुरू असताना आम्हाला एका नविन जीन्स आढळून आले आहे. या जीन्सला लाईफसायकल पॉज जीन्स असं नाव देण्यात आलं आहे. या जीन्सला इम्युलेट करणारे चिरनिद्रा ड्रग तयार करण्यात आम्हाला यश आले आहे. चिरनिद्रा ड्र्ग घेतलेला माणूस कितीही वर्षे निद्रित अवस्थेत राहू शकतो. जिवंत रहाण्यासाठी त्याला फक्तं व्हायटल सप्लाय म्हणजे ऑक्सिजन आणि सलाईनच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या द्रवांची गरज असेल. विशेष म्हणजे निद्रेच्या काळात एजिंग पॉज झाल्यामुळे हा काळ अयुर्मानात गणला जाणार नाही. म्हणजे समजा १०० वर्षाच्या माणसाला १०० वर्षे चिरनिद्रेत ठेवले तर निद्रेतून उठल्यावर तो उरलेले १५० वर्षाचे आयुष्य तो त्यानंतर जगू शकेल.
ल्युक्सिमा: निद्रेतून उठवण्यासाठी काय करावे लागेल?
डॉ. लेकशॉ:चिरनिद्रा ड्र्गचा इफेक्ट रिव्हर्स करणारे ड्र्ग झोपलेल्या माणसाला द्यावे लागेल. अर्थात आयुर्मर्यादा वाढवण्यासाठी आमचे संशोधन सुरूच रहाणार आहे, तरीही त्या संशोधनातला हा एक मैलाचा दगड आम्ही गाठला आहे असे म्हणता येईल.
ल्युक्सिमा:धन्यवाद डॉं लेकशॉ. आता डॉ. सुप्रियिनींकडे वळू या. डॉ. सुप्रियिनी, मानसशास्त्राच्या दृष्टिने या संशोधनाचे कसे मूल्यमापन करता येईल.
डॉ. सुप्रियिनी: ल्युक्सिमा, मानसशास्त्राच्या दृष्टिने हे संशोधन फारच आव्हानात्मक आहे. म्हणजे विचार करा की शंभर वर्षे चिरनिद्रा घेतलेला माणूस एका संपूर्ण नविन जगात जागा होईल. आजूबाजूच्या घटनांचे ज्ञान त्याला नसेल. विशेष म्हणजे त्याचे समकालीन लोक त्या काळात अस्तित्वात नसतील म्हणजे टाईम मशिनमधे बसून पुढे गेलेल्या माणसासारखी त्याची अवस्था असेल. अशा परिस्थितीत त्याचे नविन काळात मानसिक आणि भौतिक पुनर्वसन करण्याची गरज असेल.
ल्युक्सिमा:धन्यवाद डॉ सुप्रियिनी. आता वळू या डॉ.अरिग्रॅव्होंकडे. डॉ.अरिग्रॅव्हो, या संशोधनाची सर्वात जास्तं दखल जर कोणी घेतली असेल तर ती अंतराळ संशोधकांनी. याचे कारण काय?
डॉ.अरिग्रॅव्हो: ल्युक्सिमा, आपल्याला माहित आहेच की पृथ्वीच्या सद्ध्याच्या अवस्थेत इथे जगणे अत्यंत कठिण झाले आहे, आणि येत्या पाचशे ते सातशे वर्षात ते अशक्यच होणार आहे. म्हणजे आपण आपल्या अस्तित्वाची अखेरची लढाई लढत आहोत. करा अथवा मरा ही उक्ति इतिहासात बरेचदा वापरण्यात आली आहे. पण दुर्दैवानी आजच्या इतकी ती कधी अक्षरशः लागू पडलेली नाही. अस्तित्वाच्या या लढाईचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मानवाला जगण्याला अनुकूल असलेल्या ग्रहावर स्थलांतर करणे. या दृष्टीने नॅनो-स्पिटिकल नावाचा ग्रह हा आपल्याला माहिती असलेल्या ग्रहांपैकी सगळ्यात अनुकूल परिस्थिती असलेला ग्रह आहे. गेल्या अनेक शतकापासून आपण या ग्रहाचा एक पर्याय म्हणून विचार करत आहोत. आपल्याकडे त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्धं आहेच. शिवाय या ग्रहाच्या वाटेवर योग्य अंतरावर असलेले उर्जास्त्रोत आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. या ग्रहावर आपण अनेक मानवरहित मोहिमा पाठवल्या आहेत. इतके सगळे असूनही दोन फॅक्टर आपल्या विरुद्ध जाणारे आहेत. पहिला फॅक्टर म्हणजे मिशनला अतिरेक्यांचा धोका. दुसरा म्हणजे या ग्रहावर जायला ३५७ बर्षे लागतात. आणि आपली आयुर्मर्यादा अजून तितकी वाढलेली नाही. त्यामुळे प्रवासामधे लागणारे मिशन क्रिटिकल शास्त्रज्ञ हा प्रवास पूर्णत्वाला नेऊ शकत नाहीत. परंतू डॉ. लेकशॉंच्या संशोधनामुळे आम्हाला मानवी मिशनचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
ल्युक्सिमा:म्हणजे नक्की काय योजना आहेत अंतराळ केंद्राच्या?
डॉ.अरिग्रॅव्हो:प्रत्येक मिशन क्रिटिकल कार्यासाठी तीन तज्ञ पाठवले जातील. सुरवातीला तीनपैकी एक कार्यरत असेल आणि दोन चिरेनिद्रेत असतील. कार्यरत तज्ञाची आयुर्मर्यादा संपत आली किंवा इतर आकस्मित कारणामुळे किंवा कार्यरत तज्ञ अतिरेकी असल्याचे लक्षात आले तर चिरनिद्रेतील तज्ञ त्याची जागा घेऊ शकतील.
दृष्य बदल: ठिकाण लेकशॉंचे रहाते घर.
केवल (कुजबुजत): निलो,धिस इज अ व्हेरी प्रोफाऊंड मॉमेंट फॉर मी. डॉ. लेकशॉंच्या घरात निदांची व्हिडिओ घेऊन आलोय मी.... इतिहास मला एक गद्दार,अतिरेकी म्हणून बघेल की एक हिरो म्हणून?
निलो: (केवलचा हात हातात घेऊन) इतिहासात जायला आपल्याला भविष्य असायला हवं ना?

क्रमशः

टिप: आमच्या घरी भारतातून पाहुणे येणार असल्यामुळे पुढील एक आठवड्यात युद्ध विराम जाहीर करण्यात आला आहे. तेव्हा भेटू या त्या पुढच्या आठवड्यात... वाचत रहा...