Showing posts with label social justice. Show all posts
Showing posts with label social justice. Show all posts

Monday, August 18, 2008

लोकशाही व जनमानस

लोकशाही - आपल्याला सद्ध्या माहित असलेल्या राजकीय व्यवस्थेतील सर्वात यशस्वी लोकप्रिय प्रणाली. असे असले तरी ही व्यवस्था आदर्श, परिपूर्ण आहे असे म्हणता येत नाही. लोकशाहीच्या मर्यादा वेळोवेळी दिसून येतात. या मर्यादांच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मनुष्य स्वभाव.


एरवी राजकारणाशी फारसा संबंध असलेल्या अथवा नसलेल्यांवर नेता निवडीची महत्वाची जबाबदारी टाकली असते. या कर्तव्याचे पालन नागरिकांनी जागरूकतेने, सारासार विचाराने करावे अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात काय होते? अनेकदा अज्ञान, विसंगती, स्वार्थ, आकस, गैरसमज,पूर्वग्रह यातून अतिशय असंबद्ध निर्णय मतदानाच्यावेळी घेतले जातात.


सद्ध्या अमेरिकेत निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्या अनुषंगाने उदाहरणादाखल अमेरिकेतील दोन महत्वपूर्ण मतदार गटांच्या वर्तणुकीचे विश्लेषण या लेखात करणार आहे.


९९% टक्के साक्षरता असलेल्या या देशात गोरे, काळे, लॅटिनो (मूळचे मेक्सिको अमेरिकेतील लोक) इतर अशी साधारण वर्गवारी होते. मूलभूत सुखसोयी प्रसार माध्यमे बहुतेक सर्वांना उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांनी सारासार विचार करून, देशापुढील प्रश्न चांगल्या रितीने सोडवू शकणारा नेता निवडावा ही अपेक्षा फारच माफक आहे. पण ती पूर्ण होत नाही हे ह्या दोन प्रातिनिधिक उदाहरणांवरून दिसून येते.


गट पहिला: ख्रिश्चन मूलतत्ववादी: (ख्रिमू)


देशासमोर कुठलेही प्रश्न असू देत. येत्या निवडणुकीत मह्त्वाचे ठरलेले मुद्दे म्हणजे वाढती बेकारी, आर्थिक मंदी, इराक युद्ध या कशा कशाशी यांना देणे घेणे नाही. यांच्या दृष्टीने महत्वाचे असे दोनच प्रश्न किंवा उद्दिष्टे आहेत. पहिले उद्दिष्ट म्हणजे अमेरिकेतील स्त्रियांचा गर्भपाताचा अधिकार काढून घेणे. या मुद्द्यावर ते स्वतःला "प्रो-लाईफ" असे म्हणून घेतात. अर्थात या तथाकथित प्रो-लाईफ लोकांना इराक मधे किंवा इतर कुठे बळी पडलेल्यांबद्दल फारशी सहानुभूती नसते. "लाईफ" हे केवळ अमेरिकन नागरिकांचंच असतं बरं का. या गटाचे दुसरे उद्दिष्टं म्हणजे समलिंगी लोकांना कुठलेही अधिकार, विषेशतः लग्न करण्याचे अधिकार मिळू नये. स्वतःची ही मते स्वतःपुरती मर्यादित नं ठेवता कायद्याच्या माध्यमातून इतर सर्वांवर लादण्याचा, समलिंगींना वैयक्तिक व सामाजिक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा या गटाचा प्रयत्नं सतत सुरू असतो. मतदान करनाता ह्या विचारांशी सहमत असणार्‍यालाच मत दिले जाते.


गट दुसरा: ज्यूईश मूलतत्ववादी (ज्यूमू)

हा गट संख्येने पहिल्या गटापेक्षा फार लहान असला तरी यांची आर्थिक ताकत फार जबरदस्त आहे. आज कुठलाही उमेदवार या गटाला नाखूष करू धजत नाही. अमेरिकेच्या आर्थिक नाड्या ह्या गटाच्या हातात आहेत असे म्हंटले तरी अतिशयोक्ति ठरू नये. अर्थात अमेरिकेतील कट्टर ज्यू या गटात मोडतात हे सांगायला नकोच. अमेरिकेत रहायचे, इथे पैसा कमवायचा, पण निष्ठा मात्रं सदैव इस्त्राईलला वहायच्या असे यांचे वर्तन असते. पॅलेस्टिनियन लोकांच्या न्याय्य मागण्यांचे तुम्ही नुसते समर्थन जरी केले तरी ते तुम्हाला थेट हिटलरच्या पंक्तीत नेऊन बसवतील. इस्त्राईलचे अस्तित्वच धोक्यात आहे असा यांचा कायमचा, पक्का समज असतो. अमेरिकेचे हित कशात हा प्रश्न यांना पडतच नाही. इस्त्राईलला आंधळा पाठिंबा देणार्‍या उमेदवारालाच यांचे मत पडणार हे नक्की.



तर केवळ एका मुद्याला धरून बसलेले हे प्रातिनिधिक गट. असे इतरही काही गट आहेत. सद्ध्या बोराक ओबामा यांची बरीच हवा आहे. तरूण ओबामांमधे करिष्मा आहे, तडफ आहे, हमखास गर्दी खेचण्याची ताकद आहे. समर्थकांकडून प्रचार मोहिमेसाठी ते विक्रमी पैसाही उभा करू शकले आहेत. अशा रितीने लोकांना प्रेरित करणारा नेता बर्‍या वर्षांनी अमेरिकेला मिळाला आहे असे म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. या उलट प्रतिस्पर्धी जॉन मकेन हे अजिबात करिष्मा नसलेले तापट ढुढ्ढाचार्य आहेत. असे असले तरी ओबामांचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर नाही, तो या अशा गटांमुळे. विद्यमान अध्यक्षा बुश यांना दुसर्‍यावेळी अनपेक्षित विजय मिळवून देण्यामागे या दोन गटांचाच हात होता हे विसरून चालणार नाही. गर्भपाताविषयी ओबामांच्या उघड भूमिकेमुळे ख्रिमू अगदी त्यांच्या विरुद्ध आहेत. अर्थात जॉन मकेनही या मुद्द्यावर संदिग्ध आहेत हीच ओबामांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणावी लागेल.

ओबामांचे इस्त्राईल धोरण संदिग्ध आहे. शिवाय ईराणशी बोलणी करण्याचा त्यांचा मानस त्यांनी आधीच जाहीर केला आहे, त्यामुळे ज्यूमू त्यांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता आहे. अर्थात ओबामांच्या विरोधात जसे हे दोन प्रातिनिधिक गट आहेत तसेच त्यांच्या समर्थक गटांमधेही असे काही एखादे विशिष्टं उद्देश असणारे गट उदा. प्रो चॉईस, प्रो गे गट आहेतच. अशा परस्पर विरोधी गटांमुळे त्यातल्या त्यात संतुलन राखले जाते हे ही खरेच.


तात्पर्य: लोकशाहीच्या समर्थकांनी या व्यवस्थेला आदर्श समजून स्वस्थ बसू नये. सद्ध्या अस्तित्वात असलेल्या पर्यायांपैकी त्यातल्या त्यात चांगला पर्याय, किंवा आदर्श पर्यायाकडे जाण्याची पहिली पायरी असे म्हणावे फार तर. याहून अधिक चांगली राज्यव्यवस्था पुढच्या टप्प्यात निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्नं सुरू ठेवायला हवेत.

Wednesday, August 08, 2007

उजळो तुझा असाच मंद प्रकाश

अमेरिकन दुतावासाने डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना पुरेसे (?) उत्पन्नं नसल्याच्या कारणास्तव व्हिसा आधी नाकारला आणि मग चुक लक्षात आल्यावर ओशाळून प्रदान केल्याची बातमी कुठेतरी वाचली होती. त्यावरून अखेर त्यांचा अमेरिकेत येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे कळले होते. मात्रं प्रत्यक्षात त्यांच्या भेटीचा योग येईल अशी कल्पनाही नव्हती.
रॅले येथील निशा मिरचंदानी यांनी बाबांच्या जिवनावर "विसडम सॉंग" नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचा अमेरिकेतील प्रकाशन सोहोळा ड्युक विद्यापिठात एका छोटेखानी कार्यक्रमात पार पडला.


आपला व्यवसाय सोडून सामाजिक कार्यात उतरलेल्या निशा मिरचंदानी यांनी वेळोवेळी भारतात जाऊन बाबांच्या आणि आमटे कुटुंबाच्या सहवासात बराच काळ घालवला. त्याचेच फलित म्हणजे हे पुस्तक.

पुस्तकाचे प्रकाशन करताना लेखिका आणि डॉ. प्रकाश.


त्यानंतर आमटे कुटुंबावर केलेला माहितीपट दाखवण्यात आला कारण मुळात मितभाषी असलेल्या या दांपत्याला स्वतःविषयी बोलायला लावणे कठिणच आहे असे लेखिकेने सांगितले आणि त्याची प्रचितीही आली.

इतके मोठे काम करत असुनही अहंकाराचा लवलेश नाही. नवरा बायकोत इतके सामंजस्य की शब्दांचीही गरज पडू नये. व्यक्ति कोण आणि छाया कोण हे कळू नये इतकी एकरूपता.





छायाचित्रे नवर्‍याच्या सौजन्याने.




Wednesday, July 18, 2007

आतंकवाद आणि २१ वे शतक

इंग्लंडमधे झालेल्या अतिरेक्यांच्या अपयशी हल्ल्यात उच्चंशिक्षित भारतिय तरूण संशयित म्हणून पकडल्या गेले आहेत. हे वृत्त वाचुन काहींना आश्चर्य वाटलं असेल तर काहींना "बघा आम्ही म्हणत होतो ना? आता तरी जागे व्हा" असंही म्हणावसं वाटत असेल.
आत्मघातकी अतिरेकी म्हणजे "गरीब, अशिक्षित पाकिस्तानातल्या कुठल्या तरी गावातून आलेला, थोड्याश्या पैशांसाठी जीवावर उदार झालेला" ह्या प्रतिमेला आता तडा गेला आहे.
ही बाब फार गंभीर असल्याने जरा खोलात जाऊन कारणे आणि उपाय यावर विचार करायला हवा.
एकविसाव्या शतकातही मानवी समाज हिंसेने प्रश्न सोडवायचा प्रयत्नं करतो आहे. ठोशास ठोसा हा तर सध्याचा आंतरराष्ट्रिय न्याय किंवा परराष्ट्रिय धोरण झाले आहे.
दुसर्‍या महायुद्धाच्या सुरवातीला अलिप्तं राहणार्‍या अमेरिकेने पराभूत जपानला सन्मानाची वागणूक देऊन प्रचंड आर्थिक मदत देऊ केली आणि पुनर्निमाणात महत्वाचा हातभार लावला. त्याच अमेरिकेने आता मात्रं "प्रिएम्प्टिव वॉर" सुरू करून सद्दामांना फाशी देण्यापर्यंत पलटी खाल्ली आहे. अबु गरेब आणि ग्वांटानामोच्या तुरुंगातून लाजिरवाण्या छळ्वादाच्या कथा बाहेर येऊनही इंग्लंड आदि देशांनी त्यांना आंधळा पाठिंबा चालूच ठेवला आहे.
इकडे भारतात हिंदु शक्तिप्रदर्शन, राम मंदिर, गुजराथ हत्याकांड,गोध्रा, मुंबईतील स्फोट, स्वामी नारायण मंदिरावरील हल्ला, संसदेवरील हल्ला अशा घटनांनी मने दुभंगली आहेत. आपल्याच देशात पोरकेपणा आणि असहायतेने ग्रासलेल्या हिंदु आणि मुस्लिम समाजाच्या भावनांचा फायदा उठवण्यासाठी कट्टरपंथीय धार्मिक नेते, राजकारणी आणि आय एस आय तयार आहेतच.
युद्ध हा श्रीमंत देशांचा आतंकवाद आहे आणि आतंकवाद हे गरिबांचे युद्ध आहे ही गोष्टं लक्षात ठेवायला हवी. हिंसाचाराचे मूळ धैर्यामधे नसून भितीमधे असते. नष्टं होण्याची भिती माणसाला टोकाची भूमिका घ्यायला लावते. बहुतांशवेळा ती भिती अनाठायीच असते आणि ती दूर होण्यासाठी खरी धैर्याची गरज असते.
आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आजची प्रसार-माध्यमे. एकतर माध्यमे बहुतांश मॅनेज केलेली आहेत. आणि दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकण्यासाठी तत्वे सोडून पैशाच्या पाठीमागे लागलेली आहेत. प्रक्षोभक वक्त्यव्ये करणार्‍यांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी शांततामय मार्गाचा अवलंब करणार्‍यांना मिळत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना आकर्षित करण्यासाठीही हिंसाचाराचा अवलंब केला जातो.
या परिस्थितीत आपल्या मानसिकतेचा जरा विचार करू. भारतात सुरू असलेल्या मुस्लिमेतर आतंकवादाची उदाहरणे घ्या - तामिळ दहशतवाद्यांचा राजीव गांधींवर प्राणघातक हल्ला, आसाममधे प्रांतवादातून उफाळलेला हिंसाचार, तसेच इतर भागात नक्षलवाद्यांनी आणि माओवाद्यांनी केलेले हल्ले. अशा घटनांची संख्या खरे तर मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्तं आहे. पण त्या बातम्यावाचून आपल्या भावना भडकत नाहीत. प्रसारमाध्यमेही त्याचे फार भांडवल करत नाहीत. याचे कारण काय असावे? शासन, सुरक्षा यंत्रणा अथवा लष्कर या बंडाचा आज ना उद्या बिमोड करेल असा आपल्याला कुठे तरी एक विश्वास आहे. मात्रं मुसलमान भडकले तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही ही भिती हिंदूच्या मनात कायम आहे. आणि हा देश हिंदुंचा असल्याने वेळ प्रसंगी आपलेच शेजारी मित्रं आपल्यावर उलटतीत आणि सरकारही आपल्या मदतीला येणार नाही ही भावना मुसलमानांच्या मनात घर करून आहे. इतिहास आणि पूर्वग्रह भितीच्या या मानसिकतेला खतपाणी घालतातच.
ही मानसिकता सोडण्यासाठी सर्व थरावर सतत सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुसलमानांना हिंदु वस्तीत घर भाड्याने अथवा विकत मिळणे कठीण आहे. तसेच मुसलमान वस्तीत एकटे जायला हिंदु धजत नाहीत. ही परिस्थिती बदलायला हवी. जाती धर्माधारित वस्त्या हळुहळु कमी करत प्रसंगी कायद्याचा वापर करून नाहीशा कराव्यात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करण्याचे व्यासपिठ उपलब्ध असावे. अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन उभे करावे. अविश्वास, भितीची जागा विश्वास आणि धैर्याने घ्यावी. जामा मस्जिदीतील धर्मगुरूच्या व्यतिरिक्त इतर मुसलमानांची मते जाणून घ्यायचा प्रयत्नं प्रसारमाध्यमांनी करावा. पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्रं येऊन कट्टरपंथीयांना एकटे पाडावे. मवाळांनी गप्पं राहू नये.
उभयपक्षांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विषय कठीण असला तरी पेपर सोडवायलाच हवा.

Thursday, January 18, 2007

आता तरी...

शासकिय आकड्यानुसार आमची संख्या दोन कोटी आहे. स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहुती देणार्‍यांपेक्षा आमची संख्या जास्त आहे. सीमेवर शत्रूशी लढताना प्राण गमावणार्‍यांपेक्षाही जास्त आहे. मात्रं आमचं बलिदान हे सर्व अर्थानी मूक आहे, कारण हे दान आम्ही स्वेच्छेने दिलेले नाही, तर आमच्याकडून ह्कनाक घेण्यात आलेलं आहे. आमच्या आई-वडिलांनी, लोभी डॉक्टरांच्या मदतीने विज्ञानाचा दुरुपयोग करत, जन्मापूर्वीच आम्हाला खुडून टाकलं आहे, किंवा जन्मानंतर काही दिवसाच्या आतच...
गेल्या वीस वर्षात दोन कोटी चिमुकल्या कन्या ह्या भयंकर सामजिक प्रथेच्या बळी ठरल्या आहेत. आमचे आई-बाप समाजाच्या सगळ्या स्तरात आहेत, खेड्यात आहेत तसे शहरात आहेत. निरक्षर आहेत तसेच साक्षर. गरीब तसेच गर्भश्रीमंत. काश्मिर ते कन्याकुमारी, महाराष्ट्रं ते बंगाल सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आहेत.
हीच का ती प्राचिन गौरवशाली संस्कॄती? हेच का ते मुक्तं करणारे ज्ञान-विज्ञान? ह्यालाच प्रगती म्हणायचे का? हयाला सामजिक न्याय म्हणायचे का? महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणार्‍या समाजाची हीच मनसिकता का? हाच का राज्यघटनेने तुम्हाला दिलेला मुलभूत ह्क्कं?
आमच्या बलिदानाने काही प्रमाणात तरी लोकसंख्येला आळा बसला आहे - जाता जाता तो ही एक फायदा आम्ही देशाला करुन दिला आहे. पुरुषा-गणिक स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तुमच्या ह्या स्वतंत्र देशामधे जन्मण्याचा ह्क्कं आम्हाला मिळाला नाही, तरी एक फक्त विनंती आहे - आमच्या अनेक बहिणी आहेत, ज्या जन्मल्या तर आहेत, पण त्यांची स्थिती आमच्यापेक्षाही वाईट आहे. आता तरी घेऊ द्या त्या कळ्यांना मोकळे निश्वास, आता तरी उडू द्या त्या पर्‍यांना आपल्या पंखानिशी...आता तरी नका त्यांचे श्वास कोंडु, आता तरी नका त्यांची स्वप्नं जाळू...