Wednesday, November 05, 2008

डॉ. नंदिता शहा यांची मुंबईत कार्यशाळा: Peas Vs Pills

डॉं नंदिता शहा यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग काही महिन्यांपूर्वी आला. ड्रेस्डन, जर्मनीमधे वर्ल्ड व्हेजिटेरियन कॉंग्रेसमधे त्यांचे भारतातील कार्य व अनुभव यांची माहिती मिळाली. जिवनशैली व आहार बदलांच्या माध्यमातून निरोगी जीवन कसे जगता येईल याचे मार्गदर्शन त्यांच्या कार्यशाळांमधून मिळते.

२२ नोव्हे. रोजी मुंबईत त्यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. त्याबद्दल त्यांनी पाठवलेली माहिती येथे जशीच्या तशी देत आहे:


The workshop will cover:

1. Health, disease and the scope of medicines.
2. What is the healthiest diet for our species? Understanding our anatomy, physiology and real nutritional needs.
3. Why the foods we are eating today cause disease.
4. Results of diet change.
5. The relation between diet and stress.
6. The relation between diet and our environment.
7. How to manage making the transition without missing the foods we are used to.
8. How to handle social situations.
Fees: Rs 1500 inclusive of breakfast, lunch, a snack and workshop materials. All meals will be strict vegetarian. If you have any dietary restrictions please inform us in advance.
For reservations or enquiry, please contact Mr Harshad Parekh,
harshad@sharan-india.org / 98672 64111 or 2511 2894, 2513 7567 or send your in favour of SHARAN to the following address – SHARAN, 22 Matru Chayya, 70 Marine Dr, Mumbai 400 020.

अधिक माहितीसाठी:
http://www.sharan-india.org/ebrochure/Peas-vs-Pills-e-brochure.html

Sunday, September 28, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग १


पवित्रं धार्मिक प्रतिकांची हिंदु समाजातील अवहेलना या विषयावरचा
पुण्यजला गंगा हा लेख मी आधी प्रसिद्ध केला होता. त्याच मालिकेतला हा दुसरा लेख.


कामधेनू, गोमाता अशा प्रतिमांनी गौरविलेल्या गायीला हिंदुधर्मात विश्वाची माता असे स्थान दिलेले आहे. गायीविषयी काही हिंदुधर्मियांच्या भावना इतक्या तीव्रं आहेत की "फार फार वर्षांपूर्वीचे आर्य गायींचे मांस खात होते" असे कोणी म्हंटले जरी की त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आता आपले पूर्वज काय खात होते यासंबंधी मला अजिबात माहिती नाही. त्यांनी काय खावे हा त्यांचा प्रश्नं होता. त्यांच्या आहाराचे जाऊ द्या हो, आपला आहार हा आपल्या गायीविषयीच्या मताशी सुसंगत आहेत की नाही हा प्रश्नं आज जास्त महत्वाचा आहे. हिंदू म्हणुन गायीची आपल्याला खरोखर किती माहिती आहे?


गायीच्या दुधाचा आपण चक्कं शाकाहारात समावेश केलेला असल्याने ते कोणाला निषिद्ध तर नाहीच, उलट गायीच्या दुधाला अमृतासमान मानल्याने दूध सर्वांना हवेच असाच आपला समज आहे. गेल्या काही दशकात भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे जिवनमानही सुधारते आहे. त्याप्रमाणे दुधाची मागणीही वाढते आहेच. त्यामुळे या वाढत्या मागणीला पुरवठा करणार्‍या या गायींची (अथवा म्हशींची) काय अवस्था होते हे हिंदू म्हणुन कधी कोणी लक्षात घेतले आहे का?



इतर कुठल्याही सस्तन मादीप्रमाणे गाय व्यायल्यानंतरच दूध देते. इतर सर्व प्राण्यांप्रमाणे गायीचे दुधही निसर्गाने तिच्या पाडसाच्या वाढीसाठीच तयार केले आहे. गाय साधारण चार वर्षांची झाल्यावर तिची गर्भधारणा होऊ शकते. गायीचे पाडस आईच्या उदरात नऊ महिने वाढते. म्हणजे साधारण पहिली पाच वर्षे तिला दुध येत नाही. पाडसाच्या जन्मानंतर ती साधारण दहा महिने दुध देते. त्यानंतर तिची पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. गायींची आयुर्मयादा साधारण १२-१३ वर्षाची असते. त्यापैकी शेवटची ३-४ वर्षे तिला गर्भधारणा होत नाही. म्हणजे आयुष्यातल्या सुमारे १५० महिन्यांपैकी फार तर ३०-४० महिने ती दुभती असते.


असे असताना वाढत्या लोकसंख्येला दुधाचा पुरवठा, तो ही मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किमतीत कसा होऊ शकतो त्याचे हे विश्लेषण:



पहिला पायरी:भेसळ


दुधात म्हणजे प्रत्यक्ष अमृतात(!?) पाणि घालणे. इहलोकात अमृत प्यायचं तर ते तितकं शुद्ध कसं असेल बरं?


दुसरी पायरी:पाडसाला गायीपासुन तोडणे






नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर त्या पाडसाला त्याची माय ममतेने दुधही पाजु शकत नाही. कारण गायीच्या मालकाला ते परवडणारे नसते. बरेचदा आईपासून तोडलेले हे वासरू जगु शकत नाही. सुरूवातीला जेव्हा वासरू दुसरं काहीच खाऊ शकत नाही तेव्हा आपण खरवसासाठी चीकही चोरतो. दुध प्यायलाने आपण कोणाची हत्या तर करत नाही हे समाधानही खोटेच ठरते.


तिसरी पायरी:कृत्रिम गर्भधारणा


गायीचे दुध आटुन ती पुन्हा नैसर्गिकपणे गर्भार होण्याची वाट नं बघता दुभत्या गायीवरच गर्भारपण लादणे. म्हणजे पुन्हा नऊ महिने वाट बघायला नको. याचा गायींच्या प्रकृतीवर सहाजिकच परिणाम होऊन त्यांचे आयुर्मान कमी होते.


आदर व्यक्तं करायची ही तर्‍हा चांगली आहे! हे सगळं करताना वरून "वासराला चीक पचत नाही", "वासराला लागतं त्यापेक्षा जास्तं दुध गायींना येत असल्याने दुध काढावंच लागतं" वगैरे खोटे युक्तिवाद स्वार्थातुन किंवा अज्ञानातुन केले जातात. निसर्गाने आईच्या दुधाची निर्मितीच मुळी पिलांसाठी केली असताना वासरांना गायीचं दुध पचणार नाही असं होईल का? तुम्हीच विचार करा.


फॅक्टरी फार्म




पश्चिमी संस्कृतीमधे तर प्राणीमात्रांना तितकाही दर्जा मिळत नाही. मानवाचा जन्मं पृथ्वीवरील इतर प्राण्यांवर कुरघोडी करण्यासाठीच (डॉमिनियन) करण्यासाठी झाला असल्याची बर्‍याच ख्रिश्चनांची श्रद्धा असते. त्यात नफेखोरीची भर पडल्याने तर प्राण्यांचे जीवन असह्यच झाले आहे. प्राण्यांना "कच्चा माल" समजुन त्यापासुन खाद्य पदार्थ म्हणजे "पक्का माल" बनवत असल्याची त्यांची भुमिका असते. त्यामुळे इथे दुग्ध व्यावसायिकांच्या धंद्याला "फॅक्टरी फार्म" असेच नाव आहे.



फॅक्टरी फार्ममधे अमानुषतेच्या पुढच्या पायर्‍या गाठल्या जातात:


चौथी पायरी:गायींच्या genes मधे फेरफार करणे:


उत्पादन वाढवण्यासाठी genes मधे बदल करून संकरित गायी तयार करतात (हे काही प्रमाणात भारतातही होते). त्या संकरित गायी भरपूर दुध देतात. पण त्यामुळे गायींची जेनेटिकल एकात्मता नष्टं होण्याच्या मार्गावर आहे.


पाचवी पायरी:वाढीसाठी हार्मोन्सचा मारा:

गायीची शारिरिक वाढ लवकर व्हावी व तीने लवकर गर्भ धारण करावा म्हणुन हार्मोन्स दिले जातात. (आजकाल मुली लवकर वयात येतात हे आपण ऐकतो. का येणार नाहीत? गायींना दिलेले ते वाढीचे हार्मोन दुधातुन आपल्या मुलींना आपणच पाजतो नं?)


सहावी पायरी:हालचालींवर बंधने:

गायींना हालचाल करायला जागा देत नाहीत. याचे दोन फायदे असतात. एक तर हालचाल नं केल्याने सर्व उर्जा दुध अथवा चरबी बनवण्यात खर्च होते. दुसरे म्हणजे तेव्हढ्याच जागेत जास्तं गायी मावु शकतात.

ह्या सर्व अत्याचारांमुळे त्यांना अर्थातच अनेक असाध्य रोग होतात. पार खंगल्यामुळे तीन ते चार वर्षातच त्यांचा मृत्यु होतो. आजारी गायींवर ऍंटिबायोटिक्सचा प्रचंड मारा करतात. त्यांना दिलेले हार्मोन्स आणि ऍंटिबायोटिक्स मग दुधातही आढळतात.


गायींना या यातना आपण जन्मभर भोगायला लावतो. मग आपल्या पूर्वजांनी यदाकदाचित गायींना मारून खाल्लेही असेल तर त्यात इतके वाईट वाटण्यासारखे काय आहे?


अजुनही तुम्ही हा लेख वाचताय याबद्दल तुमचे आभार.


कोणी काय खायचे हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे. जर तुम्हाला फार विचारच करायचा नसेल, तर हा लेख अर्थातच तुमच्यासाठी नाही. पण आपल्या ताटात पडणारे अन्नं कसे तयार झाले आहे याचा विचार करणे जर तुम्हाला गरजेचे वाटत असेल, किंवा मानवतेच्या किंवा धर्माच्या दृष्टिकोनातुन आपण काही तरी अयोग्य करत आहोत ह्याची जाणिव जर तुम्हाला झाली असेल तर माझ्या पुढच्या लेखाची वाट पहा. आहार, आरोग्य आणि पर्यावरण या दृष्टिकोनातुन चर्चा पुढील लेखात.




छायाचित्रे फार्म सॅंक्चुअरीच्या सौजन्याने.

Saturday, September 27, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग २: आहार

बबनराव: डॉक्टर, हल्ली फार थकवा जाणवतो. लॅक्टोज घेत जाऊ का मी सकाळ संध्याकाळ?
डॉक्टर:(हसत) छे छे बबनराव, काही तरी काय? अहो मोठ्यांना लॅक्टोजची काही गरज नसते. चांगले जेवत जा भरपूर आणि मी हे टॉनिक देतो ते घ्या काही दिवस.
थोड्या वेळानंतर
संपतराव:डॉक्टर, हल्ली फार थकवा जाणवतो. दुध घेत जाऊ का मी सकाळ संध्याकाळ?
डॉक्टर: अवश्य!
खरं म्हणजे बबनराव आणि संपतरावांनी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारला होता. (कारण लॅक्टोज हा दुधातला सर्वात प्रमुख घटक आहे.) मग डॉक्टरांनी बबनरावांना वेड्यात काढले पण संपतरावांना मात्रं मान्यता दिली असे का?


कारण "दुध प्या" असे डॉक्टर किंवा आहारतज्ञ जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा दुधातील प्रोटीन आणि मिनरल्स (कॅल्शियम आदी) ही आवश्यक तत्वे तुम्हाला मिळतील ही त्यामागची भावना असते. मात्रं एका गोष्टीकडे डॉक्टर व आहारतज्ञ सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. ती म्हणजे दुधात जितकी उपायकारक तत्वे असतात त्यापेक्षा जास्त अपायकारक तत्वे असतात.


प्रश्नं: दुध हे खरेच अमृत आहे का?


उत्तर: होय, बैलाच्या वाढीसाठी दुधासारखे दुसरे अमृत नाही.


प्रश्न: आणि माणसासाठी?


उत्तर: हे तुमचे तुम्ही ठरवा.


प्रश्न: दुधात असते तरी काय?


उत्तर:





लॅक्टोज हे साखरेचे एक स्वरूप आहे. चरबी(फॅट)मधे कॉलेस्टरॉल असते. (आहारातुन मिळणारे कोलेस्टरॉल फक्त प्राणिजन्य पदार्थातुनच मिळते. वनस्पतींमधे कॉलेस्टरॉल नसते.)

म्हणजे उपायकारक तत्वे ४%, अपायकारक तत्वे ८% आणि उरलेले पाणी असा सरळ हिशोब आहे. शिवाय गायीला अथवा म्हशीला हार्मोन्स, एंटिबायोटिक दिले असेल तर ते ही.

उपायकारक तत्वांपैकी B12 वगळता सर्व घटक वनस्पतीजन्य पदार्थातून मिळू शकतात. फोर्टिफाईड सिरियल मधुन B12 ही मिळु शकते.

दुधातून मिळालेले कॅल्शियम हाडांसाठी चांगले नसते असे काही तज्ञ मानतात. फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिनने दिलेला हा लेख वाचा.

http://www.pcrm.org/resources/education/nutrition/nutrition7.html

मग असे असताना आपल्या पुर्वजांनी दुधाची इतकी भलावण का केली असावी? सर्वच परिस्थितीत दुध वाईट असते का? जेव्हा अन्नाची उपलब्धता आजच्या इतकी नव्हती आणि शारिरीक श्रम हे जिवनाचा अविभाज्य भाग होते तेव्हा दुध हे आहारतील कमतरता भरून काढू शकत होते. आपल्या सुखवस्तु शहरी रहाणीमानाला मात्रं दुधाची काडीमात्रं आवश्यकता नाही. डायबेटिस, हृदयविकार, लठ्ठ्पणा अस्थिविकार असे रोग सामान्यतः पांढरपेशांनाच झालेले आढळतात त्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे दुध.

अर्थात आपल्या खाण्यापिण्यामधे सामाजिक आणि आर्थिक मुल्येही तितकीच महत्वाची असतात. दुध प्यायचे नाही तर चहा कसा पिणार? गोड काय खाणार असे प्रश्नं आपल्याला आणि इतरांना स्वाभाविकपणे पडणारच. हे प्रश्न सोडवणे आजच्या काळात फारसे कठीण नाही. सोया, तांदुळ, बदाम, हेम्प यापासून बनवलेले दुध -दही बाजारात उपलब्ध आहे.

मानवतेच्या किंवा प्रकृतीच्या दृष्टिकोनातुन तुमच्या ओळखीपैकी कोणी दुध घेत नसेल तर "कसलं हे फॅड?"अशी टिंगल नं करता त्यांना सहकार्य करा.

संदर्भ व अधिक माहिती:

http://www.milkfacts.info/Milk%20Composition/Milk%20Composition%20Page.htm

दुध आणि पर्यावरण पुढील लेखात.

Friday, September 26, 2008

ऑफ द ग्रिड

एकीकडे पर्यावरणाच्या प्रश्नावर जगभरातील सरकारे तसेच आंतरराष्ट्रिय समुदाय मुंगीच्या पावलानी प्रगती करत आहेत. तर दुसरीकडे काही नागरिक त्यांच्या परीने अथक प्रयत्नं करत आहेत. येथील स्थानिक व्हिजिटेरियन सोसायटीचे सदस्य श्री रॉन न्युमन हे गेल्या अनेक वर्षांपासून उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहेत इतकेच नव्हे तर अतिरिक्त उर्जा बनवून ती विकतही आहेत. काही अगदी साधे उपाय आणि सोलर, जिओथर्मल असे एकत्रित उपाय त्यांनी केले आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या सर्वांची माहिती दिली तेव्हा त्याचे चित्रीकरण करण्याची संधी मला मिळाली.
यु ट्युबवर १० मिनिटांची मुदत असल्याने दोन भागात विभागलेल्या ह्या व्हिडियो बघा:







गावो विश्वस्य मातरः - भाग ३: पर्यावरण

"छ्या! काही तरी काय? इतकं चांगलं ताजं, नैसर्गिक दुध प्यायल्यानी पर्यावरणाचा र्‍हास कसा होईल? काय वेडबिड लागलंय का तुला? हे सगळं व्हेगन प्रकरण बंद कर आधी." अशा प्रकारची वाक्ये मला बरेचदा ऐकायला मिळतात.
हा विषयच चक्रावुन टाकणारा आहे. अवांतर गप्पा करताना पाच दहा मिनिटात मांडु शकेन असा हा मुद्दाच नाही. मी स्वतः अशाच प्रकारच्या साशंक दोलायमान मनस्थितीतुन गेलेली असल्यामुळे इतरांना मी समजुन घेऊ शकते, पण समजावु शकत नाही. अर्थात बहुतेकांना समजुनच घ्यायचे नसते हा भाग निराळा.
व्याख्या:(तुम्हाला पटो अथवा नं पटो) दुध हे द्रवरूपी मांस आहे. त्यामुळे यापुढे या लेखात मांस हाच शब्द द्रवरूपी किंवा घनरूपी मांसासाठी वापरणार आहे.
नोव्हेंबर २००६ मधे फुड एंड एग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/ या अहवालाप्रमाणे मांसासाठी पाळलेल्या प्राण्यांमुळे होणारे प्रदुषण हे वाहनांनी होणार्‍या प्रदुषणापेक्षा जास्त आहे.
आजकालचे तथाकथित पर्यावरणवादी "घरातील विजेचे बल्ब बदला", "सेल फोन चार्जरला लावून ठेवु नका" वगैरे हास्यास्पद उपाय सांगत असतात.
काही थोडा अधिक संयुक्तिक विचार करणारी मंडळी "कार चालवण्याऐवजी मी पायी चालतो/सायकल चालवतो/पब्लिक ट्रांसपोर्ट वापरतो" असे अभिमानाने सांगतात. पण हे सगळं करण्यापेक्षा किंवा करूनही मांस खाणे/पिणे सोडले तर पर्यावरणाचे कितीतरी पटीने संवर्धन होइल.
प्रश्न: खाद्य साखळीमधील मोठे प्राणि छोट्या प्राण्यांना खातात. मग आपण मांस खाल्लं तर काय बिघडलं?
उत्तर:
निसर्गाचे संतुलन हे प्रजातींच्या सुदृढ परस्परावलंबनावर(सुप) अवलंबुन असते.
या उलट रोगट परस्परावलंबनामुळे (रोप) संतुलन बिघडत जाते.
सुपचे उदाहरण: वाघाला भुक लागली. त्याने जंगलात फिरून हरणांच्या कळपाचा माग काढला. वाघाची चाहुल लागताच हरणे पळू लागली. एक म्हातारे हरिण मात्रं वेगाने पळू शकत नव्हते. ते हरिण वाघाने पकडले व खाल्ले. हरिणांच्या कळपातील ते दुबळे हरिण नाहिसे झाल्याने कळप अधिक सुदृढ झाला. तिसरीकडे हरणांच्या संख्येला आळा बसल्याने जंगलातील हिरवळ कायम टिकुन राहिली.
इथे वाघ आणि हरिण आपापले नैसर्गिक जिवन जगत आहेत. आपण हरणापेक्षा श्रेष्ठं आहोत अशा भावनेने वाघ जंगलात वावरत नाही. जगण्यासाठी आपण या हरणांवर अवलंबुन आहोत, आजुबाजुच्या हिरवळीचे ते आपल्या खाद्यात रुपांतर करतात हे वाघाला चांगल ठाऊक आहे.
रोपचे उदाहरण: वाघाला सारखी-सारखी शिकार करण्याचा कंटाळा आला. मी इतका सामर्थ्यवान असताना मला या तुच्छं हरणांच्या मागे तडमडायची काय गरज? असा विचार त्याच्या मनात डोकावु लागला. म्हणुन त्याने एक युक्ति केली. झाडे कापून एक कुरण तयार केले. त्या कुरणात हरणे आणून सोडली. हरणे पळून जाऊ नये म्हणून कुरणाला कुंपण घातले. भूक लागली की वाघ चांगले मोठे हरिण मारून खाऊ लागला.
त्यामुळे पुढची प्रजा तयार करण्यासाठी केवळ रोगट हरणेच शिल्लक राहीली. हरणांना विविध प्रकारचा पाला न मिळाल्यामुळे हरणे दुबळी झाली. त्यांचं मांस निकृष्टं चवहीन होत गेलं. पण वाघाला आता शिकार कशी करायची तेही आठवेना, म्हणून त्याने चवीकडे दुर्लक्षच केले. हरणांच्या सततच्या चरण्याने कुरणात फारसे गवत उगवेनासे झाले. मग वाघाने आणखी झाडे कापायला सुरूवात केली. हळुहळु वाघाकडे दहा कुरणे झाली. हरणांचे उरलेले मांस तो इतर वाघांना विकु लागला. आता वाघांना हवे तेव्हा हवे तितके मांस मिळू लागले. त्याचे पाहुन इतर वाघांनीही झाडे कापून कुरणे तयार केली. हरणांच्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे कुरणांकडे लक्ष ठेवण्यासाठी आता आपल्याला बरीच पिल्ले व्हावी असे वाघांना वाटु लागले. त्यामुळे त्यांनी चार चार वाघिणींशी लग्नं करायला सुरूवात केली. दुसर्‍या वाघाची आपल्या वाघिणीवर नजरही पडू नये म्हणून वाघिणींवर बुरखा घालण्याची सक्ति करण्यात आली. वाघाची पिल्ले तरणी ताठी झाली तशी त्यांची कुरणे वाढू लागली. जंगल कमी कमी होत गेल्याने जंगलातील इतर प्राणि नामशेष होऊ लागले. काही हजार वर्षांनी अख्ख्या पृथ्वीवर हरिण आणि वाघ हे दोनच प्राणि शिल्लक राहिले. उरलेल्या हरणांना गवत कुठुन आणायचे असा गहन प्रश्नं समस्त व्याघ्र समुदायासमोर उभा राहिला.
तात्पर्य: मी सांगुन काही उपयोग आहे का? कोहमच्या म्हणण्याप्रमाणे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पुढच्या पिढीला ही खोडच लागणार नाही अशी काळजी घेतली तर ते त्यांच्या हिताचे ठरेल.

Thursday, September 25, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग ४: आयुर्वेद

आयुर्वेदानुसार दूध हे अमृत आहे हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. ग्रंथांचे वाचन नं करता किंवा तज्ज्ञांना नं विचारता बहुतेकांनी त्याच्यावर विश्वासही ठेवलेला असतो. आयुर्वेदात खरोखर याविषयी काय लिहीले आहे हे जाणुन घेण्याची इच्छा होती. भारतात गेले असताना केवळ योगायोगाने औरंगाबाद येथील वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचे नाव कळले. संपर्क साधताच त्यांनी मोठ्या मनाने, सर्वतोपरी प्रयत्नं करून माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचा अल्पपरिचय:

शिक्षण: आयुर्वेद विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन व पिएचडि

१९७१-१९९८ मुंबई,नागपुर व नांदेड येथे शासकिय विद्यालयात प्राध्यापक.

१९९८-२००० पोतदार मेडिकल कॉलेजचे डिन
२०००-२००४ डायरेक्टर ऑफ आयुर्वेद, महाराष्ट्र शासन.

प्रश्नोत्तरे:

प्रश्नं १: रोज दूध पिणे जरूरी आहे असे बहुतेकांना वाटते.आयुर्वेदाचा या बाबतित काय सल्ला आहे?

उत्तर: दररोज दूध पिण्याची गरज नाही. योग्य रितीने तयार केलेली भारतिय थाळी सर्व आवश्यक जिवनसत्वे(व्हिटॅमिन), रोग प्रतिकारक तत्वे(इम्युनायझर्स) व खनिजे (मिनरलस) यांनी परिपूर्ण असते. थाळीतील प्रथिने (प्रोटिन) व इतर पौष्टिक तत्वांनी आरोग्य लाभते, वृद्धिंगत होते व टिकुन रहाते. परंतु सप्लिमेंटसची आवश्यकता असलेल्यांनी खालील नियमांचे पालन करून दुधाचे सेवन करावे:

नियम क्र १: दुधाचे सेवन करण्यापुर्वी आधी खाल्लेले सर्व अन्न पचलेले असायला हवे. अर्धे पचलेले अन्नं पोटात असताना सेवन केल्यास रोगकारक अवस्था तयार होते. वात कफ व पित्त या विकारांमधे एकाच वेळी वाढ होते.

नियम क्र. २: अजिबात व्यायाम नं करणार्‍याने अजिबात दूध प्यायचे नाही.

नियम क्र ३: चांगली भुक लागल्याशिवाय कधीही प्यायचे नाही.

नियम क्र ४: दूध आणि फळं कधीही एकत्रं खायची नाहीत.

नियम क्र ५: रात्री दूध कधीही प्यायचं नाही.

नियम क्र ६: सकाळी उठल्यावर लगेच दूध प्यायचं नाही.

नियम क्र ७: व्यायामकरून भूक लागल्यावरच प्यायचं.

प्रश्नं २: वाढत्या वयाच्या मुलांनी दिवसातुन एकदा किंवा दोनदा दूध प्यावे असा सर्वसाधारण समज आहे. आयुर्वेद या बाबतित काय सांगते?


उत्तर: वयाच्या ५-६ वर्षापर्यंतच दूध द्यावे.


प्रश्नं ३: गरोदर स्त्रियांनी दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: सप्लिमेंटसची आवश्यकता भासल्यास गरोदर स्त्रिया दूध पिऊ शकतात, मात्रं उत्तर क्र. १ मधील नियम पाळणे आवश्यक आहे.

प्रश्न ४: स्तनपान देणार्‍या मातेला दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: वरील क्रं ३ प्रमाणेच

प्रश्न ५: आहारात दुग्धजन्य पदार्थांचा वापर टाळुन सुदृढ जिवन जगणे शक्य आहे का?

उत्तर: आहारातील इतर घटक कोणते यावर अवलंबुन आहे. भारतिय थाळी पद्धतीचे जेवण उपलब्ध असल्यास शक्य आहे.

प्रश्न ६: आयुर्वेदात दुधाचे पर्याय सुचवले आहेत का?

तुप, ताक,मुगडाळ, सुके खजुर,आवळे इ. द्यावे. (अपवाद पाच ते सहा वर्षापर्यंत)

प्रश्न ७: गायींचे पालनपोषण व आहार या विषयी आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदात या विषयी जे नियम आहेत, त्यात उत्पादन वाढीपेक्षा गुणवत्तेवर भर दिलेला आहे. ते नियम खालीलप्रमाणे:

  • दिवसा गाय गोठ्यात बांधलेली नसावी. गायीला दिवसभर चरायला सोडणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे हिरवे गवत जिथे नैसर्गिकरित्या उगवते तेथे गाईला चरायला द्यावे. अशा ठिकाणी सहाजिकच गवताची निवड गाय स्वतःच करते. विविध प्रकारच्या गवतामुळे दुधात आवश्यक गुण निर्माण होतात.
  • बाहेर ढगाळलेले वातावरण नसावे. दिवसभर फिरून होणारा व्यायाम व दिवसभर मिळणारा सूर्याचा स्वच्छ प्रकाश यामुळे गायीचे आरोग्य सुधारते.
  • संध्याकाळी परत आल्यावर गाईचे दूध काढावे. त्या दुधात तिखट कडु व तुरट हे आवश्यक रस भरपूर प्रमाणात आढळतात. असे दूध चवीला गोड लागते, पचायला हलके असते तसेच आरोग्यवर्धक असते. असे दूध आवश्यकतेनुसार, उत्तर क्र १ मधे सांगितलेल्या नियमांचे पालनकरून रोज प्यायला हरकत नाही.

प्रश्नं ८: वर सांगितलेले नियम नं पाळता दूध काढले असेल,उदा. गोठ्यात बांधलेल्या गाईचे दूध काढले असेल तर त्या दुधाचे तुप किंवा दही खाल्ले तर चालते का?

उत्तर: अगदी कमी प्रमाणात. दररोज ४०-५० मिली ताक पिता येईल.



क्रमशः

पुढील भागात वरील माहितीचे संदर्भ.
विशेष आभार: वैद्या सौ. चारूस्मिता शहा, अमरावती.

Monday, August 18, 2008

लोकशाही व जनमानस

लोकशाही - आपल्याला सद्ध्या माहित असलेल्या राजकीय व्यवस्थेतील सर्वात यशस्वी लोकप्रिय प्रणाली. असे असले तरी ही व्यवस्था आदर्श, परिपूर्ण आहे असे म्हणता येत नाही. लोकशाहीच्या मर्यादा वेळोवेळी दिसून येतात. या मर्यादांच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मनुष्य स्वभाव.


एरवी राजकारणाशी फारसा संबंध असलेल्या अथवा नसलेल्यांवर नेता निवडीची महत्वाची जबाबदारी टाकली असते. या कर्तव्याचे पालन नागरिकांनी जागरूकतेने, सारासार विचाराने करावे अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात काय होते? अनेकदा अज्ञान, विसंगती, स्वार्थ, आकस, गैरसमज,पूर्वग्रह यातून अतिशय असंबद्ध निर्णय मतदानाच्यावेळी घेतले जातात.


सद्ध्या अमेरिकेत निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्या अनुषंगाने उदाहरणादाखल अमेरिकेतील दोन महत्वपूर्ण मतदार गटांच्या वर्तणुकीचे विश्लेषण या लेखात करणार आहे.


९९% टक्के साक्षरता असलेल्या या देशात गोरे, काळे, लॅटिनो (मूळचे मेक्सिको अमेरिकेतील लोक) इतर अशी साधारण वर्गवारी होते. मूलभूत सुखसोयी प्रसार माध्यमे बहुतेक सर्वांना उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांनी सारासार विचार करून, देशापुढील प्रश्न चांगल्या रितीने सोडवू शकणारा नेता निवडावा ही अपेक्षा फारच माफक आहे. पण ती पूर्ण होत नाही हे ह्या दोन प्रातिनिधिक उदाहरणांवरून दिसून येते.


गट पहिला: ख्रिश्चन मूलतत्ववादी: (ख्रिमू)


देशासमोर कुठलेही प्रश्न असू देत. येत्या निवडणुकीत मह्त्वाचे ठरलेले मुद्दे म्हणजे वाढती बेकारी, आर्थिक मंदी, इराक युद्ध या कशा कशाशी यांना देणे घेणे नाही. यांच्या दृष्टीने महत्वाचे असे दोनच प्रश्न किंवा उद्दिष्टे आहेत. पहिले उद्दिष्ट म्हणजे अमेरिकेतील स्त्रियांचा गर्भपाताचा अधिकार काढून घेणे. या मुद्द्यावर ते स्वतःला "प्रो-लाईफ" असे म्हणून घेतात. अर्थात या तथाकथित प्रो-लाईफ लोकांना इराक मधे किंवा इतर कुठे बळी पडलेल्यांबद्दल फारशी सहानुभूती नसते. "लाईफ" हे केवळ अमेरिकन नागरिकांचंच असतं बरं का. या गटाचे दुसरे उद्दिष्टं म्हणजे समलिंगी लोकांना कुठलेही अधिकार, विषेशतः लग्न करण्याचे अधिकार मिळू नये. स्वतःची ही मते स्वतःपुरती मर्यादित नं ठेवता कायद्याच्या माध्यमातून इतर सर्वांवर लादण्याचा, समलिंगींना वैयक्तिक व सामाजिक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा या गटाचा प्रयत्नं सतत सुरू असतो. मतदान करनाता ह्या विचारांशी सहमत असणार्‍यालाच मत दिले जाते.


गट दुसरा: ज्यूईश मूलतत्ववादी (ज्यूमू)

हा गट संख्येने पहिल्या गटापेक्षा फार लहान असला तरी यांची आर्थिक ताकत फार जबरदस्त आहे. आज कुठलाही उमेदवार या गटाला नाखूष करू धजत नाही. अमेरिकेच्या आर्थिक नाड्या ह्या गटाच्या हातात आहेत असे म्हंटले तरी अतिशयोक्ति ठरू नये. अर्थात अमेरिकेतील कट्टर ज्यू या गटात मोडतात हे सांगायला नकोच. अमेरिकेत रहायचे, इथे पैसा कमवायचा, पण निष्ठा मात्रं सदैव इस्त्राईलला वहायच्या असे यांचे वर्तन असते. पॅलेस्टिनियन लोकांच्या न्याय्य मागण्यांचे तुम्ही नुसते समर्थन जरी केले तरी ते तुम्हाला थेट हिटलरच्या पंक्तीत नेऊन बसवतील. इस्त्राईलचे अस्तित्वच धोक्यात आहे असा यांचा कायमचा, पक्का समज असतो. अमेरिकेचे हित कशात हा प्रश्न यांना पडतच नाही. इस्त्राईलला आंधळा पाठिंबा देणार्‍या उमेदवारालाच यांचे मत पडणार हे नक्की.



तर केवळ एका मुद्याला धरून बसलेले हे प्रातिनिधिक गट. असे इतरही काही गट आहेत. सद्ध्या बोराक ओबामा यांची बरीच हवा आहे. तरूण ओबामांमधे करिष्मा आहे, तडफ आहे, हमखास गर्दी खेचण्याची ताकद आहे. समर्थकांकडून प्रचार मोहिमेसाठी ते विक्रमी पैसाही उभा करू शकले आहेत. अशा रितीने लोकांना प्रेरित करणारा नेता बर्‍या वर्षांनी अमेरिकेला मिळाला आहे असे म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. या उलट प्रतिस्पर्धी जॉन मकेन हे अजिबात करिष्मा नसलेले तापट ढुढ्ढाचार्य आहेत. असे असले तरी ओबामांचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर नाही, तो या अशा गटांमुळे. विद्यमान अध्यक्षा बुश यांना दुसर्‍यावेळी अनपेक्षित विजय मिळवून देण्यामागे या दोन गटांचाच हात होता हे विसरून चालणार नाही. गर्भपाताविषयी ओबामांच्या उघड भूमिकेमुळे ख्रिमू अगदी त्यांच्या विरुद्ध आहेत. अर्थात जॉन मकेनही या मुद्द्यावर संदिग्ध आहेत हीच ओबामांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणावी लागेल.

ओबामांचे इस्त्राईल धोरण संदिग्ध आहे. शिवाय ईराणशी बोलणी करण्याचा त्यांचा मानस त्यांनी आधीच जाहीर केला आहे, त्यामुळे ज्यूमू त्यांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता आहे. अर्थात ओबामांच्या विरोधात जसे हे दोन प्रातिनिधिक गट आहेत तसेच त्यांच्या समर्थक गटांमधेही असे काही एखादे विशिष्टं उद्देश असणारे गट उदा. प्रो चॉईस, प्रो गे गट आहेतच. अशा परस्पर विरोधी गटांमुळे त्यातल्या त्यात संतुलन राखले जाते हे ही खरेच.


तात्पर्य: लोकशाहीच्या समर्थकांनी या व्यवस्थेला आदर्श समजून स्वस्थ बसू नये. सद्ध्या अस्तित्वात असलेल्या पर्यायांपैकी त्यातल्या त्यात चांगला पर्याय, किंवा आदर्श पर्यायाकडे जाण्याची पहिली पायरी असे म्हणावे फार तर. याहून अधिक चांगली राज्यव्यवस्था पुढच्या टप्प्यात निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्नं सुरू ठेवायला हवेत.

Tuesday, June 24, 2008

साहित्य संमेलानात मराठी ब्लॉग्जची दखल घ्यावी

मराठी साहित्य संमेलन बे एरियात घ्यायचा निर्णय संमत झाला आहे. त्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याने माध्यमांना नवा खुराक मिळाला आहे.
या गदारोळात खालील सूचना कराव्याशा वाटतात:
१. साहित्य संमेलनाने मराठी ब्लॉग विश्वाची दखल घ्यावी. मराठी ब्लॉग्ज अद्याप म्हणावे तितके परिपक्व झालेले नसले तरी विविध विषयांवरील उत्तम लेखनही इथे वाचायला मिळते हे ही खरेच. हे महत्वपूर्ण माध्यम साहित्य संमेलनात वगळले जाऊ नये असे वाटते. मराठी लेखकांनी या माध्यमाचा स्वीकार करून त्याला अधिक सशक्त करायला हवे. त्यासाठी मुळात आधी त्यांची या माध्यमाशी ओळख होणे हे फार गरजेचे आहे. आज एकाही प्रमुख मराठी साहित्यिकाचा स्वतःचा असा ब्लॉग नाही. त्यांचे साहित्य ब्लॉगवर वाचायला मिळते ते इतरांनी प्रसिद्ध केले म्हणून. लेखक आणि हे माध्यम यातील डिजीटल डिव्हाईड कमी व्हायला हवा. त्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत असे वाटते.
२. साहित्य संमेलनात तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक लोकांना त्यात सहभागी करून घ्यावे. मराठी साहित्य परिषदेचा स्वतःचा ब्लॉग असावा. त्यात संमेलनाविषयी अद्ययावात,उपयुक्त माहिती उपल्ब्ध करून द्यावी. लाइव्ह टेलिकास्ट पूर्वी केले गेले आहे की नाही हे मला माहित नाही.पण लाईव्ह टेलिकास्ट तसेच दूरसंचार माध्यमांच्या मदतीने जगभरातील साहित्यप्रेमींना प्रत्यक्ष सहभागी करून घ्यावे.

यासंबंधी कोणाशी संपर्क साधावा हे माहित नसल्याने ब्लॉगवर ही पोस्ट टाकत आहे. आपल्याला याविषयी काय वाटते? कृपया इथे प्रतिक्रिया द्या किंवा तुमच्या स्वतःच्या ब्लॉगवर लिहा.

Monday, April 21, 2008

गावो विश्वस्य मातरः भाग ५ आयुर्वेद संदर्भ

गावो विश्वस्य मातरः भाग ४ मधील प्रश्नोत्तरांचे संदर्भ या लेखात दिले आहेत. वैद्यांशी फोनवर बोलताना लिहून व रेकॉर्ड करून घेतलेली माहिती योग्य रितीने संपादित करायला जरा वेळ लागला. मला संस्कृत येत नाही, शिवाय मूळ ग्रंथ हाताशी नव्हते. त्यामुळे जे ऐकले आहे ते बरोबर उतरवले आहेत की नाही ही मोठी शंका होती. या श्लोकांचा अर्थ लावणे, व्याकरण तपासणे, संधी-विग्रह करणे या कामात बहुमोल मदत केल्याबद्दल प्रशांतचे आभार. वैद्य श्री अनंता धर्माधिकारी यांचे पुन्हा एकदा आभार.
संदर्भ क्रं १
आमाभिभूतकोष्ठस्य क्षीरं विषमहेरिव
(अष्टाङ्गहृदय चिकित्सास्थान अध्याय १, श्लोक १९)
[कोष्ठ=कोठा; क्षीर=दूध]

अर्थ
शरीराच्या पचनसंस्थेमधे नं पचलेल्या अन्नाचे कण असतील आणि त्यात दूध टाकलं गेलं तर ते अन्नंही खराब होतं व दूधही खराब होतं. पहिलं खाल्लेलं पूर्ण पचल्याशिवाय दूध प्यायचं नाही हा नियम नेहमी पाळावा.

संदर्भ क्रं २

जीर्णे अष्णीयात्

(चरक विमानस्थान अध्याय १, श्लोक २५/४)
अर्थ
पहिलं अन्नं संपूर्ण पचल्याशिवाय दुसरं अन्नं पोटात टाकायचं नाही.

संदर्भ क्रं ३
प्रातराशे त्वजीर्णेऽपि सामयाशो न दुष्यति

सायमाशेऽर्जीर्णे तु प्रातराशो प्रदुष्यति
(चरक चिकित्सास्थान अध्याय १५, श्लोक २३७,२४१,२४२,२४३)

[प्रातराशे (प्रात: + आशे - सकाळी घेतलेले)

त्वजीर्णेऽपि (तु + अजीर्णे + अपि) --तु= परंतु, अपि=सुद्धा, अजीर्णे= न पचलेले

सायमाशो न(सायम् + अश: + न -- विसर्गाचा ओ होण्याचा नियम इथे लागु होतो)-- सायंकाळचा आहार (घेणे) त्याप्रमाणेच दुसर्‍या ओळीत सायम् आशे अजीर्णे तु प्रात: आशो प्रदुश्यति अशी फोड होईल.]

अर्थ

विशेषतः सकाळी दूध पिताना हा विचार प्रामुख्याने करावा की रात्री खाल्लेलं पूर्ण जिरलं आहे की नाही. एखाद्या वेळी सकाळचं खाल्लेलं अन्नं पचलं नसेल आणि त्यावर चुकून काही खाल्लं किंवा दूध प्यायलं गेलं तर फारसं बिघडत नाही, पण रात्री खाल्लेलं जर पचलं नसेल तर त्यावर सकाळी काही खाल्लं किंवा दूध प्यायलं तर मात्रं ते नक्कीच खराब होतं व त्यामुळे रोग होतात.


संदर्भ क्रं ४
दिवाकर अभितप्ताणां व्यायाम अनिल सेवनात्
वातानुलोमी श्रान्तिघ्नं चक्षुष्यं च अपरान्हिकम्
(सुश्रुत सूत्रस्थान अध्याय ४५, श्लोक ६०,६१)

अर्थ
ज्या गाई दिवसभर सूर्याच्या प्रकाशाने तप्त होतात, भरपूर फिरतात अशा गाईंच दुपारी काढलेले दूध हे अत्यंत आरोग्यकारक असतं आणि ते नेहेमी उकळून घ्यावं


संदर्भ क्रं ५
व्यायाम दीप्ताग्नि वयस्थ बलशालिनां विरोधि अपि न पीडायै:
(अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय ७, श्लोक ४७)
अर्थ
जे तरूण आहेत, नेहेमी व्यायाम करतात, ज्यांची पचनक्रिया (अग्नी) उत्तम आहे अशांच्या प्रकृतीला दूध (पचायला जड असलं तरी) विरोध करत नाही.

Thursday, April 03, 2008

खिडकीबाहेर:खारूताईचे घरटे

खिडकीबाहेर नावाचे एक नवे सदर सुरू करते आहे. वरच्या मजल्यावरच्या माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघितले की बरेच मित्रं दिसतात. त्यांना कॅमेरॅत बंदिस्त करणे मात्रं कठिण असते. कॅमेरा ऑन करे पर्यंत ते भूर्रकन किंवा सर्रकन दुसरीकडे गेलेले असतात.
ह्या खारूताईचा घरटे बांधण्याचा कार्यक्रम साधारण आठवडाभर चालला होता. तोंडात पानं गोळा करायची, सरसर वर चढायचे आणि पुन्हा खाली उतरायचे. जवळ जवळ आठवडाभर सतत हा एकच उद्योग!. आता ही चढ उतर होताना दिसत नाही त्यावरून कच्ची-बच्ची आली असतील किंवा येण्याच्या मार्गावर असतील असे वाटते.
वाचकांना की बघ्यांना (?) विनंती: पहिल्यांदाच ब्लॉगवर माझी स्वतःची व्हिडिओ टाकते आहे. आवडल्यास प्रतिक्रिया द्या जमलं तर. नीट दिसत नसेल वा वेग समाधानकारक नसेल तर मात्र नक्कीच कळवा.

Saturday, March 08, 2008

दिसामाजी काहीतरी....पण काय? भाग २

ट्युलिपने हयात नसलेल्या लेखकांच्या रचनांबद्दल प्रश्न विचारला आहे. सर्वांच्या सोयीसाठी त्यासंबंधीची माहिती स्वतंत्रं पोस्टमधे देते आहे:
मी काही कोणी वकील बिकील नाही, पण इंटरनेटवर, विशेषतः
या दुव्यावर जी माहिती मिळाली ती थोडक्यात मराठीत देत आहे:
सद्ध्याचा आंतरराष्ट्रिय प्रताधिकार कायदा, ज्यावर जगातल्या बहुतेक देशांनी सह्या केल्या आहेत, त्यानुसार:
१. कुठल्याही रचनेचे प्रताधिकार रचना मुर्त स्वरूपात उतरल्या क्षणापासुन रचनाकाराच्या मृत्युनंतर ७० वर्षे पर्यंत रचनाकाराकडेच रहातात.
२. रचनाकार "ही रचना सार्वजनिक वापरासाठी आहे" असे सांगु शकतात, मात्रं तसे त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितलेले असावे लागते. तसे सांगितल्यावर अर्थातच रचनाकाराच्या हयातीतही त्या विशिष्ट रचनेची प्रत करता येते.
३. रचनाकार प्रताधिकार इतरांना (वारस, ट्रस्ट किंवा प्रकाशक) देण्याचा करार करू शकतात. सर्व हक्कं स्वाधिन करण्यासाठी कायदेशीर लिखित करार करणे आवश्यक आहे.
४. प्रताधिकार वैयक्तिक संपत्तीत बसत असल्याने रचनाकाराच्या मृत्युनंतर ते हक्कं त्याच्या/तिच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित होतात. ह्यासंबंधी त्या त्या देशातील कायदे लागु पडतात.
५. कायदेशीर वारस नसलेले रचनाकार बहुदा मृत्युनंतरचे हक्कं प्रकाशक किंवा एखाद्या ट्रस्टकडे देऊन ठेवतात.
६. रचनाकारास कायदेशीर वारस नसेल व मृत्युनंतर हक्कं कुणला दिले नसतील तरी ही मृत्युनंतर ७० वर्षेपर्यंत कोणीही प्रती काढु शकत नाही.

Friday, March 07, 2008

दिसामाजी काही तरी...पण काय?

"दिसामाजी काही तरी लिहावे" याचा अर्थ बरेचसे ब्लॉगर "दिसामाजी काही तरी ढापावे" असा काढताना दिसत आहेत. ट्युलिपच्या लेखाची गौरवीने केलेली चोरी अयोग्य आहे.
गड्यांनो, तुम्हाला वेळ आहे, फुकट आहे, एखादी कविता/पुस्तक आवडते, कॉपी पेस्ट करता येते म्हणुन वाट्टेल ते ढापायचा अधिकार मिळत नाही.
विदग्धचे
प्रताधिकाराचे कवित्व फारच बोलके आहे.

अभ्यासु किंवा हौशी ब्लॉगर्सनी श्रेयासहित इतरांचे संदर्भ देणे ठिक आहे. परंतु तुमच्या ब्लॉगवर जाहिराती असतील तर तो चोरलेल्या मजकुराचा चक्कं व्यावसायिक उपयोग ठरतो याचे भान ठेवावे.
हयात नसलेल्या लेखकांचे/कवींचे साहित्य आपण बिनदिक्कत प्रसिद्ध करू शकतो हाही एक गैरसमज आहे. त्या रचनांचे कायदेशीर प्रकाशन हक्कं अजुनही कुणाकडे असण्याची शक्यता आहे.
प्रकाशनाचे हक्कं हे लिखित मजकुरापुरतेच मर्यादित नसतात. दृक्श्राव्य माध्यमांनाही तेच नियम लागु पडतात. बर्‍याचश्या ब्लॉग्जवर चोरलेली छायाचित्रे दिसतात. छायाचित्रं तुम्ही स्वतः काढलेले नसेल तर मुळ छायाचित्रकाराच्या परवानगीने श्रेयासहित प्रसिद्ध करावे.

Wednesday, March 05, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग पाच

खरं तर ज्याच्यापासुन दूर जायचे त्याच्यासारखे पर्याय तरी का धुंडाळावेत माणसानी?पण मनाला एखादी गोष्ट पटली तरी शरीराची सवय ही सवय असते, ती जाता जाताच जाते. म्हणुन पर्याय शोधत असतो आपण. आता ह्या भागात काही मांसाहाराचे पर्याय सांगणार आहे, पण खरोखरच हे पर्याय आहेत की नाही हे मांसाहार करण्यार्‍यानेच ठरवावे. मी स्वतः कधीच मांसाहार केला नसल्याने त्याचे पर्याय धुंडाळायची कधी गरज वाटत नाही. व्हिगन बनु पहाणार्‍या मांसाहारी लोकांसाठी अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. याला मॉक मिट - खोटे मास असे म्हणतात. एरवी खर्‍याच काय पण खोट्या मांसाहारी पदार्थांकडेही मी ढुंकुन पहात नाही. पण खाली दिलेले पदार्थ मात्रं त्याला अपवाद आहेत. कशाचे पर्याय म्हणुन नव्हे तर निव्वळ चांगले लागतात म्हणुन!!








सायटान/सेटान अथवा व्हिट ग्लुटन:

गव्हापासुन बनवलेले असते म्हणुन याला व्हिट मीटही म्हणतात. घरीही बनवता येते. बाजारात तयारही मिळते. सायटानचे तुकडे करून बिर्याणी, कबाब किंवा नुसती रस्सा भाजी करून बघा.

टेम्पे:
फसफसलेल्या (फ़रमेंटेड) सोयाबियांपासुन बनवलेले टेंम्पे मुळचे इंडोनेशियातले खाद्य आहे. टोफुपेक्षा टेम्पे सरस आहे कारण ते पूर्ण धान्यापासुन बनवले जाते. प्रक्रिया केलेले नसते आणि त्यामुळे पचायला सोपे असते. टेम्पेचे चौकोनी तुकडे करून जरा तेलावर परतुन घ्यावे. परतलेले तुकडे वर तिखट मिठ लावुन नुसते एपेटायझर/साईड डिश म्हणुन वाढता येतात किंवा फ्राईड राईसमधे घालता येतात.


फिल्ड रोस्ट कंपनीचे सॉसेज:
बाजारात व्हिगन सॉसेजेसचे बरेचसे प्रकार उपलब्ध आहेत. परंतु फिल्ड रोस्ट कंपनीच्या एपल सेज सॉसेजची सर कशालाही येत नाही. सॉसेजचे हव्या त्या आकाराचे तुकडे करून ते तव्यावर जरासे तेल घालुन परतुन घ्यावे. नुसते खायलाही किंवा केचप किंवा मस्टर्ड बरोबर चांगले लागतात. बारीक तुकडे करून कोरड्या भाजीत टाकता येतात, भाताच्या प्रकारात तसेच कबाबमधेही चांगले लागतात.

फिल्ड रोस्ट कंपनीचे सिलेब्रेशन रोस्ट:

सिलेब्रेशन रोस्टच्या स्लाईसेस नुसते एपेटायझर म्हणुन वाढता येतात. बर्गरची पॅटी म्हणुन किंवा झटपट चांगले पोट भरणारे सॅंडविच बनवण्यासाठीही छान उपयोग होतो.

वरीलप्रमाणे पदार्थ करून बघा. सुग्रणींनो आणि वाचकांनो स्वतःची रचनात्कमता वापरून ह्या साहित्यापासुन नविन नविन पाककृतीही करून बघा आणि तुमच्या प्रयोगाबद्दल नक्की कळवा.

अश्विनी, तु विचारलेल्या काही पदार्थांची तरी माहिती वर आली आहे. इतर पुढील भागात.

Wednesday, February 27, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग चार



आईस्क्रिमचे पर्याय:



दुधाच्या पर्यायांहुनही जास्त प्रकारची व्हिगन आईसक्रिमं उपलब्ध आहेत.



ही फक्तं काही उदाहरणे:






या शिवाय स्मुदी, जिलाटो, सोरबे, थंड दही यांचेही प्रकार पुष्कळ उपलब्ध आहेत:











बिस्किट (कुकीज) व कन्फेक्शनरीचे प्रकार:

हे पर्यायही दिवसागणिक वाढतच आहेत. काही उदाहरणे:


चॉकलेटचे पर्याय:

शुद्ध चॉकलेट खरं तर व्हिगनच असतं. खिशाला परवडावं म्हणुन दुध आणि साखरेची 'भेसळ' केली जाते. व्हिगन चॉकलेटसही डार्क चॉकलेटच्या रूपात उपलब्ध आहेत. चव जीभेवर रूळायला वेळ लागतो, पण एकदा गडद चवीची सवय झाली की साधी चॉकलेटं आवडेनाशी होतात. बहुतेक चांगल्या कंपन्यांची काही चॉकलेटस तरी व्हिगन असतात. मिल्क चॉकलेट असे लिहिलेले नसेल तर सहसा व्हिगन असते, पण लेबल बघुन सहज खात्री करून घेता येते.



काही पर्याय:




शिवाय दिलीपची चॉकलेट बक्लावा पाककृती इथे पहा:
http://www.dilip.info/baklava.html



Sunday, February 24, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग तीन

ह्या मालिकेला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
व्हिगन या शब्दाला वन्यज असा शब्द मी भाग एक मधे सुचवला होता.
एटम यांनी हरिताहार हा शब्द सुचवला असला तरी हा शब्द फक्त आहारापुरताच आहे त्यातुन जिवनशैली प्रतित होत नाही. हरेकृष्णाजींनी त्यांच्या भाषा विशारद स्नेह्यांचा सल्ला विचारला, त्यानुसार वन्यज हा शब्दच योग्य आहे.
प्रशांत यांनी विरोपाद्वारे हरितज हा शब्द सुचवला आहे. तसेच वजन्य हा थोडा फेरफार केलेला पर्याय मला सुचला आहे. एटम यांनी व्हिगन हाच शब्द जसाच्या तसा मराठीत वापरायला हरकत नाही असे (अप्रकाशित प्रतिसादाद्वारे) सुचवले आहे. हरितज हा शब्द मलाही आवडला आहे. अर्थात दोन -तीन प्रतिशब्द असायलाही काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटते ते जरूर कळवा.
अश्विनीने पोलेंटा, स्ट्रॉंबोली,कुसकुस,सैटान,राईसब्रान, एक्स्ट्रा वर्जिन ऑलोव्ह ऑइल, काळे तांदुळ, हातसडीचे तांदुळ व एव्होकॅडो या विषयी अधिक माहिती विचारली आहे. ती पुढील भागांमधुन प्रकाशित करेन.
एका वाचकांनी विरोपाद्वारे ही एक नविन पाककृती पाठवली आहे. ती कशी वाटली ते कळवा. वाचकाच्या इच्छेनुसार त्यांचे नाव प्रसिद्ध केलेले नाही.

पौष्टिक उसळ
साहित्य:सर्व प्रकारच्या डाळी (प्रत्येकी एक मूठ), पाणी (डाळी भिजवायला), तेल १-२ डाव, तिखट, मीठ, हळद, हिंग, जिरे, मोहरी, दोन हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, आलं (एक चहाचा चमचाभर किसून), कांदा (बारीक चिरून), कोथिंबीर (चिरून)
कृती:सर्व डाळी अर्धवट शिजवून घेणे. (साधारणपणे दाताने सहज चावता येतील पण बोटाने दाबल्यास पीट होणार नाहीत इतपत शिजवाव्या.) मायक्रोवेव असल्यास पाण्यात भिजवून ३-७ मिनिटे (डाळीच्याप्रकारानुसार) मायक्रोवेव्ह मध्ये गरम केल्यास अर्धवट शिजतात. चण्याच्या डाळीला शिजायला जास्त वेळ लागतो, मसूर डाळ खूप लवकर शिजते, त्यामुळे आवश्यक असल्यास डाळी स्वतंत्र शिजवाव्या. नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा कढईत तेल मध्यम आचेवर गरम करावे. त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर जिरे, मिरची, कढिपत्ता, आलं टाकून थोडं हलवावं. नंतर कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतावा. त्यानंतर हळद, हिंग घालावे व अर्धवट शिजवलेल्या सर्व डाळी घालाव्यात. थोडं परतल्यावर चवीनुसार मीठ व तिखट घालावे. व थोडं पाणी शिंपडून अर्धी कोथींबीर घालावी. मंद आचेवर २ मिनिटात एक वाफ आली की कढई स्टोव्हवरून उतरवावी व उरलेली कोथींबीर घालावी.ही उसळ गरम गरम खायला चांगली लागते.
टीप:
१. सर्व डाळी पौष्टिक असल्या, तरी त्या पचणं तितकच महत्त्वाचं आहे. पचनाच्या व पौष्टिकतेच्या दृषिने उतरता क्रम मूग, उडीद, तूर, चणे, मसूर, असा आहे. त्यात राजमा, वाटाणे यांची भर घालता येईल. पचनशक्तीनुसार व आवडीनुसार डाळींचं प्रमाण बदलावे.
२. आवडत असल्यास खोबर्‍याचा कीस (किंवा खवलेला नारळ), शेंगदाणे, घालावे. मस्त चव येते. दाणे घालायचे असल्यास उकडून घ्यावे.
३. ही उसळ रेफ़्रीजरेटरमध्ये आठवडाभर तिकते. त्यामुळे जास्त प्रमाणात करून ठेवता येते.
४. याच उसळीत पाणी घालुन शिजवल्यास मिश्र डाळींच वरण तयार होईल. त्यात चिंच, गूळ घालून लज्जत वाढवता येईल. (परदेशात राहणार्‍या स्वयंपाक करावा लागणार्‍या पुरुषांना हे अत्यंत सोयीचं आहे.)५. या उसळीत चिवडा, कॉर्नफ़्लेक्स, कछ कांदा, चाट मसाला घालून 'भेळ'सदृश चटपटीत पदार्थ बनवता येतो.
६.शेंगदाण्याऐवजी बदामाचे काप, मनुका वगैरे सुका मेवा घाता येईल (भारतातील टी.व्ही.वरील पाकक्रियांचे कार्यक्रम स्टाईल :) )

Thursday, February 14, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग दोन

दुधाचे पर्याय:

सोया, तांदुळ, बदाम, ओट, हेझलनट व हेम्प पासुन बनवलेली दुधे सद्ध्या अमेरिकेत उपलब्ध आहेत.


(म्हंटलं नव्हतं पर्याय वाढतात म्हणुन?) वरील बरीच दुधे घरी बनवता येतात.

चहा कॉफीत घालण्यासाठी सोया दुधाचे क्रिमर मिळते.
केकमधे किंवा बेकिंग करायच्या इतर पाककृतींमधे सोया किंवा नारळाचे दुध घालता येते.
तुप,लोण्याचे पर्याय:
मार्जरिन या प्रकारात मोडणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात सॅचुरेटेड फॅट असलेले उत्पादन टाळावे. कधी कधी दाण्याचे तुप, बदामाचे तुप हे पर्याय ठरू शकतात, पदार्थावर अवलंबुन आहे. गुळाच्या पोळीबरोबर बदामाचे तुप चांगले लागते.
कसंकायची शिफारस: अर्थ बॅलन्स




चीजचे पर्याय:

चीज हा प्रोसेस्ड पदार्थ असल्याने अजिबात खाऊच नये हा कसंकायचा सल्ला आहे.
चीज शिवाय उत्कृष्ट पिझ्झा तयार होऊ शकतो. टॉमॅटो सॉस, मशृमचे तेल, चीज नं घालता केलेले पेस्टो सॉस हे पर्याय. ऒर्डर करतानाच चीज नको असं सांगता येतं.
अगदीच रहावत नसेल तर मात्रं सोयापासुन बनवलेली अनेक उत्पादने उपलब्ध आहेत.
पॅन्जिया नावाचे ऑन लाईन व्हिगन दुकान आहे. त्यात बरीच उत्पादने उपलब्ध आहेत.

कसंकायची शिफारस:

पॅन्जियात मिळणारे शीस व्हिगन चीज




अंड्याचे पर्याय:

बेकिंग करताना अंड्याचा उपयोग जर आर्दता वाढण्यासाठी केला असेल तर त्याऐवजी सफरचंदाचे सॉस घालता येते. फुलण्यासाठी अंड वापरलं असेल तर एनरजी एग रिप्लेसर वापरा:




टीप:

१. या लेखातील छायाचित्रे त्या त्या उत्पादनांच्या संकेतस्थळांवरून घेतली आहेत. वस्तु कशी दिसते ते कळले की घेणे सोयीचे होईल हा एकमेव उद्देश आहे. कुठल्याही उत्पादनांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. या किंवा इतर लेखांमधुन कसंकायला कुठलाही आर्थिक लाभ होत नाही.

२. विशिष्टं पाककृतींविषयीचे प्रश्न मिंटसकिंवा दिलीपयांना विचारल्यास जास्तं चांगलं.

क्रमशः




Wednesday, February 13, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग एक.

पर्यावरण, नैतिकता व आरोग्याच्या दृष्टिने प्राणिजन्य पदार्थ कमी वापरा असे सांगणारे लेख सातत्याने या ब्लॉगवर मी प्रकाशित केले आहेत. वाचकांचा प्रतिसादही चांगलाच मिळाला आहे. याविषयीची वैचारिक भुमिका मांडणे यापुढेही सुरूच ठेवणार आहे. वाचकांनी हे विचार आचरणात कसे आणायचे याबद्दल अधिक माहिती विचारली असल्याने ही नविन मालिका सुरू केली आहे.


पहिली पायरी म्हणजे व्हिगन या शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधुन काढणे. वनस्पतीजन्य या शब्दापासुन वन्यज हा शब्द सुचला आहे. (अधिक चांगला शब्द सुचवा.)
व्याख्या: वन्यज जिवनपद्धती
आहार व वापरात प्राणिजन्य पदार्थ टाळण्याचा प्रयत्नं करणारी जीवनपद्धती म्हणजे वन्यज जीवनपद्धती.
ही जीवनपद्धती आचरण्यामागे पर्यावरणाचे रक्षण, प्राण्यांविषयी सहानुभुती व आरोग्य संवर्धन तसेच विविध चविष्टं खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे ह्यापैकी काही वा सर्व हेतु असु शकतात.
ह्या विषयी प्रकाशित केलेले सर्व लेख
इथे वाचा.
वन्यज जीवनपद्धतीमुळे खाण्याचे पर्याय कमी होतील अशी भिती सुरवातीला वाटते. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तुंमधे वन्यज पदार्थ कमी असतात. पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे ज्या प्राण्यांचे दुध,अंडी किंवा मांस आपण खाण्यायोग्य समजतो असे प्राणी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यात माशांची भर घातल्यास फार तर दोन्ही हाता पायांची बोटे वापरावी लागतील. (चु,भु,दे.घे.) आता डाळी, धान्ये, कडधान्ये, भाज्या, पालेभाज्या, फळे, शेंगा, सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ यांच्या जाती मोजुन पहा. शेकड्यांच्या वर जातात. (नुसत्या चहाचे पन्नास एक तरी प्रकार आहेत.) मग हे शेकडो पर्याय उपलब्ध असताना डझन दोन डझन नाही म्हणुन काय इतकं घाबरायचं? आभाळ छोटं छोटं करून घेतलेल्यांना मोकळ्या आभाळाची कल्पनाही करवत नाही तसं काहीसं आहे हे.

लोकांना जे हवे असते ते बाजारात उपलब्ध होते. इथे अमेरिकेतल्या बहुतेक किराणा दुकानात वन्यज दुध, तयार पदार्थ, इतकंच काय सोयापासुन तयार केलेले वन्यज मांसही मिळु लागले आहे. रेस्टॉरेंटसमधे व्हिजिटेरियन व्हिगन डिशेस उपलब्ध होत आहेत. मागणी तयार झाली की पुरवठा आपोआपच होऊ लागतो.

मी स्वतः स्वयंपाकात कच्चे लिंबु असल्याने पाकशास्त्राचे फारसे सल्ले फार देऊ शकत नाही. म्हणुन या कामात मदत करण्यासाठी मींट्सला विनंती केली आहे. वदनी कवळ घेता या ब्लॉगवर व्हिगन पाकशास्त्रावर सुगरणीचा सल्ला द्यायचा प्रयत्नं मिंटस करणार आहे. (धन्यवाद मिंटस!)

पुढच्या लेखात दुधाच्या पर्यायांची माहिती. तोपर्यंत वन्यज खाद्यपदार्थांचे हे दोन महत्वपूर्ण ब्लॉग्ज वाचा (म्हणजे नीट वाचा)
१. गेल्या तीन साडेतीन वर्षात बायकोला रोज रात्री वन्यज जेवण, तेही एकदाही पुनरावृत्ती नं करता खाऊ घालणार्‍या रसोयाचा ब्लॉग इथे बघा:
http://dilipdinner.blogspot.com/
२. लेकाला निरनिराळे वन्यज पदार्थ डब्यात बांधुन देणार्‍या आईचा ब्लॉग इथे बघा:
http://veganlunchbox.blogspot.com/ (हल्ली ही बाई स्वतःचे पुस्तक विकण्याच्या नादात आहे, पण जुन्या पोस्टस चांगल्या आहेत.)


क्रमशः

Tuesday, February 05, 2008

लोकनृत्य

डोसीडो, स्विंग युवर पार्टनर, लेडिज चेन, एलमॅन लेफ्ट, सर्कल राईट, जिप्सी मेल्ट डाऊन.....

हिवाळ्याच्या दिवसात व्यायाम करण्याचे पर्याय कमी. बाहेर बर्फ पडलेले असताना सायकल चालवणे,चालणे,धावणे जरा जीवावरच येते. जिम एके जिम करूनही कंटाळा येतो.अशा वेळी डान्स करण्याने चार भिंतींच्या आत राहुन व्यायाम आणि करमणुक दोन्ही साधले जाऊ शकते. पण क्लब,पब,रेस्टॉरेंटसमधील धुरकट, कर्कश्शं वातावरण नको वाटत असेल तर लोकनृत्य हा एक चांगला पर्याय आहे.


महाराष्ट्राचा स्वतःचा सामुहिक/लोकनृत्य असा काही प्रकार नाही. कोळीनृत्य, आदिवासी नृत्य असली तरी ती मर्यादितच आहेत. आपल्या इथल्या शास्त्रिय किंवा लोकनर्तकांना सहसा इतर राज्यातल्या नृत्य प्रकारांकडेच वळावे लागते. नवरात्रीच्या निमित्त्याने मराठी तरूण तरूणी हिरीरीने गरब्यात सहभागी होतात ते याच कारणासाठी.

आपल्या संस्कृतीत स्त्री-पुरूषांनी एकत्रं येऊन नृत्य करणे हेच खुप झाले. एकमेकांना प्रत्यक्ष स्पर्ष नं करता टिपर्‍यांचा वापर होतो. युरोप, रशियामधे विविध प्रकारची लोकनृत्ये आहेत. तिथे स्पर्शाचा बाऊ नसल्याने हालचालींमधे मोकळेपणा व वैविध्य असते. तर अशी ही विविध लोकनृत्ये युरोपातुन अमेरिकेत आली हे सांगणे नं लगे.

गावागावात कॉंन्ट्रा डान्स, स्क्वेअर डान्स अशा सारख्या नृत्यांचे आयोजन होते. खेळीमेळीचे वातावरण, लहानापासुन मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग व लोकसंगीताचा साज. सोप्या स्टेप्समुळे फार चांगलं नाचता आलंच पाहिजे अशीही अट नाही. सहसा अर्धा तास आधी बेसिक स्टेप शिकवण्याचा क्लास असतो. बरोबर पार्टनर आणलाच पाहिजे किंवा मुलगा-मुलगीच पार्टनर असले पाहिजे असे ही काही नाही.

उदाहरणार्थ कॉन्ट्रा डान्सची ही व्हिडिओ पहा: