Showing posts with label वाईल्ड फायर इन कॅलिफोर्निया. Show all posts
Showing posts with label वाईल्ड फायर इन कॅलिफोर्निया. Show all posts

Friday, October 26, 2007

वणवा

दक्षिण कॅलिफोर्नियातील आग अजुन आटोक्यात आलेली नाही. लाखो लोक विस्थापित झाले आहेत आणि अब्जावधी डॉलरची मालमत्ता आगीत भस्मसात झाली आहे. तेथील मराठी ब्लॉग लेखक, वाचक तसेच इतर सर्व या संकटातुन सुखरूप बाहेर पडतील अशी आशा करू या.
अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही अशा आपत्तींचा सामना करणे शक्य नाही. आपण इथले कर्ते करविते नाही हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. कॅलिफोर्निया, नेवाडा, युटा, एरिझोना, कोलोरॅडो या राज्यात असलेल्या वाळवंटी प्रदेशात निसर्गाने अनेक आश्चर्यांची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. ग्रॅंड कॅनियन, ब्राईस कॅनियन या सारखी सौंदर्य स्थळे बघण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातुन आलेले प्रवासी इथल्या प्रतिकुल हवामानाचा सामना करत या स्थळांना भेटी देतात.
या भागात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे, तरीही ही आश्चर्यकारक स्थळे निर्माण होण्याला पाणीच कसे कारणिभूत आहे हे आर्चिस नॅशनल पार्क मधे दाखवण्यात येणार्‍या माहितीपटात बघायला मिळते.
आजच्या लेखाचा विषय अर्थातच पाणि नसून आग आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगींच्या मागची कारणे काय?
दगड धोंड्यांनी भरलेला वाळवंटी प्रदेश, पाण्याचा अभाव, बहुतांश खुरटी झाडे. जमिनीच्या ज्या भागात नियमितपणे थोडेसे का होईना, पाणि झिरपत असले की त्या आधारावर थोडी फार मोठी झाडे तग धरतात. वातावरणात आर्दता नसल्याने खाली पडलेली पाने, काटक्या इ. सहजा सहजी कुजत(डिकंपोज) नाहीत. उलट वाळल्यानी ती अधिकच ज्वालाग्राही बनतात.
प्रश्नं:
लाखो वर्षांपासून जर हीच परिस्थिती आहे तर हे जंगल आधीच का भस्मसात झालं नाही?
उत्तर: त्याचं कारण आहे निसर्गानी केलेली एक सोय. अशा जंगलात जेव्हा वादळ होते आणि विजा चमकतात, तेव्हा छोट्या छोट्या आगी सतत लागत असतात. एका विशिष्टं प्रकारे झाडावर वीज पडली की त्या झाडातील सर्व बाष्प एका क्षणात बाहेर पडते आणि झाडाला आग लागते. ती आग आजूबाजूला पसरते आणि त्या परिसरातील छोटी झाडे, झुडपे व इतर ज्वालग्राही पदार्थ जळून खाक होतात. मात्रं त्याच बरोबर पाऊसही पडत असल्याने आग फार मोठी होत नाही. अशा रितीने ज्वालाग्राही कचरा वरचे वर नष्टं होतो. त्याशिवाय मोठ्या झाडांमधे योग्य अंतरही राखले जाते. ही आग नेहेमीचीच असल्याने येथील जीवसृष्टी त्यापासून आपला बचाव सहज करू शकते.
प्रश्न:
मग आताच मोठी आग का लागली? तीही मनुष्य वस्तीच्या जवळच का लागली?
उत्तर:
अशा प्रतिकुल परिस्थितीत जेव्हा प्रगत माणसे तिथे रहायला आली तेव्हा जंगलातील एकुण एक झाड आपल्या उपयोगी तरी पडावे असे त्यांना वाटु लागले. त्यामुळे त्यांनी नैसर्गिकपणे लागलेल्या या आगी विझवायला सुरूवात केली. सुरवातीला त्यामागे कदाचित चांगलीच भावना असेल. वाळवंटात झाडांना आगीपासून वाचवणे म्हणजे निसर्ग संवर्धन करणे असेही बर्‍याच लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. भावना चांगल्या असल्या तरी निसर्गाच्या कामात ढवळा ढवळ करण्याचे परिणाम हानिकारकच असतात. गेल्या काही दशकात या छोट्या आगींची उपयुक्तता जंगल नियोजन करणार्‍यांच्या लक्षात आली आहे. (हल्ली जमेल तिथे मुद्दाम अशा आगी लावण्यात येत आहेत. याला प्रिस्क्राईब्ड फायर असे नाव आहे.)
पण दरम्यानच्या काळात इथे मोठमोठ्या वस्त्या उभारल्या गेल्या. विहीरी, छोटी धरणे वाढत गेली आणि शहरे वसली. कोलोरॅडो नदीवर बांधलेल्या हुवर धरणाचे पाणि आले आणि लॉस एंजिल्स, सॅन दियेगो अशी प्रचंड आकाराची शहरे तयार झाली. मनुष्य वस्तींजवळ आगी नकोत म्हणून तेथील आगी विझवण्याचे काम सातत्याने सुरू राहिले.
अशा रितीने मनुष्य वस्त्यांजवळ ज्वालाग्राही पदार्थांचा खच वाढतच गेला. एका दृष्टिने हा बॉंब बर्‍याच वर्षांपासून टिकटिक करतो आहेच. तज्ञांना ते माहिती असुनही फार काही करता येत नव्हते. त्यात कोणी नतद्रष्टं माणसांनी जोराचा वारा वहात असताना मुद्दाम तीन आगी लावल्याचा संशय आहे. आता याला काय म्हणावं?
अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस?