Tuesday, August 22, 2006

प्रश्नं आपल्या काळातले

मागच्या लेखात म्हंट्ल्याप्रमाणे Animal Right 2006 या conference मधे मी जे ऐकले, पाहिले, शिकले त्याच्या आधारावर लिहिलेले हे एक स्वैर मनोगत.

आधीच्या पिढ्यांचा मला नेहेमीच हेवा वाटत आला आहे - त्यांच्यापुढे देशाला स्वातंत्र्यं मिळवुन देणे, किंवा संयुक्तं महाराष्ट्राचा आग्रहं धरणे अशी उदात्त ध्येये अस्तित्वात होती. स्वातंत्र्यानंतर तब्बल वीसेक वर्षांनी जन्माला आलेल्या माझ्या पिढीसाठी असे कुठलेही ध्येयं शिल्लक राहिलेल नसल्यामुळे स्वत:ची प्रगती करुन घेणे या खेरीज दुसरे काहीही काम उरलेले नाही असा माझा समज होता. जगाचं एकुण बरं चाललं आहे, बहुतेक देश स्वतंत्र आहेत, महायुद्धांची संख्या अजुन तरी २ वरच थांबली आहे (हल्ली कधी कधी तिसरे महायुद्धं सुरु आहे की काय असा संशय मात्रं येऊ लागला आहे.) गुलामगिरी, अस्पृष्यता अशा प्रथा कालबाह्य झाल्या आहेत. आणि सगळं काही आलबेल असल्यामुळे विज्ञानाची प्रगती होते आहे, त्यामुळे जगभरातल्या तरुणांना चांगल्या नोकर्‍य़ा मिळताहेत. आता बेरोजगारी, हुंडाबळी, बाल कामगार असे प्रश्नं आहेत म्हणा, पण ते कमी होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षणाचा प्रसार झाला की तेही प्रश्न निकालात निघतील म्हणुन मी गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार्‍या प्रथम ईंटरनॅशनल, शंकर पापळकरांचे बालगृह अशा संस्थांना जमेल तितकी मदत करुन आपले सामजिक ॠण फ़िटले असा स्वतःचा गोड समज करुन घेत होते.

पण Animal Rights conference 2006 ला जाऊन आल्यानंतर मात्रं माझे डोळे खाडकन उघडले आहेत. माणसाची हुशारीच (ज्याचा आपल्याला फ़ार अभिमान आहे) त्याचा महशत्रू ठरणार आहे. आपल्या हातुन पर्यावरणाचा असाच र्‍हास होत राहिला, तर आपले दिवस भरलेले आहेत असे समजायला हरकत नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे पुढची काही हजार वर्षे सुद्धा मानवजात टिकणार नाही अशी भिती शास्त्रज्ञांना आता वाटु लागली आहे.

पर्यावरणाच्या द्रुष्टीने खालील बाबी फ़ार निराशाजनक आहेत.
१) हुशारी हा गुण प्राण्यांचा वंश टिकण्याचा दॄष्टीने फ़ारसा महत्वाःचा नाही. पर्यावरणाच्या द्रुष्टीने गांडुळ हा प्राणी आपल्यापेक्षा फ़ारच सरस आहे. जगात एकही माणुस शिल्लक राहिला नाही तरी इतर जीवांचे काहीही बिघडणार नाही, गांडुळांशिवाय मात्रं आपण एक दिवसही जगु शकणार नाही.
२) पर्यावरणाच्या असंतुलनामुळे आपल्याला अगदी नजिकच्या भविष्यात नैसर्गिक आपत्ती, विविध रोग अशा गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे.
३) गरिबी, आतंकवाद, एड्स अशा मानवी प्रश्नांमधे आपण इतके गुरफ़टलो आहोत की पर्यावरणाचा विचार करायलाही आपल्याला वेळ नाही - त्याला महत्वं देणे तर सोडाच.
४) काही क्षेत्रात आपण अतिशय विद्वान असलो तरी ecologically आपला बुध्यांक मतिमंदांच्या गटात मोडेल. याचे कारण असे की इतर प्राणी वर्ग हे आपल्या पुढच्या पिढीला त्रास होईल अशी कुठलीही गोष्टं जाणुन बुजुन करत नाहीत. याच्या अगदी उलट आपण!!!

पॄथ्वीचे वय सुमारे ४000५00000 (४.५ बिलियन) वर्षे आहे असे समजले जाते. आधुनिक मानव वंश हा गेल्या ५0,000-६0,000 वर्षापासुन अस्तित्वात असल्याचे मानल्या जाते. गेल्या केवळ २०० वर्षाच्या काळात झालेला र्‍हास हा पृथ्वीच्या इतिहासात झालेला सर्वाधिक र्‍हास आहे.
http://www.climatecrisis.net/thescience/
http://www.globalpolicy.org/socecon/hunger/environment/index.htm


ह्या सगळ्या गोष्टींचा Animal Rights शी संबंध तरी काय?
Animal Rights Movement ची सुरुवात नैतिकतेच्या जाणिवेतुन झाली आहे. अमेरिकेतील Civil Rights Movement यशस्वी झाल्यानंतर समानतेच्या वर्तुळामधे प्राण्यांनाही सामिल करुन घेतले पाहिजे, आपल्या क्षुद्रं स्वार्थासाठी त्यांचे हाल करु नयेत अशा विचारांच्या लोकांनी हे आंदोलन सुरु केले आहे. (उद्या Tree Rights Movement सुरु झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मानवी आक्रमणामुळे हिसकावुन घेतलेले सर्व ह्क्कं आपण परत केले पाहिजे असे वाटणार्‍यांची संख्या कमी नाही.) आज मात्रं पर्यावरणवादी आणि प्राणि हक्कंवाले हे एका माळेचे मणी झालेले दिसुन येतात कारण त्यांना त्यामधे समान धागे सापडले आहेत.

अमेरिकेला मांस पुरवण्यासाठी, रोज कित्येक एकर ऍमेझॉन्चे रेनफ़ॉरेस्ट नष्टं होतं आहे. मांसाहारी अन्नाची निर्मिती करण्यासाठी लागणार्‍या पाणि, जमिन इ. भांडवलात त्याचापेक्षा दसपट शाकाहारी अन्न-धान्याचं उत्पादन होऊ शकते.
अमेरिकेत आज वाळवंट असलेल्या ऊटा, कॅलिफ़ोर्निया इ. ठिकाणी एकेकाळी घनदाट जंगल होतं हे आज कोणाला सांगुन सुद्धा खरं वाटणार नाही. सतत गायी म्हशींच्या चरण्याने आज त्या जंगलाचे वाळवंटात रुपांतर झाले आहे. तीच अवस्था काही वर्षात रेन फ़ॉरेस्टची होणार आहे.

इतर प्राण्यांचा नैसर्गिकपणे जगण्याचा हक्कं आपण मान्य केला आणि त्यांचे हॅबिटॅट जाणिवपुर्वक राखुन ठेवले तर पर्यावरणाचा र्‍हास बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

मानववंश हा या जगात अगदी पाहुणा ठरावा इतका नविन आहे, पण आपल्या आधीपासुन इथे वास्तव्य करुन असलेल्या इतर प्रजातींचे हक्कं मात्र आपण सहजपणे हिरावुन घेतले आहेत. मानवी गरजा भागवण्यासाठी रोजच्य रोज कितीतरी प्राणि तसेच वनस्पतींचे हॅबिटॅट नष्टं होत आहे.

प्राणि हक्कं विरोधी तर्क असे आहेत.
१)मनुष्य प्राणि हा सर्व श्रेष्ठं आहे आणि Survival of the fittest हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे इतर प्राण्यांना कसेही वागवले तरी ते नितिमत्तेत बसणारे आहे.
२)झाडांनाही जीव असतो - झाड मारले काय किंवा प्राणि मारला काय - हत्या ती हत्याच

ह्या विधानांना अनेक भुमिकेतुन विरोध करता येतो. त्या सर्व तर्कातील मला भावलेले तर्क हे पर्यावरण आणि जागतिक शांतता आणि न्यायाशी निगडित आहे.

Survival of fittest हा निसर्गाचा एकमेव नियम नाही. त्या नियमा बरोबर खालील नैसर्गिक नियमही तितकेच लागु पडतात:
प्रजातींची विविधता (Law of diversity), प्रजातींचे परस्परावलंबन (Law of Interdependance) आणि मोजकी साधन संपदा (Law of Limited Resources)
या नियमांप्रमाणे अशाच जर प्रजातींमागे प्रजाती नष्टं होत राहिल्या तर अखेर आपला विनाश अटळ आहे.
मानववंश सर्वश्रेश्ठं हा अहंकार आपण सोडला पाहिजे. चत्रेपणा करता येत नाही म्हणुन प्राणि बुद्धीमान नाहीत, हा गैरसमज दूर करायला पहिजे. इतकी विद्न्यानाची प्रगती होऊनही आपण फ़ारतर १०० वर्षे जगु शकतो - पण समुद्रातील तसेच जमिनीवरील कित्येक प्राणि पर्यावरणाशी संतुलन राखुन दोन-दोनशे वर्षे जगु शकतात, साधी फ़ुलपाखरं कुठल्याही उपकरणांच्या मदतीशिवाय दरवर्षी हजारो मैलांचे स्थलांतर करु शकतात. ही प्रगती पिढ्या-दर-पिढ्यांच्या अभ्यासाशिवाय झालेली नाही.

सामाजिक न्यायाच्या परिघामधे सर्व जीवांना सामिल करुन घेतले पाहिजे.
निसर्गाच्या संतुलन नं राखता झालेली प्रगती ही प्रगती नसुन अधोगती आहे हे आपल्याला कधी कळणार?

आपल्या परीने काही तरी नक्कीच करायला पाहिजे हे पटले तरी आपण काय करु शकतो? वाहने चालवणे थांबवु शकतो? एयरकंडिशन शिवाय राहु शकतो? कळुनही आता फ़ार उशीर तर झालेला नाही ना?????????????
हे आहेत प्रश्नं आपल्या काळातले आणि आंदोलन आपल्या पिढीचे!!!

Wednesday, August 16, 2006

प्रवास

कधी तरी घडलेली एखादी छोटी घटना - इतकी क्षुल्लक की कदचित लक्षातही रहाणार नाही अशी! पण अनेक वर्षांनंतर मागे वळुन बघितलं तर त्याच छोट्याश्या घटनेनी अख्ख्या आयुष्याची दिशा बदलली, जणु एका क्षणात नदीचा प्रवाह निश्चीत केला, असा अनुभव तुम्हाला आला आहे का?

आठ्व्या किंवा नवव्या वर्गात असतानाची गोष्टं. आईने कुठले तरी औषध आणायला डोंगरकर औषधी केंद्रात पिटाळले असावे. डोंगरकरांचे दुकान तेव्हा जुन्या जागेत - राजापेठ पोलिस स्टेशनच्या बाजुला होते. डोंगरकर काका एकटेच दुकानात होते. आई बाबा कसे आहेत इ. औपचारिक गप्पा सुरु असतानाच माझी नजर काऊंटर वर पडलेल्या "माझे सत्याचे प्रयोग" या पुस्तकावर खिळली. मी हळुच पुस्तक चाळायला लागले आणि काका म्हणाले - "घेऊन जा वाचायला". मी पड्त्या फ़ळाची आज्ञा पाळली.
एरवी समोरच्या श्रीकांत वाचनालयातील कॉमिक्स, गोष्टीची पुस्तके अगदी मुखप्रुष्ठापासुन ते मागील पानावरील झावबाच्या वाडीतल्या त्या प्रकाशकांच्या पत्त्यापर्यंत वाचुन काढ्ली असली तरी काही तरी गंभीर वाचायची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी. घरी पोचताच सायकल स्टॅंड्ला लावुन पुस्तक घेऊन गच्चीत जाऊन बसले. पुस्तक एका बैठकीत संपवले की नाही हे काही आता आठवत नाही.
त्या पुस्तकातला सत्य अहिंसेचा संदेश मात्रा नं कळत कायमचा मनात घर करुन बसला आणि पुढच्या आयुष्याला मार्गदर्शक ठरला हे आता सुमारे २५ वर्षांनी लक्षात येतं आहे.
कॉलेज शिक्षण संपल्याच्या काळात एकुणच परंपरेची बंधनं कमी होऊ लागली होती आणि एरवी शाकाहारी असलेल्या आमच्या घरात चिकन-करीचा प्रवेश झाला - संदीप, अपर्णा सगळ्यांनी चाखुन बघितले, माझं मन मात्रं त्या बिचार्‍या कोंबडीला मरताना किती दु:ख झाले असेल या विचाराने अस्वस्थं झालं होतं.
चटकावलेले काही मित्रं त्यांच्या घरी चालत नाही म्हणुन आमच्या घरी आवर्जुन खायला यायचे आणि मी मात्र मुभा असुनही खात नाही हे बघुन चकित व्हायचे.
वंदना वहिनी तर एकदा म्हणाली की तुमच्या घरात येऊन आम्ही सगळ्या बाटलो आणि तूच कशी नाही बाटलीस?
पुढे अमेरिकेत आल्यावरही शाकाहारी रहाण्यासाठी चक्कं स्वयंपाक करायला सुरुवात केली.

अमेरिकेतील सहा वर्षाच्या वास्तव्यातील पाच वर्षे संपत आली आणि परतीची तयारी करत असताना तो भेटला - अनपेक्षित!!! इतरांपेक्षा अगदी वेगळा. हौशीने स्वयंपाक करुन इतरांना खाऊ घालणारा. स्वत:च्या PJs वर एकटाच खळ्खळुन हसणारा. नुसता शाकाहारीच नव्हे तर व्हिगन - कुठलाही प्राणिजन्य पदार्थ -दुध, अंडी इ. नं खाणारा, चामडं, रेशिम अशा प्राण्यांपासुन बनवलेल्या वस्तु नं वापरणारा. दया, क्षमा, शांती ही तत्वे आम्हाला दोघांनाही भावणारी. त्या धाग्य़ांवर सुरु झालेल्या मैत्रिचे हळु हळु प्रेमात रुपांतर झाले आणि माझा सहा वर्षाचा व्हिसा संपायच्या २५ दिवस आधी आम्ही विवाहबद्ध झालो.
त्याच्या बरोबरचे सहजीवन सुरु झाल्याला आता जवळ्पास एक वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात त्याच्या बरोबर अनेक व्याख्याने, चर्चांमधे सहभागी झाले. त्यातुन जगातील समस्यांचे एका वेगळ्या द्रुष्टिकोनातुन आकलन व्हायला लागले आहे. लहानपणी वाचलेल्या एका पुस्तकाने प्रभावित होऊन जो मार्गं स्विकारला आहे तो केवळ व्यक्तिगत आवड निवड या प्रकारात मोड्णारा नसुन, आरोग्य, पर्यावरण संतुलन, जागतिक शांतता आणि न्यायाच्या मार्गातील एक महत्वाची जबाबदारी आहे, हे हळु-ह्ळु लक्षात येते आहे.

दरम्यान - डोंगरकर काकांच्या दु:खद निधनाची बातमी मला कळली आहे. लग्नानंतर भारतात गेल्यावर त्यांना भेटुन त्या पुस्तकाची मी त्यांना आठवण करुन दिली होती, हेच समाधान.

नुकत्याच पार पडलेल्या Animal Rights 2006 या conference मधे नवर्‍याला व्याख्यानाचे निमंत्रण आले होते. त्या चonference मधे अनेक नविन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याबद्द्ल पुढील ब्लॉग मधे लिहिणार आहे.