Showing posts with label हिंदु. Show all posts
Showing posts with label हिंदु. Show all posts

Thursday, March 19, 2015

गुढीपाडवा आईचा

आईची इतकी महती असताना, दिवाळीत पाडव्याला ओवाळले जाते ते फक्त वडीलांना. आईला ओवाळण्याचा एकही सण अस्तित्वात नाही. या नवीन वर्षापासून दर गुढीपाडव्याला आईला ओवाळायची नवीन प्रथा सुरु करूयात का? पटले तर शेयर करा आणि आपल्या घरी ही प्रथा सुरु करा. ‪#‎aailaowala‬ (आईला ओवाळा) हा hashtag twitter वर सुरु करण्यात आला आहे. कृपया या गुढीपाडव्याला आईला ओवाळा व पोस्ट करा.

Friday, June 22, 2007

पुण्यजला गंगा

हिंदू धर्मात ज्या गोष्टी अतिशय पवित्रं मानल्या जातात त्या गोष्टींची स्वतःच अक्षम्य अवहेलना, विटबंना करायची हा आपला खाक्या आहे. पावित्र्यं आणि स्वच्छता याचा अर्थाअर्थी काही संबंध असल्याचे आपल्याला वाटत नाही. या उलट इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळी जाऊन पहा. शांतता,स्वच्छता, प्रसन्न वातावरण हे तिथे अनुभवायला मिळते.
गंगेचे उदाहरण घ्या. गंगा ही आपल्याला पूजनीय असल्यामुळे या विषयावर अनेक श्लोक आणि काव्ये रचली आहेत. गंगेच्या काठावर काय करू नये ते आपल्या पूर्वजांनी पुराणात सांगितले आहे:
गंगा पुण्यजला प्राप्य त्रयोदश विवर्जयेत।
शौचमाचमनं चैव निर्माल्यं मलघर्षणं॥
गात्रसंवाहनं क्रीडा प्रतिग्रहमथो रतिम।
अन्यतीर्थरतिं चैव अन्यतीर्थप्रशंसनम॥
वस्त्रत्यागमथाघातं सन्तारं च विषेशतः।
नाभ्यंगित प्रविशेच्च गंगाया न मलार्दित:॥
न जल्पन्न मृषा वीक्षन्न वदन्न्नृतं नर:।
स्वैर अर्थ:
पुण्यजला गंगेमधे मल-मूत्रत्याग, तोंड धुणे, दात घासणे, चुळा भरणे, निर्माल्य फेकणे, मळलेले अंग घासणे इ करू नये. स्त्री पुरूषांनी जलक्रीडा करू नये. दानाचे ग्रहण करू नये. अन्य तीर्थांची स्तुती करू नये. घातलेले कपडे गंगेत सोडू नयेत, पाण्यावर आघात करू नये तसेच पोहू नये. अंगाला तेल लावून अथवा मळलेल्या अंगानी गंगेच्या पाण्यात प्रवेश करू नये. गंगा किनार्‍यावर वृथा बडबड, खोटारडेपणा करू नये व अपदृष्टीने पाहू नये.
इतकं सगळं अगदी तपशीलात लिहिणार्‍या आपल्या पूर्वजांनी आपलं आताचं वर्तन पाहिलं तर ते काय करतील?
साबण लावून लावून कपडे धुणे,केस कापणे, मृतदेह टाकणे, शहरातील तसेच कारखान्यातील सांडपाणी सोडणे - अशी सर्व तर्‍हेनी चालेलेली ही विटबंना पाहून ते जीवच देतील (गंगेत नव्हे).
आपल्या स्वार्थासाठी धर्माचा वाट्टेल तसा अर्थ लावणारे पंडे आणि डोके नं वापरता, एकही प्रश्न नं विचारता त्यांच्यावर विश्वास ठेवणारे ते भाविक थोर आहेत!
धन्य गंगा धन्य तीचे भक्तं!


संदर्भ:


"श्री गंगाजी का दुरुपयोग":कल्याण मासिक वर्ष ८१, अंक सहा:गीताप्रेस, गोरखपुर

Tuesday, January 23, 2007

"वॉटर" ऑस्कर नामांकित

अपेक्षेप्रमाणे दिपा मेहतांच्या "वॉटर" ला फॉरेन फिल्म गटात ऑस्कर नामांकन प्राप्तं झाले आहे.
भारतात अजुनही हा चित्रपट दाखवलेला नाही. परिपक्वं लोकशाहीच्या नागरिकांनी विचारांचा सामना विचारांनीच करायला हवा - अगदी धार्मिक भावना दुखावल्य गेल्या तरी. या चित्रपटात प्रदर्शित केलेल्या मताशी तुम्ही अगदी असहमत असलात तरी चित्रपट बघण्यालायक आहे आणि तुम्ही खुर्चीत खिळुन रहाल हे मात्रं खरे.
परिक्षण मी आधीच लिहिले आहे. ते इथे वाचा.
http://kasakaay.blogspot.com/2006/05/water.html#links

Thursday, January 18, 2007

आता तरी...

शासकिय आकड्यानुसार आमची संख्या दोन कोटी आहे. स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहुती देणार्‍यांपेक्षा आमची संख्या जास्त आहे. सीमेवर शत्रूशी लढताना प्राण गमावणार्‍यांपेक्षाही जास्त आहे. मात्रं आमचं बलिदान हे सर्व अर्थानी मूक आहे, कारण हे दान आम्ही स्वेच्छेने दिलेले नाही, तर आमच्याकडून ह्कनाक घेण्यात आलेलं आहे. आमच्या आई-वडिलांनी, लोभी डॉक्टरांच्या मदतीने विज्ञानाचा दुरुपयोग करत, जन्मापूर्वीच आम्हाला खुडून टाकलं आहे, किंवा जन्मानंतर काही दिवसाच्या आतच...
गेल्या वीस वर्षात दोन कोटी चिमुकल्या कन्या ह्या भयंकर सामजिक प्रथेच्या बळी ठरल्या आहेत. आमचे आई-बाप समाजाच्या सगळ्या स्तरात आहेत, खेड्यात आहेत तसे शहरात आहेत. निरक्षर आहेत तसेच साक्षर. गरीब तसेच गर्भश्रीमंत. काश्मिर ते कन्याकुमारी, महाराष्ट्रं ते बंगाल सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आहेत.
हीच का ती प्राचिन गौरवशाली संस्कॄती? हेच का ते मुक्तं करणारे ज्ञान-विज्ञान? ह्यालाच प्रगती म्हणायचे का? हयाला सामजिक न्याय म्हणायचे का? महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणार्‍या समाजाची हीच मनसिकता का? हाच का राज्यघटनेने तुम्हाला दिलेला मुलभूत ह्क्कं?
आमच्या बलिदानाने काही प्रमाणात तरी लोकसंख्येला आळा बसला आहे - जाता जाता तो ही एक फायदा आम्ही देशाला करुन दिला आहे. पुरुषा-गणिक स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तुमच्या ह्या स्वतंत्र देशामधे जन्मण्याचा ह्क्कं आम्हाला मिळाला नाही, तरी एक फक्त विनंती आहे - आमच्या अनेक बहिणी आहेत, ज्या जन्मल्या तर आहेत, पण त्यांची स्थिती आमच्यापेक्षाही वाईट आहे. आता तरी घेऊ द्या त्या कळ्यांना मोकळे निश्वास, आता तरी उडू द्या त्या पर्‍यांना आपल्या पंखानिशी...आता तरी नका त्यांचे श्वास कोंडु, आता तरी नका त्यांची स्वप्नं जाळू...