Tuesday, July 31, 2007

ड्युक व्हिडिओ इंस्टिट्युट - २००७

मागे फुल फ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलबद्दल लिहिलं होत ते आठवतंय का? तेव्हा ते सगळे सिनेमे बघुन आपणही असं काही तरी करून पहावं असा किडा डोक्यात वळवळला. त्या किड्याने नुसती वळवळ नं करता ड्युक विद्यापिठाच्या डॉक्युमेंटरी बनवण्याच्या कार्यशाळेत प्रवेश घेतला.

http://cds.aas.duke.edu/courses/workshops.html#video

शनिवारपासून अभ्यासक्रम सुरू झाला. ८ दिवस रोज बारा तास. अमेरिकेच्या काना-कोपर्‍यातून आलेले विद्यार्थी बघुन नामांकित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्याचा शोध लागला. पस्तीस एक विद्यार्थ्यांपैकी फक्तं ३ पुरूष आहेत हे एक उगाचच केलेले विशेष निरिक्षण!
व्हाईट बॅलंस, आयरिस, एक्स्पोजर, एफ स्टॉप, फोकस हे नवर्‍याच्या कोषातले अगम्य शब्दं आता मलाही कळु लागले आहेत. त्या सगळ्या शब्दांच्या व्याख्या इथे तुम्हाला सांगत बसत नाही. पण एका शिक्षकची टिपणी: वाईट व्हिडिओचे उदाहरण म्हणजे बाजूच्या खोलीत सुरू असलेल्या टिव्हीचा नुसता आवज ऐकून संपूर्ण कथानक कळु शकणे.

Wednesday, July 18, 2007

आतंकवाद आणि २१ वे शतक

इंग्लंडमधे झालेल्या अतिरेक्यांच्या अपयशी हल्ल्यात उच्चंशिक्षित भारतिय तरूण संशयित म्हणून पकडल्या गेले आहेत. हे वृत्त वाचुन काहींना आश्चर्य वाटलं असेल तर काहींना "बघा आम्ही म्हणत होतो ना? आता तरी जागे व्हा" असंही म्हणावसं वाटत असेल.
आत्मघातकी अतिरेकी म्हणजे "गरीब, अशिक्षित पाकिस्तानातल्या कुठल्या तरी गावातून आलेला, थोड्याश्या पैशांसाठी जीवावर उदार झालेला" ह्या प्रतिमेला आता तडा गेला आहे.
ही बाब फार गंभीर असल्याने जरा खोलात जाऊन कारणे आणि उपाय यावर विचार करायला हवा.
एकविसाव्या शतकातही मानवी समाज हिंसेने प्रश्न सोडवायचा प्रयत्नं करतो आहे. ठोशास ठोसा हा तर सध्याचा आंतरराष्ट्रिय न्याय किंवा परराष्ट्रिय धोरण झाले आहे.
दुसर्‍या महायुद्धाच्या सुरवातीला अलिप्तं राहणार्‍या अमेरिकेने पराभूत जपानला सन्मानाची वागणूक देऊन प्रचंड आर्थिक मदत देऊ केली आणि पुनर्निमाणात महत्वाचा हातभार लावला. त्याच अमेरिकेने आता मात्रं "प्रिएम्प्टिव वॉर" सुरू करून सद्दामांना फाशी देण्यापर्यंत पलटी खाल्ली आहे. अबु गरेब आणि ग्वांटानामोच्या तुरुंगातून लाजिरवाण्या छळ्वादाच्या कथा बाहेर येऊनही इंग्लंड आदि देशांनी त्यांना आंधळा पाठिंबा चालूच ठेवला आहे.
इकडे भारतात हिंदु शक्तिप्रदर्शन, राम मंदिर, गुजराथ हत्याकांड,गोध्रा, मुंबईतील स्फोट, स्वामी नारायण मंदिरावरील हल्ला, संसदेवरील हल्ला अशा घटनांनी मने दुभंगली आहेत. आपल्याच देशात पोरकेपणा आणि असहायतेने ग्रासलेल्या हिंदु आणि मुस्लिम समाजाच्या भावनांचा फायदा उठवण्यासाठी कट्टरपंथीय धार्मिक नेते, राजकारणी आणि आय एस आय तयार आहेतच.
युद्ध हा श्रीमंत देशांचा आतंकवाद आहे आणि आतंकवाद हे गरिबांचे युद्ध आहे ही गोष्टं लक्षात ठेवायला हवी. हिंसाचाराचे मूळ धैर्यामधे नसून भितीमधे असते. नष्टं होण्याची भिती माणसाला टोकाची भूमिका घ्यायला लावते. बहुतांशवेळा ती भिती अनाठायीच असते आणि ती दूर होण्यासाठी खरी धैर्याची गरज असते.
आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आजची प्रसार-माध्यमे. एकतर माध्यमे बहुतांश मॅनेज केलेली आहेत. आणि दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकण्यासाठी तत्वे सोडून पैशाच्या पाठीमागे लागलेली आहेत. प्रक्षोभक वक्त्यव्ये करणार्‍यांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी शांततामय मार्गाचा अवलंब करणार्‍यांना मिळत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना आकर्षित करण्यासाठीही हिंसाचाराचा अवलंब केला जातो.
या परिस्थितीत आपल्या मानसिकतेचा जरा विचार करू. भारतात सुरू असलेल्या मुस्लिमेतर आतंकवादाची उदाहरणे घ्या - तामिळ दहशतवाद्यांचा राजीव गांधींवर प्राणघातक हल्ला, आसाममधे प्रांतवादातून उफाळलेला हिंसाचार, तसेच इतर भागात नक्षलवाद्यांनी आणि माओवाद्यांनी केलेले हल्ले. अशा घटनांची संख्या खरे तर मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्तं आहे. पण त्या बातम्यावाचून आपल्या भावना भडकत नाहीत. प्रसारमाध्यमेही त्याचे फार भांडवल करत नाहीत. याचे कारण काय असावे? शासन, सुरक्षा यंत्रणा अथवा लष्कर या बंडाचा आज ना उद्या बिमोड करेल असा आपल्याला कुठे तरी एक विश्वास आहे. मात्रं मुसलमान भडकले तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही ही भिती हिंदूच्या मनात कायम आहे. आणि हा देश हिंदुंचा असल्याने वेळ प्रसंगी आपलेच शेजारी मित्रं आपल्यावर उलटतीत आणि सरकारही आपल्या मदतीला येणार नाही ही भावना मुसलमानांच्या मनात घर करून आहे. इतिहास आणि पूर्वग्रह भितीच्या या मानसिकतेला खतपाणी घालतातच.
ही मानसिकता सोडण्यासाठी सर्व थरावर सतत सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुसलमानांना हिंदु वस्तीत घर भाड्याने अथवा विकत मिळणे कठीण आहे. तसेच मुसलमान वस्तीत एकटे जायला हिंदु धजत नाहीत. ही परिस्थिती बदलायला हवी. जाती धर्माधारित वस्त्या हळुहळु कमी करत प्रसंगी कायद्याचा वापर करून नाहीशा कराव्यात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करण्याचे व्यासपिठ उपलब्ध असावे. अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन उभे करावे. अविश्वास, भितीची जागा विश्वास आणि धैर्याने घ्यावी. जामा मस्जिदीतील धर्मगुरूच्या व्यतिरिक्त इतर मुसलमानांची मते जाणून घ्यायचा प्रयत्नं प्रसारमाध्यमांनी करावा. पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्रं येऊन कट्टरपंथीयांना एकटे पाडावे. मवाळांनी गप्पं राहू नये.
उभयपक्षांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विषय कठीण असला तरी पेपर सोडवायलाच हवा.

Sunday, July 15, 2007

कथा एका - नव्हे दोन लग्नांची

तो: आपल्याला एका लग्नाला जायचे आहे.
ती: कुणाच्या?
तो: जेनी आणि विनोदच्या
ती: आपण मुलाकड्चे का मुलीकडचे?
तो: जेनीची आणि माझी जुनी ओळख आहे. खरं म्हणजे जेनीच्या पहिल्या लग्नालाही गेलो होतो मी. फोटोही काढले होते तेव्हा.
ती: हं....लग्नं अमेरिकन पद्धतीचे आहे की भारतिय? काय घालायचे ते ठरवावे लागेल त्याप्रमाणे.
तो: इथले लग्नं ख्रिश्चनपद्धतीचे आहे. त्यानंतर ते भारतात जाऊन वैदिक विधी करणार आहेत.
ती: अरे वा, छान.
तो: मुलाच्या घरच्यांनी दोघांची पत्रिका जुळवून बघितली आहे. त्यानुसार इथल्या लग्नाचा मुहुर्त काढला आहे म्हणे!
ती: अय्या!! मुहुर्त काढून लावलेले हे पहिलेच ख्रिश्चन लग्न असावे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार असणार आहोत!
ती: अरे पण त्या जेनीच्या पहिल्या लग्नाचे काय झाले म्हंटलंस?
तो: काय झालं माहिती नाही. खरं म्हणजे जेनीपेक्षा ल्युसीचा स्वभाव खूप छान होता
ती: आता ही ल्युसी कोण आली मधेच आणि जेनीचा आधीचा नवरा कोण?
तो: जेनीचे पहिले लग्नं ल्युसीशी झाले होते - हे बघ तुला फोटो दाखवतो त्यांचे.... पण तुझा चेहेरा असा गोरामोरा का झाला आहे? बरी आहेस ना?
ती: नाही, काही नाही - पाणी प्यायलं की जरा बरं वाटेल... अं अं ...म्ह म्ह म्हणजे जेरी साईनफिल्ड म्हणतो त्याप्रमाणे "नॉट दॅट देअर इज एनिथिंग रॉंग विथ इट."

Tuesday, July 10, 2007

सिको, लेटर्स फ्रॉम इवो जिमा आणि व्हॉट अ वे टू गो...

शुक्रवारी रात्री मायकल मूरचा "सिको" बघितला. सिनेमा फार छान आहे. अमेरिकेतल्या आरोग्यसेवेची कशी वाट लागली आहे ते बघण्यासाठी अमेरिकेत रहाणार्‍यांनी आणि येऊ पहाणार्‍यांनी हा सिनेमा जरूर बघावा.
शनिवारी सकाळी इनो रिव्हर फेस्टिवलला जायचे असे नवर्‍याने जाहीर केले. त्यासाठी तो चक्कं लवकर उठलाही. मला खरं तर सतारीची प्रॅक्टिस करायची होती विकेंडला. पण हे असे प्लॅन असल्यावर कसला रियाज अन कसलं काय! अखेर लग्नाच्या ह्या साईड इफेक्टला शरण जात मी त्याच्याबरोबर जायचे मान्य केले. (लग्नं झालेले असल्यानेच खरं तर शहिद परवेजांसारखी सतार वाजवता येत नाही!) फेस्टिवल छान होता. संध्याकाळी घरी आलो आणि लगेच आर्ट म्युझियमच्या आऊटडोर थियेटरमधे "लेटर्स फ्रॉम इवो जिमा" हा तद्दन हॉलिवुडी युद्धपट बघायला गेलो. सिनेमा (माझ्यामते) टुकार असला तरी मोकळ्या मैदानात गवतावर पसरून आरामसे लोळायला मजा आली. रात्री घरी आलो तेव्हा बारा वाजून गेले होते. "उद्याचा - खरंतर आजचा रविवार मी मला हवा तसा घालवणार" असे नवर्‍याला सांगून पलंगावर अंग टाकले.
सकाळी उठून पाहिले तरे नवर्‍याची इ-मेल होती. (हो - आम्ही घरातल्या घरात एकमेकांना इमेल पाठवतो आणि फोनही करतो). एका मित्राने "व्हॉट अ वे टू गो" नावाच्या डॉक्युमेंटरीचे स्पेशल स्क्रिनिंग असल्याची माहिती पाठवली होती. "नो वे - ओळीने दोन दिवस सिनेमे पाहिले आता तिसरा नको" असं उत्तर पाठवायचे होते, पण सिनेम्याचा विषय पाहून "मे बी" असं उत्तर पाठवलं.
नवरा उठेपर्यंत जरा सतारीच्या तारा छेडल्या. दुपारी बाहेर जाऊन बाजारहाट केला, सासू सासर्‍यांची खबरबात घेतली आणि मग आता सगळी कामं झाली असल्याने गिल्ट फॅक्टर दूर झालेले होते, त्यामुळे सिनेमा बघायला गेलो.
हा सिनेमा अजुन प्रदर्शित झालेला नाही, पण कदाचित प्रदर्शित झाला आणि तुमच्या गावात आला तर जरूर बघा. सिनेमाचा विषय आहे "Life At The End Of Empire - A middle class white guy comes to grips with Peak Oil, ClimateChange, Mass Extinction, Population Overshoot and the demise of theAmerican Lifestyle"
http://whatawaytogomovie.com/
हा सिनेमा बघण्याच्या आधीच मी अंतिम युद्ध लिहिले हे बरेच झाले. नाही तर बर्‍याचशा कल्पना माझ्या स्वतःच्या आहेत असं मला म्हणताच आलं नसतं.
हा माहितीपट फार क्लिष्टं आहे. सुरूवातीलाच तशी सुचना दाखवली आहे. वैज्ञानिक, लेखक, सामान्यं माणसं यांच्या मुलाखती आणि दिग्दर्शकाचे स्वगत या माध्यमातून आपली संस्कृती आणि पर्यावरणाचा र्‍हास याविषयी संवाद घडवून आणलेला आहे. काही काही संवाद फार परिणामकारक आहेत. उदा. सुरूवातीला पेट्रोलचे साठे संपल्यावर काय होईल याचे विदारक चित्रण केले आहे. "पण मग इतर प्रश्नं इतके गंभीर आहेत की पेट्रोलचा प्रश्नं फारच क्षुल्लक आहे असं वाटायला लागतं" दिग्दर्शक म्हणतो.
त्यानंतर लगेच एक वैज्ञानिक "ग्रीन हाऊस इफेक्टमुळे हवाच नसल्यामुळे पेट्रोल जळणारच नाही - त्यामुळे साठे आहेत की नाही हा प्रश्नंच दुय्यम ठरणार आहे" असं म्हणतो. दिग्दर्शकाचे स्वगत : "बघा - आत्ताच तुम्हाला पेट्रोलच्या साठ्यांची काळजी वाटेनाशी झाल्यमुळे जरा बरं वाटतंय ना?"
आपण सर्व मानव मिळून रोज २०० प्रजातींना अस्तंगत करत आहोत यावर एक वैज्ञानिक म्हणतो - "रहात्या घराच्या रोज २०० विटा काढल्या तर घर किती दिवस घर उभे दिसेल?"

पण या सगळ्यावर उपाय काय? दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे खरं तर काहीच उपाय नाही. असला तर एकच - सर्व भौतिक प्रगतीचा त्याग करायचा. मानव शेती करायला लागायच्या आधी ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत परत जायचे. अगदी ठरवून. लोकसंख्या आधी कमी करायची. नाहीतरी हे होणारच आहे, मग आपत्तींमुळे होण्याची वाट कशाला बघायची?

बघुन मन सुन्नं झालं. बर्‍यापैकी विवादास्पद मत आहे खरं....




Monday, July 02, 2007

पडद्यामागचे कलाकार

हरेकृष्णाजींनी गणेश मुर्ती बनवणार्‍या कारागीरांना तुमच्या समोर आणलं आहे.
त्यावरून मला काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला. इथे जवळच शहिद परवेज आणि शशांक यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम छान झाला. शहिदांची काळी भोर सतार फार देखणी दिसत होती. म्हणून कार्यक्रम संपल्यावर आवर्जुन त्यांना त्याविषयी विचारले. त्यांना आवडतो म्हणून सतारीला काळा रंग देऊन घेतल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत त्यांनी सतार गवसणीत घातल्यामुळे बनवणार्‍याचे नाव वाचता आले नाही. म्हणून सहजच सतार कोणी बनवली? हा प्रश्न विचारला. तेव्हा मात्रं त्यांनी फारच उडवा उडवीची उत्तरे दिली. "मी स्वतः मला पाहिजे तशी बनवून घेतली आहे. सतारीपेक्षा वाजवणारा महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझ्यासारखी सतार घेतली म्हणजे तुम्हाला वाजवता येईल?" वगैरे वगैरे असंबद्ध उद्गार काढले.
वाद्ये बनवणे ही एक कला आहे. सतारीसारखे नाजूक वाद्य बनवायला तर खासच कसब लागते. दर्जेदार,कसलेले लाकूड मिळवणे, योग्य आकाराचा भोपळा मिळवणे, वाद्याची जुळवाजुळव करणे, नक्षिकाम करणे, थाट बसवणे, जवारीचे काम करणे. ही सगळी कामे अत्यंत गुंतागुंतीची आहेत. सुमार दर्जाच्या सतारी बनवणारे अनेक कारागीर आहेत. पण उत्कृष्ट दर्जाच्या सतारी बनवणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत. संगीतकारांच्या असतात तशाच त्यांच्याही पिढ्यानपिढ्या या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. पडद्यामागच्या (अक्षरशः - की तारांमागच्या?) या कलाकारांना जराही श्रेय नं देता उलट खिजगणतीही नं करण हे मला फारच चुकीचे वाटते.
दिल्ली येथील रिकीराम घराण्याने रविशंकरांच्या घराण्यासाठी सतारी बनवल्या आहेत. आता रिकीराम यांचे सुपुत्रं श्री संजय रिकीराम ही परंपरा चालवतात. अनुष्का यांच्या सतारीही तेच बनवतात. माझी सतार त्यांच्याकडूनच घेतली आहे.
संजय रिकीरामांपर्यंत पोचण्याच्या आधी मला अनेक लोकांनी चुना लावला आहे. अमेरिकेतल्या पहिल्या गुरूंनी तर भरमसाठ (चार आकडी) डॉलर घेऊन अतिशय सुमार सतार मला विकली. सतार पहिल्यांदा घरी आली आणि उघडली तेव्हा तर मला रडूच कोसळायचे बाकी होते. कारण जिथे कारागीराचे नाव लिहिलेले असते ती पट्टीच गायब होती. इतके पैसे दिले आहेत तर चांगल्या नावाजलेल्या कारागीराचे नाव तिथे बघण्याची माझी अपेक्षा पार धुळीला मिळाली. ते माझे गुरू आहेत याचा जराही मुलाहिजा नं बाळगता सतार त्यांना साभार परत केली. स्वतः कलाकार असून इतका संकुचित दृष्टिकोन कसा काय असु शकतो?
शहिद परवेजांसारख्या कलाकारानी इतर कलाकारांचा आदर करावा. भारताबाहेर राहून ही कला पुढे नेऊ पहाणार्‍या माझ्यासारख्या नवशिक्या, हौशी विद्यार्थांना जमेल तितकी माहिती देऊन मार्गदर्शन करावे ही विनंती.