Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Thursday, March 19, 2015

गुढीपाडवा आईचा

आईची इतकी महती असताना, दिवाळीत पाडव्याला ओवाळले जाते ते फक्त वडीलांना. आईला ओवाळण्याचा एकही सण अस्तित्वात नाही. या नवीन वर्षापासून दर गुढीपाडव्याला आईला ओवाळायची नवीन प्रथा सुरु करूयात का? पटले तर शेयर करा आणि आपल्या घरी ही प्रथा सुरु करा. ‪#‎aailaowala‬ (आईला ओवाळा) हा hashtag twitter वर सुरु करण्यात आला आहे. कृपया या गुढीपाडव्याला आईला ओवाळा व पोस्ट करा.

Tuesday, January 01, 2008

विव्हर स्ट्रिट मार्केट अथवा तत्सम (विअत)

सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

विव्हर स्ट्रिट मार्केटवर लिहिलेल्या या लेखाला वाचकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अशा प्रकारचे पर्याय (विअत) इतर ठिकाणी उपलब्ध आहेत का अशी विचारणा झाली आहे. म्हणुन हा लेख.

विव्हर स्ट्रीटसारखी सहकारी किराणा दुकाने अमेरिकेत बरीच आहेत. (अर्थात विव्हर स्ट्रिट हे सर्वात यशस्वी सहकारी दुकान म्हणावे लागेल. ) अशा दुकांनाना कोऑप किंवा नॅचरल फुड स्टोअर असे म्हणतात. तुमच्या भागात असं एखादं कोऑप आहे का ते शोधायला ही सुची बघा:


http://www.coopdirectory.org/


तुमच्या जवळपास कोऑप नसेल तर इतर पर्याय खाली देते आहे.


होल फुड्स मार्केट: Whole Foods Market ही ऑरगॅनिक किराणा स्टोअर्सची वैशिष्ट्यपूर्ण चेन आहे. ही चेन यशस्वी झाल्यावर इतर किराणा दुकानात ऑरगॅनिक वस्तुंचे विभाग सुरू झाले. (वॉलमार्टनेही लॉबिंग करून "ऑरगॅनिक" शब्दाची व्याख्या बदलवुन घेणे, नियम ढिसाळ करून घेणे असले उपाय करून घेतल्यावर "ऑरगॅनिक" पदार्थे विकायला सुरूवात केली. हल्ली तेही जमले नाही म्हणुन विकणे बंद केल्याचे ऐकले आहे.) होल फुडसची सुपिक कल्पना ज्यांच्या डोक्यातुन निघाली ते संस्थापक व CEO जॉन मॅकी यांच्या संदर्भात तुम्ही ऐकले असण्याची शक्यता आहे. आजकाल CEO च्या पगारपुढची शुन्यांची संख्या वाढत असल्याबद्दल आपण नेहेमीच ऐकतो. जॉन मॅकी यांनी मात्रं गेल्यावर्षीपासून नाममात्रं १ एक डॉलर वार्षिक पगार घ्यायचे ठरवले आहे. त्याशिवाय त्यांना होल फुडसच्या सामान्य कर्मचार्‍यांसारख्याच इतर सुविध, आरोग्य सेवा आदी मिळतात. होलफुडसमधे सद्ध्या प्राणिजन्य पदार्थांची विक्री होते. स्वतः मॅकी मात्रं व्हिगन आहेत.

होलफुडसमधे सॅच्युरेटेड फॅट असलेले तसेच जेनेटिकली मॉडिफाईड अन्नपदार्थ विकण्यात येत नाहीत. अशी उत्पादने घेण्यासाठी उत्पादकांना व शेतकर्‍यांना अर्थ सहाय्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे रहायचे होलफुडसने ठरवले आहे.

अर्थात होल फुडसमधे जायचे तर जादा पैसे मोजावे लागणार ही मानसिक तयारी करूनच जायला हवे. चांगल्या आरोग्यासाठी केलेली ही गुंतवणुक आहे मी समजते. किटकनाशके फवारलेले, सॅचुरेटेड फॅट असलेले, जेनेटिकली मॉडिफाईड अन्नं खाऊन पुढे तितकेच पैसे औषधांवर खर्च करायची वेळ येऊ शकते.

होल फुडसची दुकाने प्लॅस्टिक बॅगरहित करायचा प्रयत्नं दोन शाखांमधे सुरू आहेत. तो यशस्वी झाल्यास सर्व शाखांमधे फक्तं पुनःप्रक्रिया केलेल्या कागदी पिशव्या ठेवण्यात येतील. ग्राहकांनी घरून आणलेल्या पिशवीमागे पाच ऐवजी दहा सेंटची सुट देण्याचाही विचार सुरू आहे.

एखाद्या कॉर्पोरेशनची जाहिरात करण्याचा माझा उद्देश नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याबद्दल श्रेय द्यायला हरकत नाही असे वाटल्याने इतकी मोठा उतारा होलफुडसवर लिहीला आहे.

होलफुडसपेक्षा आकाराने बर्‍याच लहान इतरही काही चेन्स आहेत: होम इकोनॉमिस्ट(Home Economist), अर्थ फेअर(Earth Fare). त्याशिवाय वाईल्ड ओटस (Wild Oats) या चेनचे नुकतेच होल फुडसमधे विलीनीकरण झाले आहे.


तुमच्या जवळपास एखादे विअत नसेल तर त्यातल्या त्यात जिथे ऑरगॅनिक विभाग मोठा असेल अशा दुकानात जाता येईल. कुठल्याही दुकानात जाताना स्वतःची पिशवी नेण्यासारखे साधे उपाय करून बघा.

Wednesday, December 19, 2007

विव्हर स्ट्रीट मार्केट

हे चित्रं पहा:
"प्लॅस्टिक पिशवी नको मला. माझी पिशवी आणली आहे बरोबर" जरा वैतागुनच किराणा दुकानातल्या कर्मचार्‍याला म्हंटले. त्याबरोबर त्याने प्लॅस्टिक पिशवीतल्या माझ्या वस्तु बाहेर काढल्या आणि प्लॅस्टिक पिशवी कचर्‍याच्या डब्यात टाकली. हसावे की रडावे आता?

दोष त्याचा नाही. वॉलमार्ट थवा त्सम (वॉअत) दुकानात आले ही माझीच चूक आहे. हल्ली खपतात म्हणून वॉअत दुकानातही ऑर्गॅनिक भाजीपाला विकला जातो. एखाद दोनच वस्तु घ्यायच्या होत्या म्हंटलं जवळच्या जवळ जाऊन याव.

शेजारच्या गिर्‍हाईकेच्या ढकलगाडीत थोड्याथोडक्या नव्हे, २०-२५ प्लॅस्टिक बॅगा. आधीच दोन-तीन आवरणात गुंडाळलेली प्रत्येक वस्तु ठेवायला आणखी भारंभार पिशव्या. दुकानात जाताना पिशवी नेण्याची तसदी घ्यावी लागत नाही या आनंदात गिर्‍हाईके. गिर्‍हाइकांच्या हातात पिशव्या नसल्याने चोरीची शक्यता कमी झाल्याच्या आनंदात वॉअत कंपन्या.

व्यापारी कंपन्या, गिर्‍हाईक, कर्मचारी, दुकानातील माल, तो पुरवठा करणार्‍या कंपन्या इ. या व्यवस्थेतील घटक हे "मी" या एकाच सूत्राने बांधलेले असतात. "आपला" हा शब्दं सगळ्यांनीच घरी ठेवलेला असतो. "तू नही तो और सही, और नही तो और सही" हा मंत्र जपत इथले सगळे व्यवहार सुरू असतात.
कमीत कमी पगारात काम करायला तयार होणार्‍यांना नोकरी देणार्‍या या कंपन्या. कुठल्या ओळीत काय आहे ह्या पलिकडे मालाविषयी काहीही ज्ञान नसलेले निरुत्साही कर्मचारी.

त्यांनी अधिक पगार मागु नये म्हणून त्यांना फारसे व्यवसायिक प्रशिक्षण नं देता सरकारी अनुदान कसे मिळवावे याचे प्रशिक्षण दिले जाते.
आपणच भरलेल्या करातुन अप्रत्यक्षितरित्या या कामगारांचे वेतन काही प्रमाणात आधीच चुकते होते याचा गंधही नसलेली गिर्‍हाइके. आत्ता मात्रं दोन डॉलर वाचल्याच्या समाधानात बाहेर पडतात.


आता हे चित्रं पहा:
कारबरो येथील व्हिव्हर स्ट्रीट मार्केट- सहकारी किराणा दुकान. कारबरोच्या जनजिवनाचा केंद्रबिंदु

बाहेरील दृष्य:
मोठा सायकल स्टँड. छोटा कार पार्किंग लॉट. बसमधुन,पायी, सायकलवर, मित्रंमैत्रिणींचा कंपु जमवुन, लेकुरवाळी, कुत्रुळवाळी अशी येणारी गिर्‍हाईके.

दुकानाच्या बाहेर मोठ्ठे अंगण. अंगणात छोटी मोठी झाडे. झाडांखाली व अंगणात टाकलेल्या टेबल खुर्च्या. आत तयार केलेले सुग्रास,ताजे, गरमागरम पदार्थ वाढुन घेऊन भोजनाचा आनंद घेणारी मंडळी.



पोराबोळं खेळतायेत, झाडावर चढतायेत, लोंबताहेत . कधी कुत्र्या, माणसांचा फ्रिस्बी चा खेळ रंगलाय. कधी संध्याकाळी एखादा ड्रम सर्कल जमलाय. नर्तक किंवा कमरेभोवती गरगर हुलाहुप फिरवणारे कलाकार त्याच्या त्यालावर फेर धरताहेत.


आतील दृष्य:
दुधाच्या, पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरायला आणायच्या. भाज्या,फळे इ प्लॅस्टिक पिशव्यांमधे नं भरता तशाच ढकलगाडीत ठेवायच्या.
प्रत्येक वस्तु वेष्टणात बांधलेली असतेच असं नाही. बल्क सेक्शनमधुन खुले तांदुळ, दाणे,बेदाणे, तिखट, हळद,ओटमिल, सिरियल इ जिन्नस घरून आणलेल्या किंवा दुकानात ठेवलेल्या वेष्टणात बांधुन घ्यायचे. तसे करताना गिर्‍हाइकाने आधी दोन काजु चाखुन पाहिले तरी हरकत नाही.

तर्‍हे-तर्‍हेची ताजी ताजी ब्रेड, केक,बिस्किटे रोज आतच तयार होतात. एकटा जीव सदाशिव असाल तर अर्धाच ब्रेड मागु शकता.
काऊंटरवरील कर्मचारी घरून आणलेल्या पिशवीसाठी ५ सेंटची का होई ना सुट देतो.
सहकारी तत्वावर चालणारे दुकान असल्याने गिर्‍हाईक तसेच कर्मचारीही बहुधा मालकच असतात. कर्मचार्‍यांना माल कुठुन आला, कसा तयार झाला याची सर्व माहिती असते. स्थानिक मालाला प्राधान्य दिले जाते.



आपली गिर्‍हाईके, आपले व्हिव्हर स्ट्रीट मार्केट, आपले कर्मचारी, आपला माल असं मानणारे घटक इथे एकत्रं आले आहेत. आपले गाव, आपला समाज, आपला निसर्ग याची काळजी घेतल्याच्या आनंदात गिर्‍हाईक बाहेर पडतात- ते पुन्हा परत येण्यासाठी.

नोंद:वरील फोटो अज्ञात छायचित्रकारांचे आहेत त्यामुळे श्रेय देता आलेले नाही.

Wednesday, August 08, 2007

उजळो तुझा असाच मंद प्रकाश

अमेरिकन दुतावासाने डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना पुरेसे (?) उत्पन्नं नसल्याच्या कारणास्तव व्हिसा आधी नाकारला आणि मग चुक लक्षात आल्यावर ओशाळून प्रदान केल्याची बातमी कुठेतरी वाचली होती. त्यावरून अखेर त्यांचा अमेरिकेत येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे कळले होते. मात्रं प्रत्यक्षात त्यांच्या भेटीचा योग येईल अशी कल्पनाही नव्हती.
रॅले येथील निशा मिरचंदानी यांनी बाबांच्या जिवनावर "विसडम सॉंग" नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचा अमेरिकेतील प्रकाशन सोहोळा ड्युक विद्यापिठात एका छोटेखानी कार्यक्रमात पार पडला.


आपला व्यवसाय सोडून सामाजिक कार्यात उतरलेल्या निशा मिरचंदानी यांनी वेळोवेळी भारतात जाऊन बाबांच्या आणि आमटे कुटुंबाच्या सहवासात बराच काळ घालवला. त्याचेच फलित म्हणजे हे पुस्तक.

पुस्तकाचे प्रकाशन करताना लेखिका आणि डॉ. प्रकाश.


त्यानंतर आमटे कुटुंबावर केलेला माहितीपट दाखवण्यात आला कारण मुळात मितभाषी असलेल्या या दांपत्याला स्वतःविषयी बोलायला लावणे कठिणच आहे असे लेखिकेने सांगितले आणि त्याची प्रचितीही आली.

इतके मोठे काम करत असुनही अहंकाराचा लवलेश नाही. नवरा बायकोत इतके सामंजस्य की शब्दांचीही गरज पडू नये. व्यक्ति कोण आणि छाया कोण हे कळू नये इतकी एकरूपता.





छायाचित्रे नवर्‍याच्या सौजन्याने.




Wednesday, February 28, 2007

समवयस्कं

येसाबाई आमच्या वाडयात कामाला यायला लागली त्याला जवळपास १७-१८ वर्षे झाली. आली तेव्हा पोटुशी होती आणि एक तान्हे मूल कडेवर होते. काम कसं, पगार किती वगैरे ठरवाठरवी करताना "कामावर लागल्यावर एक-दोन महिन्यातच बाळंतपणासाठी सुटी घेणार" या मुद्यावरही चर्चा झाली. बाळंतपण यथासांग पार पडले, फारशी रजा नं घेता येसाबाई आठवडाभरातच पुन्हा कामावर रुजु झाली. दुसराही मुलगाच झाला होता. तेव्हा "येसाबाई, आता पुरे" असा माझा आगंतुक सल्ला तिने मनावर घेतला नाही. "ताई तुमाला काई कळत न्हाई आमच्य लोकात कसं आसतं ते" असं म्हणुन मला गप्पं बसवलं.
येसाबाईने घरकामाचे करियर नुकतेच सुरू केले होते. त्याच वेळी माझेही संगणक व्यवसायात नुकतेच पाऊल पडले होते. एकीकडे माझा व्यवसाय नावारूपाला येत होता आणि एकीकडे येसाबाईचा संसार फुलत होता. अजु, विजुच्या पाठोपाठ नितु आणि रितुंचे आगमन झाले. त्याबरोबर पैशाची गरज वाढली. मग घरच्या धुणं भांड्याबरोबर माझ्या ऑफिसची साफसुफ करण्याचे कामही तिच्यावर सोपवले. कामाचा दर्जा तसा बेताचाच, उरकही फार नाही, पण नियमितपणा आणि भरोशाची या गुणावर टिकुन राहिली. दरम्यान माझ्या भावाचेही लग्नं झाले, त्याचाही संसार फुलू लागला. येसाबाईने वहिनीकडुन पोळ्या करायला शिकुन घेतल्या आणि तेही काम अंगावर घेतले.
येसाबाईला साक्षर करायचे माझे आणि वहिनीचे सगळे प्रयत्नं तिने सपशेल हाणून पाडले. पण सरकार दप्तरी तिची गणना साक्षर म्हणून आहे. रांगोळी काढायला शिकावी तसे ती आपले नाव लिहायला शकली आहे. त्यामुळे आगंठा नं लावता ती सही करते. वाचायला अक्षर मात्रं काडीचे येत नाही.
बाई तशी सोशिक, हसतमुख. कोणी काही बोललं तर फारसं मनाला लावून नं घेता, हसण्यावारी नेणारी. नवर्‍याचे पोटही हातावरच होते. हमालपुर्‍यातल्या बहुतेक बायका नवर्‍याच्या जाचाला कंटाळलेल्या असल्या तरी येसाबाईचा संसार त्यातल्या त्यात बरा चालला असावा. नवर्‍याने दारू पिऊन मारल्याची तक्रार तिने कधी केली नाही. सहसा दांड्या मारायची नाही, पण उन्हाळ्यात खानदेशात माहेरपणाला जाणे मात्रं कधी चुकायचे नाही.
मधुनच मग "तुमच्यावाणी शिकले आसते तं मी बी कुटच्या कुटं गेले आसते, म्हाया भाऊ लई तालेवार हाये, तुमच्याकडं हाये तशी फटफटी हाय त्याच्याकडं बी." असं म्हणणार, किंवा "तुमी किती साद्या हाये ताई, मी तुमच्यावाणी पैसा कमवला आसता तर लई मोठे दागीने घेतले आसते - तुमी काऊन काई घालत न्हाई अंगावर बरं?" असा टोमणा मारणार.
दुपारच्या वेळी माझ्या ऑफिसची झाडझुड करायची. फडकं घेऊन, एका हाताने साडी सावरत दुसर्‍या हाताने जरा बिचकत बिचकतच कॉम्प्युटर पुसायची. त्यावेळी मग ऑफिसमधे काम करणार्‍याला मुलींशीही गप्पा मारायची. आणि मधुनच "तुमी कवा लाडू खाऊ घालणार ताई? तुमच्या लग्नात चांगली भारी साडी घेईन" असं बजावायची. एक दिवस ऑफिसमधे काम करणारी बिजल मला म्हणाली, "मॅडम मॅडम, तुम्हाला माहिती आहे, येसाबाई आणि तुम्ही एकाच वयाच्या आहात!". "क्क्क्काय?"मी जवळ जवळ ओरडलेच. "बिजल, तुला या नस्त्या चांभारचौकशा करायची काय गरज?" असे मी वर-वर म्हणून विषयांतर केले, तरी त्या वाक्याने मला बरेच काही शिकवले. येसाबाई चाळिशीच्या आसपास तरी असावी असा माझा कयास होता. परिस्थितीने येसाबाईला पोक्तं बनवले होते. खडतर आयुष्यानी माणसं अवेळी म्हातारी होतात का?
हळूहळू तिची मुलं मोठी होऊ लागली तशा इतर वंचना वाढल्या. मुलांचे शिक्षण करता करता नाकी नऊ येऊ लागले. अडीअडचणीला पैसे उधार मागायची. प्रामाणिकपणे चुकतेही करायची. मुलं अभ्यासात फारशी रमली नाही. वहिनीने घरच्या घरी शिकवायचा प्रयत्नं केला, पण रागावण्याला घाबरून येईनाशी झाली. मी म्हणायचे, मुलींना तरी काहीतरी शिकवा, नाही तर त्याही धुणी-भांडीच करत बसतील तुमच्यासारखी. "काय वं ताई, त्यांची डोस्की चालंना." ती म्हणायची. शिक्षणाच महत्व तिला कधीच समजलं नाही.
मुली सात-आठ वर्षांच्या झाल्या तशी त्यांनाही कामावर आणू लागली. त्या तिला हातभार लावू लागल्या तेव्हा मला तिचा फार राग आला. "येसाबाई, हे तुमचे बाल कामगार आमच्या घरात आणू नका. " मी म्हणायचे. आधी ती काही बोलली नाही. मी फारच चिडले तेव्हा ती म्हणाली, "काय करू ओ बाई, आमच्या हमालपुर्‍यात पोरं लई फिरत्यात उनाडावानी - लई घोर लागते जिवाले. पोरीइची नाचक्की झाली तं कुटं जावं बाई? विजु झाला तवाच तुमी म्ह्टलं होतं आता बास म्हणुनशानी - म्याच न्हाई ऐकलं तुमचं. आता पोरं वाढा लागले तसं तरास बी वाढला" मी गप्पं झाले. अडाणी येसाबाईने मला पुन्हा एक धडा शिकवला होता. अखेर घरकामात मुलींनी हातभार लावला तरी ऑफिसचे काम येसाबाईने स्वतःच करायला पाहिजे असा नियम मी घालून दिला.
मध्यंतरी आम्ही वाडा सोडून फ्लॅटमधे रहायला गेलो. येसाबाई तिथेही येऊ लागली.
व्यवसायामुळे माझे बाहेरगावी आणि परदेशातही जाणे/रहाणे सुरू झाले तसा येसाबाईचा आणि माझा संपर्क कमी झाला. मधेच काही बारिकसारिक कुरबूर होऊन तिचे येणे ही बंद झाल्याचे मला परदेशात असताना कळले. मग काही दिवसानी ती पुन्हा कामावर रुजू झाल्याचेही कळले. एकदा भारतात गेली असताना नितूचे लग्नं झाल्याचे कळले. एरवी १२-१३ व्या वर्षी मुलीचे लग्नं लावल्याचे कळल्यावर मी तिच्यावर चांगलीच चिडले असते, पण हमालपुर्‍यात राहुन तरण्या ताठ्या मुलीची जबाबदारी ती फार काळ घेऊ शकणार नव्हतीच हे आता मी समजून घेऊ शकत होते.
एकदा मात्रं तिच्या आयुष्यात एक चांगली घटना घडली. नवर्‍याला कामाच्या ठिकाणी काही पैसे मिळाले आणि तिच्या भावाने हातभार लावला - त्या भरवशावर तिने चक्कं घर बांधले. अखेर हमालपुर्‍यातुन बाहेर पडली आमची येसाबाई. त्या वर्षी भारतात गेले तेव्हा तिच्या नविन, ऐसपैस घरात पाहुणचारही घेऊन आले.
माझं लग्नं ठरल्याचा आनंद माझ्या घरच्यांच्या बरोबरीने तिलाही झाला. रिसेप्शनसाठी आम्ही दोघं भारतात गेलो तेव्हा आपल्या बहिणीला आणि नविन जावयाला कुठे ठेऊ आणि कुठे नको अशी भावाची अवस्था. वहिनी नेहेमीप्रमाणे आल्या गेल्याचं बघायला तत्पर आणि आत चाललेली येसाबाईची लगबग. असं वातावरण होतं. येसाबाईला आम्ही अगदी घरच्यासारखं वागवतो हे बघून नवर्‍यालाही कौतुक वाटलं. नवर्‍यानी माझ्याबरोबर तिचा, ती काम करत असताना असे किती तरी फोटोही काढले. खरं म्हणजे त्यावेळी तिच्या घरातही बरीच कठीण परिस्थिती होती. नितू बाळंतपणासाठी घरी आली होती आणि स्वतः येसाबाईला एक छोटा अपघातही झाला होता. पण त्या कशाचीही तमा नं बाळगता सकाळपासून रात्रीपर्यंत ती आमच्या घरात पडेल ते काम करायची - जणु काही पुलंची "नारायणी".
मग पुढच्या दिवाळीत मी पुन्हा भारतात गेले (इटलीतुन गेले तेव्हा). लहान्या रितुचे आयुष्यही आता येसाबाईच्याच वळणावर जाणार असं दिसतं आहे. शिक्षणात तिचं मन अजिबात नाही आणि शिवणकाम वगैरे शिकण्याचे प्रयत्नंही अयशस्वी झाले आहेत. मोठी नितु अजुन अठरा वर्षाची झालेली नाही, पण एकदा अयशस्वी झाल्यानंतर दुसर्‍या खेपेला ती आई झाली आहे. मी अजुन आई झालेले नाही आणि येसाबाई मात्रं आजी झाली आहे. पिढ्या दर पिढ्यांच्या या दुष्टचक्रातून काही सुटका नाही का त्यांची? आपण दुष्टं चक्रात आहोत असं तिला वाटत असेल का? तिच्या चष्म्यातून पहाताना माझेही आयुष्य कुठल्यातरी दुष्टचक्रात गरगरताना दिसत असेल का?

Thursday, January 18, 2007

आता तरी...

शासकिय आकड्यानुसार आमची संख्या दोन कोटी आहे. स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहुती देणार्‍यांपेक्षा आमची संख्या जास्त आहे. सीमेवर शत्रूशी लढताना प्राण गमावणार्‍यांपेक्षाही जास्त आहे. मात्रं आमचं बलिदान हे सर्व अर्थानी मूक आहे, कारण हे दान आम्ही स्वेच्छेने दिलेले नाही, तर आमच्याकडून ह्कनाक घेण्यात आलेलं आहे. आमच्या आई-वडिलांनी, लोभी डॉक्टरांच्या मदतीने विज्ञानाचा दुरुपयोग करत, जन्मापूर्वीच आम्हाला खुडून टाकलं आहे, किंवा जन्मानंतर काही दिवसाच्या आतच...
गेल्या वीस वर्षात दोन कोटी चिमुकल्या कन्या ह्या भयंकर सामजिक प्रथेच्या बळी ठरल्या आहेत. आमचे आई-बाप समाजाच्या सगळ्या स्तरात आहेत, खेड्यात आहेत तसे शहरात आहेत. निरक्षर आहेत तसेच साक्षर. गरीब तसेच गर्भश्रीमंत. काश्मिर ते कन्याकुमारी, महाराष्ट्रं ते बंगाल सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आहेत.
हीच का ती प्राचिन गौरवशाली संस्कॄती? हेच का ते मुक्तं करणारे ज्ञान-विज्ञान? ह्यालाच प्रगती म्हणायचे का? हयाला सामजिक न्याय म्हणायचे का? महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणार्‍या समाजाची हीच मनसिकता का? हाच का राज्यघटनेने तुम्हाला दिलेला मुलभूत ह्क्कं?
आमच्या बलिदानाने काही प्रमाणात तरी लोकसंख्येला आळा बसला आहे - जाता जाता तो ही एक फायदा आम्ही देशाला करुन दिला आहे. पुरुषा-गणिक स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तुमच्या ह्या स्वतंत्र देशामधे जन्मण्याचा ह्क्कं आम्हाला मिळाला नाही, तरी एक फक्त विनंती आहे - आमच्या अनेक बहिणी आहेत, ज्या जन्मल्या तर आहेत, पण त्यांची स्थिती आमच्यापेक्षाही वाईट आहे. आता तरी घेऊ द्या त्या कळ्यांना मोकळे निश्वास, आता तरी उडू द्या त्या पर्‍यांना आपल्या पंखानिशी...आता तरी नका त्यांचे श्वास कोंडु, आता तरी नका त्यांची स्वप्नं जाळू...