Thursday, November 22, 2007

खबरदार पुनर्जन्म घ्याल तर!

तिबेटमधल्या लामांनी सरकारी परवानगी शिवाय पुनर्जन्म घेऊ नये असा आदेश चिनी सरकारनी काढला आहे. आदेश हास्यास्पद वाटला तरी चिनी सरकार मात्रं या बाबतीत गंभीर आहे. खुद्द दलाई लामांनी नियुक्त केलेला पंचेन लामा सरकारनी पळवला आहे आणि त्या जागी सरकारी उमेदवार नेमला आहे.

"श्रीमंत व्हा पण स्वातंत्र्य मागु नका" हा चीनी सरकारने जनतेला दिलेला मंत्र आहे.

चीनचे कम्युनिस्ट सरकार जनतेच्या स्वातंत्र्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवते आहे यात काहीच नवल नाही. या कार्यात ते आधुनिक तंत्रज्ञानाचाही चांगलाच उपयोग करून घेतात हे ही अपेक्षितच आहे. मात्रं सिसको, याहु, गुगल,मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या पैशावर डोळा ठेवुन चीन सरकारच्या या मुस्कटदाबीत बरोबरीचे भागीदारी बनतात ही बाब फारच गंभीर आहे.

व्यक्ति स्वातंत्र्य, अभिव्यक्ति स्वातंत्र्य,लोकशाही या तत्वांवर आधारित समाजव्यवस्थेत जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या या बहुराष्ट्रिय कंपन्या ह्या तत्वांशी किमान निष्ठा राखतील अशी अपेक्षा होती.

इंटरनेटसारखे खुले माध्यम जन्माला आले तो मानवजातीच्या इतिहासातला एक महत्वाचा क्षण होता. इंटरनेट खरं तर अनेक स्वप्नं घेऊनच जन्माला आले. अख्ख्या विश्वाचे एक सपाट,इवलेसे खेडे बनवण्याचे स्वप्नं. समान संधी, समान हक्कांचे स्वप्नं. जगभरातील स्वातंत्र्य प्रेमी, समता प्रेमींच्या हातात आलेले हे एक अमुल्य शस्त्रं. या आधुनिक शस्त्रामुळे स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍यांच्या मनात एक नविन उमेद निर्माण झाली. जनमानसावर आपली हुकुमत गाजवणार्‍या जुलमी सत्तांविरुद्ध संघटित होणे, आवाज उठवणे आता सामान्यांना सहज शक्य होणार होते. चीन, उत्तर कोरिया, म्यानमार या सारख्या देशांना माहितीच्या देवाण-घेवाणीवर नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य होईल अशी स्वप्ने स्वतंत्र वृत्तीच्या लोकांना पडू लागली.


पण नाही, ते स्वप्न दिवा स्वप्नंच ठरले. उलट चीनी सरकार इंटरनेटचाच गळा दाबण्यात यशस्वी झाले. चीनची बाजारपेठ बहुराष्ट्रिय कंपन्यांना खुणावत होती. त्या मोहापायी चिनी सरकार जे म्हणेल त्याला या कंपन्यांनी होकार दिला. त्याही पुढे जाऊन, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुस्कटदाबी अधिक प्रभावशाली कशी होईल त्याचे शिक्षण या कंपन्यांनीच चिनी सरकारला द्यायला सुरूवात केली!



मायक्रोसॉफ्टच्या चिनी ब्लॉग सर्व्हिसमधे व शोधयंत्रामधे स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी ह्क्कं हे शब्द ब्लॉक केलेले आहेत. सरकारी हुकुमावरून ब्लॉगज बंद करण्याचे प्रकार सर्रास चालु आहेत.

२००५ मधे शिताओ नावाच्या एका पत्रकाराला चीनी सरकारनी शिक्षा ठोठावली. ह्या पत्रकाराच्या कारवायांची याहुने पुरवलेली माहिती त्याच्या विरुद्धचा पुरावा म्हणुन देण्यात आली.

सिसको कंपनीने चिनी सरकारला एक खास टेहळणीची यंत्रणा उभी करून दिली आहे. या यंत्रणेमुळे नागरिकांच्या इंटरनेटवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येणे सहज शक्य झाले आहे.

वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की आहे त्या तंत्रज्ञानाचा नुसता गैरवापर होतो आहे असे नाही. मुलभूत हक्कांवर गदा आणण्यासाठी जाणिवपूर्वक तंत्रज्ञान पुरवण्यात येते आहे.

जगभरातील जनजिवनावर प्रभाव टाकण्याची प्रचंड क्षमता बहुराष्ट्रिय कंपन्यांकडे आहे. त्यांची संपत्ती कित्येक छोट्या देशांच्या एकुण उत्पन्नापेक्षा जास्त आहे. दुसरीकडे चीन दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावशाली बनत चालला आहे. आफ्रिकेतल्या तेल विहीरी एका पाठोपाठ एक ताब्यात घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. अमेरिकेसारखे प्रगत देश सुदानसारख्या मानवी अधिकाराची पायमल्ली करणार्‍या देशाशी आर्थिक संबंध ठेवत नाही. परंतु चीन मात्रं कुठलाही शहानिशा नं बाळगता या देशांना तंत्रज्ञान पुरवते आहे. नायजेरियन डेल्टा व सुदान सारख्या भागांमधुन चीनची वसाहत बनते आहे. चिनी कंपन्या स्थानिक तरूणांना रोजगार नं देता चीनमधुन मनुष्यबळ आयात करत आहेत. यामुळे स्थानिक लोकांमधे बराच असंतोष आहे.


भारतात जनेतेने विरोध केल्यामुळे बरेचदा प्रकल्प रखडतात. चीनमधे तसा प्रकार नसल्याने आर्थिक प्रगतीच्या दिशेने ते भरधाव निघाले आहेत. चीन एक यशस्वी, प्रगत देश झाल्यावर ती शासन यंत्रणा आदर्श म्हणुन इतर देशात राबवली जाण्याची दाट शक्यता आहे.
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन कंपन्यांचे हितसंबंध रशियात गुंतलेले नव्हते. खुली बाजारपेठ आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेची एकमेकात सरमिसळ झाली नव्हती. ती परिस्थिती आता राहिलेले नाही. त्याचे चांगले अथवा वाईट परिणाम होऊ शकतात. चीनी सरकार देशाला हळुहळु लोकशाहीकडे नेईल ही शक्यता सद्ध्या तरी दिसत नाही. उलट ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला असेच म्हणायची परिस्थिती आत्ता तरी आहे.

न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधे नोंदणी झालेल्या चिनी कंपन्यांमधे अमेरिकन गुंतवणुकदार पैसे गुंतवत आहेत. या पार्श्वभुमीवर चिनी लोकशाही चळवळीला बाहेरच्या देशातुन पाठिंबा कितपत मिळेल ही शंकाच आहे. राज्यव्यवस्थेत अमुलाग्र बदल आणायचा म्हणजे तात्पुरती का होईना आर्थिक अस्थिरता येणारच. त्यामुळे चिनी लोकांना स्वतंत्र होऊ द्यायचे की स्वतःचे आर्थिक नुकसान करून घ्यायचे हा निर्णय करायची वेळ आल्यावर आंतर-राष्ट्रिय समुदाय लोकशाहीच्या बाजुने उभा राहु शकेल का नाही ही शंकाच आहे.
कालची आर्थिक बलस्थाने स्वातंत्र्य, मानवी हक्कं व लोकशाहींचे गोडवे गात होती. उद्याची बलस्थाने मात्रं जाचक, हुकुमशाही धार्जिणी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Thursday, November 15, 2007

पहाटेस अर्घ्य दे दोन अर्ध्या स्वरांचे

उतरवुनी ठेव गंधार अन धैवत जरासे
पहाटेस अर्घ्य दे दोन अर्ध्या स्वरांचे

पॅट मथेनींचा आणि सकाळच्या रागांचा काही एक संबंध नसावा. पण त्यांच्या कार्यक्रमात अचानक सुचलेल्या या दोन ओळी. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम फारसा आवडला नाही. गेल्या वर्षीच्या रोमांचकारी अनुभवाची आस लावुन शेवटपर्यंत ऐकला. पण अखेरपर्यंत सूर सापडला नाही. नाही म्हणायला एंतोनियो सॅंचेझने ड्रम्समधे अक्षरशः जीव ओतला.
कार्यक्रमाचं मुल्यमापन करायला वापरण्यात आलेली (अशास्त्रिय) पद्धत:
स्वरलहरींवर जीव तरंगायला लागला का?
तरंगताना तो एका अनामिक प्रदेशात भटकायला गेला का?
तिथे किती वेळ थांबला?
परतल्यानंतर काही क्षण तरी आयुष्यात सगळं भरून पावलं ही भावना मनात भरून राहिली का?
हॅंग ओव्हर किती वेळ/दिवस टिकला?

Monday, November 12, 2007

व्हेजिटेरियन थॅक्स-गिव्हिंगचे निमंत्रण व मेन्यु

भारतात दिवाळीचे दिवस सरतात, त्याच सुमाराच इथे अमेरिकेत सणासुदीचे दिवस सुरू होतात.

ऑक्टोबरच्या अखेरिस बाळ-गोपाळांचा आवडता हॅलोविन येतो.

त्यानंतर येते थॅंक्स गिव्हिंग आणि अर्थातच मग ख्रिसमस व नविन वर्षाचे स्वागत.

१६२१ साली मे फ्लॉवर या जहाजातुन आलेले यात्रेकरू व इथले स्थानिक रेड इंडियन यांनी मिळुन चांगले पीक आल्याबद्दल मेजवानीचे आयोजन केले.

त्यानंतर काही वर्षे अनियमितपणे थॅंक्स गिव्हिंग साजरे केल्या गेले. सुमारे दोनशे वर्षांनी थॅंक्स गिव्हिंगला राष्ट्रीय सण म्हणुन मान्यता मिळाली.

आजच्या काळात कुटंबातील मंडळी एकत्रं येऊन जेवणाचा आनंद घेतात. या जेवणात टर्कीचे जेवण बनवतात. त्या पाठोपाठ पम्पकिन पायचा समावेश असतो.

थॅंक्स-गिव्हिंग आणि टर्की हे आज अविभाज्य मानले जात असले तरी मूळ मेजवानीत टर्की अथवा पम्पकिन पाय या दोन्हीचा ही समावेश नव्हता. टर्की नक्की कधी पासून आणि का या सणाशी जोडली गेली याच्या बर्‍याच आख्यायिका आहेत.

स्थानिक ट्रॅंगल व्हॅजिटेरियन सोसायटीने व्हेजिटेरियन थॅंक्स गिव्हिंगचे आयोजन केले आहे. अर्थातच टर्कींचा बळी नं देता जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

यंदा या मेजवानीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळातो आहे. दुपारचे बुकिंग हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे संध्याकाळचे जास्तीचे सिटींग उघडण्याचा आयोजकांचा प्रयत्नं आहे.

अधिक माहिती, रिझर्वेशन तसेच मेनु बघण्यासाठी इथे क्लिक करा:

http://www.trianglevegsociety.org/thanksgiving07/index.html

Tuesday, November 06, 2007

मंजुसाठी मुलगा पहा.....

कुणासाठी स्थळबिळ बघण्याइतकी मॅच्युरिटी माझ्यात मुळीच नाही. त्यातुन या मनस्वी मुलीसाठी स्थळ बघायची वेळ माझ्यावर यायलाच नको होती. मंजु एका चांगल्या घरातली मुलगी आहे,म्हणजे तिच्या वागण्यावरूनच तसं लक्षात येतं. उंचीपुरी, देखणी आहे. मी तिच्या हातचा चविष्टं स्वयंपाक चाखला आहे, रांगोळ्या, मेंदीची कलाकुसरही बघितली आहे.
बडनेरा स्टेशन. रात्रीचे १२ वाजुन गेलेले. बडनेर्‍याचं एक बरं आहे. दोनच प्लॅटफॉर्म्स आहेत. एका बाजुला मुंबईहुन येणार्‍या गाड्या आणि दुसर्‍या बाजुला मुंबईला जाणार्‍या गाड्या. नाही म्हणायला तिसरा एक प्लॅटफॉर्म आहे - खास अमरावतीच्या गाडीसाठी!
स्टेशनवर जरा अंधारच होता. पोचे-पोचे पर्यंत आम्हाला उशीरच झाला होता. पुलावरून खाली गाडी उभी असलेली दिसत होती. प्लॅटफॉर्मवर आलो तर ही गाडी आमची नसल्याचं लक्षात आलं (नशीब लक्षात आलं !)
सेवाग्राम एक्स्प्रेसमधे आपला डबा कुठे येणार तो अंदाज करून त्या दिशेनी चालु लागलो. अंधारात समोर दोन-चार आकृत्या दिसल्या. चक्कं ओळखीच्या वाटणार्‍या. तेच का ते? जरा डोळे चोळल्यासारखे करून बघितले. हो. तेच ते. मंजुचे बाबा श्री शंकर पापळकर मंजुशी खाणाखुणा करून काही तरी बोलत होते. बरोबर आणखीही काही लोक होते. बापरे, म्हणजे ही सगळी मंडळी मला निरोप देण्यासाठी चक्कं वझ्झरहुन खास आली होती.
आम्हाला बघताच ही मंडळी पुढे सरसावली. मंजुच्या हातात फुलांचा गुच्छ होता, आणि बाबांच्या हातात तिचा फोटो. नमस्कार चमत्कार झाले.
मंजुशी बोलायचा मी एक केविलवाणा प्रयत्नं केला. तिची खाणाखुणांची भाषा काही मला येत नाही. मंजुच्या बाबांच्या मध्यस्थीनेच तिच्याशी संवाद साधावा लागतो. तिच्या बाबांनी आधी अक्षता टाकल्याची आणि मग विमान उडाल्याची खूण केली.
या क्षणी मंजुच्या डोक्यात भविष्याबद्दल काय काय कल्पना आहेत आणि माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत हया विचारानी खरं तर मला दडपणच आलं. पण चेहेर्‍यावर तसं नं दाखवता तिचा फोटो नीट पर्समधे ठेवला.
"ताई, इथेच याच स्टेशनवर मंजुला पहिल्यांदा घ्यायला आलो होतो मी."मंजुचे बाबा म्हणाले.
तेव्हढ्यात कोणीतरी चहा-बिहा मागवल्यामुळे विषयांतर झाले. पापळकर जरा जुन्या आठवणींमधे रमले.
"मुंबईच्या गाड्या कमी होत्या ताई आधी. तिकीटासाठी स्टेशनमास्तरच्या खोलीत जायचो आम्ही, तेव्हा प्रतिभाताई पण असायच्या लायनीत."
गाडी हलायची लक्षणे दिसु लागताच मंजुचे बाबा पुन्हा मुळ मुद्यावर आले.

"ताई, तिकडचं एखादं स्थळ बघाच मंजुसाठी. किती मोठी गोष्ट आहे ताई, तुम्हीच सांगा, किती मोठं नाव होईल आपलं! पापळकरांची मुलगी लग्नं होऊन अमेरिकेत गेली म्हणजे आज काही साधी गोष्टं नाही..."
काय बोलावे ते मला सुचेना. मी आपलं हो ला हो लावत होते.

गाडी सुटली. वरच्या बर्थवर स्थिरस्थावर झाले. डोळ्यात जबरदस्तं झोप होती. फुलांचा गुच्छ उशाशी होता. त्या गुच्छातुन अपेक्षप्रमाणे तिखाडीच्या गवताचा सुगंध येत होता. हा सुगंध माझ्या चांगला ओळखीचा आहे. हा अगदी टिपिकल वझ्झरचा वास आहे. लोक कुलदैवताला जातात तशी मी वझ्झरला पापळकरांच्या इथे जात आले आहे. अमेरिकेत येण्याच्या आधीपासुनच तिथल्या भेटी ठरलेल्या आहेत.

मंजुचे बाबा शंकर पापळकर म्हणजे काही साधीसुधी व्यक्ती नाही. आधी एक, नंतर दोन, असे करत करत थोड्या-थोडक्या नव्हे तर शहात्तर मुलांना त्यांनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक मुलाला कसले तरी शारिरिक अथवा मानसिक आव्हान आहे. काहींचा बुदध्यांक शुन्याच्या जवळपास आहे. अख्ख्या महाराष्ट्रात अपंग अनाथ मुलांसाठी असलेले हे एकमेव रिमांड होम आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन किंवा बाहेरूनही ही मुले इथे आली आहेत.
त्या प्रत्येकाची कथा त्यांचे बाबा सांगु शकतात. कोण अनाथ, कोणाला जन्मदात्यांनी कुठे टाकले, बाबांकडे ते कसे आले, कोण ब्राम्हणाचा मुलगा, कोण मुसलमान, कोण एड्सग्रस्त. बहुतेक मुले अगदी तान्ही असतानाच त्यांच्याकडे आलेली आहेत.
बाबांच्या संगोपनात लहानाचे मोठी होऊन बर्‍याच जणांनी आपले संसारही थाटले आहेत. मतिमंद मुली सुखाचा संसार करताहेत, त्यांना निरोगी मुले-बाळेही झाली आहेत.
त्या सर्व कथा सांगताना बाबांचा चेहेरा अभिमानानी फुलतो.


बाबांच्या पंखाखाली मंजु आली तेव्हा चौदा पंधरा वर्षाची होती. आल्यापासूनच तिने घरचा बराच भार उचलला आहे. आतलं बाहेरचं सगळंच बघण्याची जबाबदारी तिच्यावर असते. गेल्या दोन-तीन वर्षापासुन तिच्या लग्नाची खटपट बाबा करतायेत. मंजु अतिशय स्वाभिमानी आहे आणि आत्तापर्यंत दोन मुलांना तिने नाकारले आहे! त्यामुळे सहाजिकच बाबा जरा अस्वस्थ आहेत.

पापळकरांचे कार्य म्हणजे खरं तर आमट्यांच्या तोडीचे आहे. त्यांचा जग प्रसिद्ध होण्याचा दिवस यायचा आहे एव्हढेच. आनंदवनाचा जसा कुष्ठंरोग्यांनी कायापालट केला आहे, तसाच या परिसराचा कायापालटही या अनाथ,अपंग मतिमंद मुलांनी केला आहे. एकेकाळी उघडे-बोडके असलेले ते डोंगर आता विविध वृक्षवल्लींनी नटले आहेत.

बाबांचा स्वभाव प्रसिद्धि परांगमुख म्हणा किंवा प्रसिद्धीवर ते नियंत्रण ठेवतात म्हणा. परवानगीशिवाय आश्रमात कोणी आलेले त्यांना आवडत नाही. मुलांसाठी पाहुण्यांनी काय खाऊ आणावा हे सुद्धा एक जागरूक वडिल या नात्यानी तेच सांगतात.

त्यांच्याच इच्छेला मान देऊन इतके दिवस मी त्यांच्या विषयी लेख लिहिण्याचा मोह टाळत आले आहे. पण आता मात्रं त्यांनी माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली आहे. ती पार पाडण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे.

मंजुसाठी मुलगा पहा. फार पैसेवाला नसला तरी चालेल. होतकरू, सालस, गुणी मेहेनती हवा. अमेरिकेतच असायला हवा असं काही नाही हं...कृपया माझं एव्हढं काम करा. कोणी चांगला मुलगा लक्षात आला तर मला kasakaay@gmail.com वर जरूर कळवा.