Tuesday, July 10, 2007

सिको, लेटर्स फ्रॉम इवो जिमा आणि व्हॉट अ वे टू गो...

शुक्रवारी रात्री मायकल मूरचा "सिको" बघितला. सिनेमा फार छान आहे. अमेरिकेतल्या आरोग्यसेवेची कशी वाट लागली आहे ते बघण्यासाठी अमेरिकेत रहाणार्‍यांनी आणि येऊ पहाणार्‍यांनी हा सिनेमा जरूर बघावा.
शनिवारी सकाळी इनो रिव्हर फेस्टिवलला जायचे असे नवर्‍याने जाहीर केले. त्यासाठी तो चक्कं लवकर उठलाही. मला खरं तर सतारीची प्रॅक्टिस करायची होती विकेंडला. पण हे असे प्लॅन असल्यावर कसला रियाज अन कसलं काय! अखेर लग्नाच्या ह्या साईड इफेक्टला शरण जात मी त्याच्याबरोबर जायचे मान्य केले. (लग्नं झालेले असल्यानेच खरं तर शहिद परवेजांसारखी सतार वाजवता येत नाही!) फेस्टिवल छान होता. संध्याकाळी घरी आलो आणि लगेच आर्ट म्युझियमच्या आऊटडोर थियेटरमधे "लेटर्स फ्रॉम इवो जिमा" हा तद्दन हॉलिवुडी युद्धपट बघायला गेलो. सिनेमा (माझ्यामते) टुकार असला तरी मोकळ्या मैदानात गवतावर पसरून आरामसे लोळायला मजा आली. रात्री घरी आलो तेव्हा बारा वाजून गेले होते. "उद्याचा - खरंतर आजचा रविवार मी मला हवा तसा घालवणार" असे नवर्‍याला सांगून पलंगावर अंग टाकले.
सकाळी उठून पाहिले तरे नवर्‍याची इ-मेल होती. (हो - आम्ही घरातल्या घरात एकमेकांना इमेल पाठवतो आणि फोनही करतो). एका मित्राने "व्हॉट अ वे टू गो" नावाच्या डॉक्युमेंटरीचे स्पेशल स्क्रिनिंग असल्याची माहिती पाठवली होती. "नो वे - ओळीने दोन दिवस सिनेमे पाहिले आता तिसरा नको" असं उत्तर पाठवायचे होते, पण सिनेम्याचा विषय पाहून "मे बी" असं उत्तर पाठवलं.
नवरा उठेपर्यंत जरा सतारीच्या तारा छेडल्या. दुपारी बाहेर जाऊन बाजारहाट केला, सासू सासर्‍यांची खबरबात घेतली आणि मग आता सगळी कामं झाली असल्याने गिल्ट फॅक्टर दूर झालेले होते, त्यामुळे सिनेमा बघायला गेलो.
हा सिनेमा अजुन प्रदर्शित झालेला नाही, पण कदाचित प्रदर्शित झाला आणि तुमच्या गावात आला तर जरूर बघा. सिनेमाचा विषय आहे "Life At The End Of Empire - A middle class white guy comes to grips with Peak Oil, ClimateChange, Mass Extinction, Population Overshoot and the demise of theAmerican Lifestyle"
http://whatawaytogomovie.com/
हा सिनेमा बघण्याच्या आधीच मी अंतिम युद्ध लिहिले हे बरेच झाले. नाही तर बर्‍याचशा कल्पना माझ्या स्वतःच्या आहेत असं मला म्हणताच आलं नसतं.
हा माहितीपट फार क्लिष्टं आहे. सुरूवातीलाच तशी सुचना दाखवली आहे. वैज्ञानिक, लेखक, सामान्यं माणसं यांच्या मुलाखती आणि दिग्दर्शकाचे स्वगत या माध्यमातून आपली संस्कृती आणि पर्यावरणाचा र्‍हास याविषयी संवाद घडवून आणलेला आहे. काही काही संवाद फार परिणामकारक आहेत. उदा. सुरूवातीला पेट्रोलचे साठे संपल्यावर काय होईल याचे विदारक चित्रण केले आहे. "पण मग इतर प्रश्नं इतके गंभीर आहेत की पेट्रोलचा प्रश्नं फारच क्षुल्लक आहे असं वाटायला लागतं" दिग्दर्शक म्हणतो.
त्यानंतर लगेच एक वैज्ञानिक "ग्रीन हाऊस इफेक्टमुळे हवाच नसल्यामुळे पेट्रोल जळणारच नाही - त्यामुळे साठे आहेत की नाही हा प्रश्नंच दुय्यम ठरणार आहे" असं म्हणतो. दिग्दर्शकाचे स्वगत : "बघा - आत्ताच तुम्हाला पेट्रोलच्या साठ्यांची काळजी वाटेनाशी झाल्यमुळे जरा बरं वाटतंय ना?"
आपण सर्व मानव मिळून रोज २०० प्रजातींना अस्तंगत करत आहोत यावर एक वैज्ञानिक म्हणतो - "रहात्या घराच्या रोज २०० विटा काढल्या तर घर किती दिवस घर उभे दिसेल?"

पण या सगळ्यावर उपाय काय? दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे खरं तर काहीच उपाय नाही. असला तर एकच - सर्व भौतिक प्रगतीचा त्याग करायचा. मानव शेती करायला लागायच्या आधी ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत परत जायचे. अगदी ठरवून. लोकसंख्या आधी कमी करायची. नाहीतरी हे होणारच आहे, मग आपत्तींमुळे होण्याची वाट कशाला बघायची?

बघुन मन सुन्नं झालं. बर्‍यापैकी विवादास्पद मत आहे खरं....




5 comments:

Nandan said...

sickoche trailers baghoon to pahayachaach he tharavala hotach, tyaat aata 'what a way to go' chi to-see list madhe nond karun Thevaleey. digdarshakaacha mat jaraa Tokaacha vaaTatay khara, paN to jo muddaa maanDato aahe todekheel mahattvaachaach aahe.

Anonymous said...

तुमचा लेख आवडला. एकूणच पॄथ्विवासियांचे भविष्य धोक्यात आहे यात काही वाद नाही आणि याला जबाबदार आहे आपलीच मानवजात. कालच मला आलेले एक प्रेझेंटेशन मी 'ईयर २०७०' या नावाने अपलोड (http://tinyurl.com/394kca) केले आहे. त्यात भविष्यात पाण्यावाचून होणारे हाल दाखवले आहेत. वाचकांनी जरूर हे प्रेझेंटेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून जनजागॄती होईल.

माझी दुनिया

HAREKRISHNAJI said...

मजा आहे तुमची असे छान छान चित्रपट पाहायला मिळतात. शहीद भाईंना असा चिमटा परत का बरे . मी सुदधा एकदा का hurt झालो की मग शालजोडीतलॆ हाणायची कोणती संधी सोडत नाही. पण कटु अनुभव विसरुन जाणे बरे.

मुबईतील सर्व भटक्या कुत्रांना मारुन टाका असा एक मतप्रवाह आहे, नुकतेच मनपा आयुक्तांनी पण त्यांचे ही हेच मत असल्याचे सांगीतले. फार पुर्वी मी अजुन किती प्रजाती आपण नष्ट करणार आहोत ? आदीमानवाच्या काळापासुन त्याचा मित्र असलेला प्राणी आता का नकोसा झाला आहे ? माणसाला रस्तावरील कुत्रा चावला तर ती बातमी होते व मानव मानवाचाच युद्धामधे प्रचंड संहार करत असतो , ते आपण मुकाट्याने सहन करतो, मानवाची गुन्हेगारी खपवुन घेतो वगैरे अश्या अर्थाचे एक पत्र सर्व वर्तमानपत्रांना पाठ्वले होते. अर्थातच त्याला प्रसिद्धी मिळाली नाही.

पर्यावरण हा विषय तसा दुर्लक्षीत. साधे perfume वापरणे आपण थांबवु शकत नाही.

नष्ट पावत चाललेल्या प्रजाती व पर्यावरणाचा र्‍हास या विषयात माझ्या मुलाला शिकायचे आहे, पण मी सोडुन बाकीचे सर्व त्याला विरोध करत आहेत, सर्वांचा मुददा एकच खाशील काय ?

Nandan said...

ParyaavaraNaachya raxaNaasaaThee ajoon ek (thoda drastic) upaay --
http://www.bloomberg.com/apps/news?pid=20601093&sid=aijQ0.2BMGw8&refer=home

A woman from India said...

माझी दुनिया व नंदन,
प्रतिसादांबद्दल आणि माहितीबद्दल धन्यवाद.
हरेकृष्णाजी,
मला आधीचे संदर्भ शोधत केलेले विनोद आवडतात म्हणून सहज लिहीलं.
तुमचं म्हणणं बरोबरच आहे. लोकसंख्या फार झाली आहे म्हणून मुलांना जन्म देऊ नका असं म्हणत नाही आपण, पण इतर प्राण्यांना मात्रं सरळ नष्ट करतो.
तुमच्या मुलाला या विषयात रस आहे ही आशादायक बाब आहे. त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. आणखी काही वर्षात या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. काही नाही तरी भितीपोटी तरी लोक विचार करू लागले आहेत.