Monday, May 29, 2006

दिपा मेहतांचा Water

चित्रपट, दूर-चित्रण अशा मध्यमांशी आत्ता पर्यंत माझा दूरचाच संबंध होता. अनेक वाहिन्यांच्या नं संपणार्‍या रडकथां आणि जाहिरातींच्या मार्‍यापासुन सुटका झाली म्हणुन अमेरिकेत आल्यावर एक निश्वासही टाकला होता. पण हौशी नवर्‍याने नुकतेच एका मसिकासाठी चित्रपट आलोकन करायचे मान्य केल्यामुळे आम्ही दिपा मेहतांचा Water बघायला गेलो.

मेहतांच्या Earth आणि Fire, या आधीच्या दोन चित्रपटांप्रमाणेच Water सिनेमा गंभीर असणार, आषयघन आणि hard hitting असणार हे अपेक्षितच होतं. आणि भारतात कोणाला तरी हा सिनेमा काढ्णं म्हणजे हिंदु धर्माचा अपमान वगैरे होतो आहे असं वाटलं, म्हणुन मेहतांना श्रीलंकेत जावुन चित्रण करावं लागलं म्हणे. जग भर आपण आपल्या देशातल्या स्वातंत्र्याचा डंका पिटत असलो, आणि लोकशाही नसलेल्या देशांकडे (चीन आणि पाकिस्तान असे वाचावे) तुच्छ्तेनी पहात असलो तरी खरोखरच्या लोकशाहीपासून आपण कोसो दूर आहोत हेच या चित्रपटाच्या उदाहरणावरुन दिसुन येतं.

चित्रपट सुरु होतो तो सात-आठ वर्षे वयाच्या छुयीयाच्या नवर्‍याच्या अंत यात्रे पासुन. अजाण छुयीयाला आपले लग्नं झाले होते याची पुसट्शी आठवण असते. दु:खी, हताश वडिल जेव्हा "छुयीया, अब तुम विधवा हो गयी" असं तिला सांगतात तेव्हा ती "कब तक?" असं विचारते.

पुढील प्रसंगात तिला एका विधवा आश्रमात नेऊन सोडतात. आश्रम मधुमती नामक व्रुद्ध विधवेच्या देखरेखी खाली चालवलेला असतो. छुयीयाला मुळीच तिथे रहायचे नसते आणि एक दिवस आपली आई आपल्याला घेऊन जाईल असं तिला वाटत असलं तरी हळुह्ळु ती तिथे रूळ्ते. समाजाने टाकुन दिलेल्या त्या स्त्रियांची आयुष्ये, आपसातले हेवे-दावे आणि स्वभाव विशेषांचे अत्यंत प्रभावी चित्रण दिसुन येते. एकिकडे गावातील उच्चभ्रू, मधुमतीशी संगनमत करुन, आश्रमातल्या तरूण स्त्रियांचे शोषण करत असतांना, दुसरीकडे १९३८ च्या त्या काळामधे राजा राम मोहन रॉय, गांधीजी यांच्या सारख्या समाज सुधारकांमुळे प्रभावित झालेला नारायण शिक्षण संपवून घरी परत आलेला असतॊ.

नदीवर अंघोळ करायला गेलेल्या छुयीयाचा अवचित नारायणाशी परिचय होतो. पांढरे वस्त्र ल्यायलेली, वपन केलेली छुयीया आपली ओळख करुन देते, आणि नाव सांगुन झाल्यावर "मै विधवा हूं" असं पण सांगते.

चिमुरड्या छुयीयाचे निरागस, स्वाभिमानी अस्तित्व आश्रमातल्या इतर स्त्रियांना बळ देउन जाते. नारायणाच्या प्रोत्साहनामुळे कल्याणी पुनर्विवाहाचा विचार करु लागते. कल्याणीचा इरादा पूर्ण होतो का? छुयीयाचे भविष्य काय? हे जाणुन घेण्यासाठी सिनेमा बघणे जरुरी आहे.

छुयीयाचे काम करणारी बाल नायिका सरला, अभिनेत्री मनोरमा (मधुमती), सीमा बिश्वास, विदुला जवळ्गेकर, जॉन अब्राहिम यांनी प्रभावी अभिनय केलेला आहे. लिसा रे (कल्याणी) चा प्रयत्न चांगला असला तरी अशिक्षित स्त्रीचा रांगडे पणा ती अभिनयात उतरवु शकलेली नाही.

गंगेच्या काठावर घडणार्‍या या कथानकामधे पाण्याचा उपयोग फारच चांगल्या रितीने करून घेतला आहे. Beautiful compositions of the shots, effective camera angles make it a pleasant experience to watch it on the big screen.

चित्रपटात विनोदाचा प्रभाविपणे उपयोग करुन घेतला आहे. प्रसंगांमधे अतिशयोक्ति नाही, loud acting नाही तरिही हा सिनेमा मनात घर करून बसतो तो वास्तववादी कथेमुळे.

भारतातल्या लोकशाहीवादी आणि स्त्री वादी संघट्नांनी हा सिनेमा भारतात जरूर दखवला जावा अशी जोरदार मागणी करायला हवी. डोळेझाक केल्याने प्रश्न मिटत नाहीत. स्त्रियांच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली असली तरी अजुन बरीच वाट्चाल बाकी आहे. सतीसारख्या प्रथा कालबाह्य झाल्या असल्या तरी, विज्ञानाचा दुरुपयोग करुन, स्त्रियांना जन्मं घेण्याचाच अधिकार नाकारण्यात येतो आहे.
ते ही तितकेच निंदनिय आहेत आणि दुर्दैवानी सुशिक्षित लोकही त्यात मागे नाहीत. चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा या अनिष्टं प्रथांना विरोध करुन दाखवा बरं!!!!

No comments: