Tuesday, October 30, 2007

प्रवासाचे क्षण

प्रवास करायचा म्हंटला की कोणाच्या अंगात उत्साह संचारतो तर काहींच्या अंगावर मात्रं काटा येतो. आता क्वचित कधीतरी प्रवास करावा लागण्याचे कारण खेदजनक असु शकते. पण बहुतेक वेळा मात्रं आपण नातलगांना/मित्रांना भेटायला, कुठल्याशा प्रसंगाला उपस्थित रहाण्यासाठी, नोकरी धंद्यानिमित्त किंवा नुसतंच भटकायला प्रवास करतो. त्यामुळे एअरपोर्टवर गेलं की सगळीकडे आनंदी वातावरण असायला हवं की नाही? पण प्रत्यक्षात मात्रं तसं अजिबातच दिसत नाही.

न्यूयॉर्कहुन न्याहारीकरून निघालेला सदु जेवणाच्या वेळेच्या आत शिकागोला पोचलेला असतो. हया प्रवासासाठी सदुने घोडागाडी किंवा आगगाडी ऐवजी विमानाचा वापर केल्याने त्याचे कितीतरी दिवस, किमान काही तास तरी नक्कीच वाचले आहेत. पण हा वेळ वाचल्याचा आनंद म्हणा किंवा कृतज्ञता म्हणा सदुच्या चेहेर्‍यावर कधीतरी दिसते का? सदुच काय, पण विमानातुन उतरलेली कोणतीही व्यक्ति बघा, जमिनीवर पाय पडताच अगदी सुसाट पळू लागते. जणु काय आत्ताच्या आत्ता बाहेर पडलं नाही तर हे मुक्कामाचं गावच नाहीसं होणार आहे. हातात धरलेली पुलमन बिचारी त्यांच्या मागे घरंगळत असते गरर्र्र गरर्र गरर्र आवाज करत.
बरं चालावं लागु नये म्हणून लांबच्या लांब वॉकवे म्हणजे सरकणारे पट्टे केलेले असतात. त्यावर तरी हसत खेळत शांततेने उभं रहावं की नाही? नाही, हे त्यावरूनही धावत जाणार. जणू काही तो वॉकवे कुठेतरी जमिनीच्या आत लुप्तं होणार आहे अगदी पुढच्या मिनिटाला.
बरं ह्यांच्याशी दोन शब्दं बोलावं म्हंटलं तर कानात बोळे घातलेले असतात - कापसाचे नाही, स्पिकरचे. गरम तेल ओतावं कानात तसं संगीत ओतणारे ते बोळे. समोरच्याचा आवाज बंद केला की त्याच्या अस्तित्वाची दखलही घेण्याची गरज नसते. त्यामुळी ही मंडळी निर्जन प्रदेशात एकटेच चालल्यासारखी शून्यात बघत चालत असतात.
कामकरी महिला कानात बोळे नं घालताही शुन्यात बघत चालतात. कडक इस्त्री केलेले बिझनेस फॉर्मल, इस्त्री केल्यासारखेच दिसणारे केस. चेहेर्‍यावर पदाच्या तोलामोलाचा मेकअपचा मुखवटा. ताठ मान, ताठ पाठ. उगाच वाकलं तर हाडबिड मोडायचं. नजर अगदी सरळ समोर. मागे धरलेल्या अगदी ताठ हातातून घासल्या जाणार्‍या सामानात ऑफिसच्या फायली आणि लॅपटॉप. "मी ऑफिसच्या कामाने जातेय ना? यावेळी मी आई नाही, बायको नाही आणि स्त्री तर नाहीच नाही. आत्ता मी आहे फक्त एक निर्विकार एक्झिक्युटिव्ह". उंच टाचांच्या चपलांच्या टॉक टॉक आवाजानेच त्यांना झपाटले असते बहुदा. टॉक टॉक टॉक गरर्र गरर्र गरर्र.. यंत्रवत चालणे सुरू.
अहो, सुट्टीला जात असाल किंवा कामानिमित्त जात असाल, जरा घडीभर तरी आस्वाद घ्याकी तुमच्या प्रवासाचा!
तिकडे सदुला घ्यायला येणार्‍याचीही अवस्था त्रिशंकुसारखी असते. पार्किंगला पैसे पडू नये म्हणुन आणि आपल्या सदूला अगदी मिनिटभरही जादा एयरपोर्टवर घालवाला लागू नये म्हणुन हा माणूस एयरपोर्टच्या प्रदक्षिणा घालत असतो.

तीन चकरा. आली का फ्लाईट? बरं अजुन चकरा मारतो.
दहा चकरा. सामान घेतलंस का? हं मं बाहेर ये, मी येतोच आणखी एक चक्कर मारून.
बरं प्रवासात कंटाळले असतील म्हणुन असे वागतात म्हणावं तर सुरूवात कशी होते पहा.
बोर्डिंग सुरू व्हायच्या आधीच गेटसमोर रांगेत उभे रहातील. अहो सीट नंबर मिळालाय ना? मग आता विमानात सर्वांच्या आधी चढलात म्हणून मुक्कामाला इतरांपेक्षा पाच दहा मिनिटं आधी पोचणार आहात की काय? आणि विशेष म्हणजे प्रवास जितका मोठा तितकी ही रांग लवकर सुरू होते. आठ-दहा तासाची फ्लाईट असली तरी त्या हवेतुन जाणार्‍या कोंडवाड्यात घुसायची यांना किती घाई. खरं म्हणजे बोर्डिंगच्या आधी सर्व प्रवाशांनी मिळून काही तरी व्यायाम करावा किंवा गाण्याच्या भेंड्या, मामाचं पत्रं हारवलं सारखे खेळ खेळावे. पण नाही. तिथे रांगेत उभे रहातील अर्धा अर्धा तास.

बरं आता मुक्कामाला जातील, छान निसर्गरम्य ठिकाणी. तिथे जाऊन तरी जीवाला शांतता लाभू देतील का? तो निसर्ग रम्य देखावा तासनतास नुसता डोळ्यात साठवावा, निसर्गाशी एकरूप व्हावं, अंतर्मुख व्ह्यावं. चिडीचुप राहुन पाखरांची गाणी ऐकावी. झर्‍यात पाय सोडावेत, एखाद्या कातळावर चढुन डुलकी घ्यावी, सुरेल सोबत असल्यास हात हातात घ्यावा. वारा प्यावा, मावळत्या सूर्याला निरोप द्यावा, उगवत्या चंद्राचे चांदणे अंगावर सोसावे. त्या प्रदेशाची जमेल तितकी माहिती काढावी, तिथल्या माणसांच्या संस्कृतीविषयी जाणून घ्यावे. त्यांचे रोजचे जीवन कसे असेल ते अनुभवावे.
छे छे तसं काही होत नाही आपल्या सदुच्या बाबतीत. सदु आणि मंडळी डोंगराच्या टोकापर्यंत जातील. तिथे उभे राहुन फोटो काढतील. तेव्हढ्यात कोणी तरी विचारतं तुमच्या सगळ्यांचा एकत्रं फोटो काढु का? हो, हो छान, धन्यवाद. झालं. पुरावा मिळाला जाऊन आल्याचा. आता पुढचा पॉंईट. आलो आहोत ना इतक्या दुरून, मग सगळं बघायला नको? कुणीच नं दिलेलं टार्गेट पूर्ण करायच असतं, ते ही यशस्वीपणे.
या दृष्यापेक्षा पुढचं दृष्य जास्तं चांगलं असेल. या क्षणापेक्षा पुढचा क्षण जास्तं चांगला असेल म्हणून हा क्षण सरायला हवा. आजच्यापेक्षा उद्या जास्तं चांगला असेल. या चांगल्या उद्यासाठी आजचे बलिदान व्हायलाच हवे का?






नोंद: ते आम्ही नव्हे.

Friday, October 26, 2007

वणवा

दक्षिण कॅलिफोर्नियातील आग अजुन आटोक्यात आलेली नाही. लाखो लोक विस्थापित झाले आहेत आणि अब्जावधी डॉलरची मालमत्ता आगीत भस्मसात झाली आहे. तेथील मराठी ब्लॉग लेखक, वाचक तसेच इतर सर्व या संकटातुन सुखरूप बाहेर पडतील अशी आशा करू या.
अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही अशा आपत्तींचा सामना करणे शक्य नाही. आपण इथले कर्ते करविते नाही हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. कॅलिफोर्निया, नेवाडा, युटा, एरिझोना, कोलोरॅडो या राज्यात असलेल्या वाळवंटी प्रदेशात निसर्गाने अनेक आश्चर्यांची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. ग्रॅंड कॅनियन, ब्राईस कॅनियन या सारखी सौंदर्य स्थळे बघण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातुन आलेले प्रवासी इथल्या प्रतिकुल हवामानाचा सामना करत या स्थळांना भेटी देतात.
या भागात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे, तरीही ही आश्चर्यकारक स्थळे निर्माण होण्याला पाणीच कसे कारणिभूत आहे हे आर्चिस नॅशनल पार्क मधे दाखवण्यात येणार्‍या माहितीपटात बघायला मिळते.
आजच्या लेखाचा विषय अर्थातच पाणि नसून आग आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगींच्या मागची कारणे काय?
दगड धोंड्यांनी भरलेला वाळवंटी प्रदेश, पाण्याचा अभाव, बहुतांश खुरटी झाडे. जमिनीच्या ज्या भागात नियमितपणे थोडेसे का होईना, पाणि झिरपत असले की त्या आधारावर थोडी फार मोठी झाडे तग धरतात. वातावरणात आर्दता नसल्याने खाली पडलेली पाने, काटक्या इ. सहजा सहजी कुजत(डिकंपोज) नाहीत. उलट वाळल्यानी ती अधिकच ज्वालाग्राही बनतात.
प्रश्नं:
लाखो वर्षांपासून जर हीच परिस्थिती आहे तर हे जंगल आधीच का भस्मसात झालं नाही?
उत्तर: त्याचं कारण आहे निसर्गानी केलेली एक सोय. अशा जंगलात जेव्हा वादळ होते आणि विजा चमकतात, तेव्हा छोट्या छोट्या आगी सतत लागत असतात. एका विशिष्टं प्रकारे झाडावर वीज पडली की त्या झाडातील सर्व बाष्प एका क्षणात बाहेर पडते आणि झाडाला आग लागते. ती आग आजूबाजूला पसरते आणि त्या परिसरातील छोटी झाडे, झुडपे व इतर ज्वालग्राही पदार्थ जळून खाक होतात. मात्रं त्याच बरोबर पाऊसही पडत असल्याने आग फार मोठी होत नाही. अशा रितीने ज्वालाग्राही कचरा वरचे वर नष्टं होतो. त्याशिवाय मोठ्या झाडांमधे योग्य अंतरही राखले जाते. ही आग नेहेमीचीच असल्याने येथील जीवसृष्टी त्यापासून आपला बचाव सहज करू शकते.
प्रश्न:
मग आताच मोठी आग का लागली? तीही मनुष्य वस्तीच्या जवळच का लागली?
उत्तर:
अशा प्रतिकुल परिस्थितीत जेव्हा प्रगत माणसे तिथे रहायला आली तेव्हा जंगलातील एकुण एक झाड आपल्या उपयोगी तरी पडावे असे त्यांना वाटु लागले. त्यामुळे त्यांनी नैसर्गिकपणे लागलेल्या या आगी विझवायला सुरूवात केली. सुरवातीला त्यामागे कदाचित चांगलीच भावना असेल. वाळवंटात झाडांना आगीपासून वाचवणे म्हणजे निसर्ग संवर्धन करणे असेही बर्‍याच लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. भावना चांगल्या असल्या तरी निसर्गाच्या कामात ढवळा ढवळ करण्याचे परिणाम हानिकारकच असतात. गेल्या काही दशकात या छोट्या आगींची उपयुक्तता जंगल नियोजन करणार्‍यांच्या लक्षात आली आहे. (हल्ली जमेल तिथे मुद्दाम अशा आगी लावण्यात येत आहेत. याला प्रिस्क्राईब्ड फायर असे नाव आहे.)
पण दरम्यानच्या काळात इथे मोठमोठ्या वस्त्या उभारल्या गेल्या. विहीरी, छोटी धरणे वाढत गेली आणि शहरे वसली. कोलोरॅडो नदीवर बांधलेल्या हुवर धरणाचे पाणि आले आणि लॉस एंजिल्स, सॅन दियेगो अशी प्रचंड आकाराची शहरे तयार झाली. मनुष्य वस्तींजवळ आगी नकोत म्हणून तेथील आगी विझवण्याचे काम सातत्याने सुरू राहिले.
अशा रितीने मनुष्य वस्त्यांजवळ ज्वालाग्राही पदार्थांचा खच वाढतच गेला. एका दृष्टिने हा बॉंब बर्‍याच वर्षांपासून टिकटिक करतो आहेच. तज्ञांना ते माहिती असुनही फार काही करता येत नव्हते. त्यात कोणी नतद्रष्टं माणसांनी जोराचा वारा वहात असताना मुद्दाम तीन आगी लावल्याचा संशय आहे. आता याला काय म्हणावं?
अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस?

Wednesday, October 03, 2007

टेंप्लेट मधील बदल व टयुलिपची नाराजी इ.

मी सध्या बाहेरगावी आहे. मला इंटरनेटचा अगदी गरजेपुरताच वापर करता येतो. पण त्यातही मला काही लेखांचे प्रिंट आऊट काढायचे आहे. ते नीट यावेत म्हणुन टेंप्लॆट मधे तात्पुरते बदल केले आहेत. त्याबद्दल क्षमस्व.
ट्युलिपने माझ्या आधी वंदु आणि नंतर ...? वर नाराजी व्यक्त करणारा भला मोठा लेख प्रसिद्ध केला आहे. तो
इथे वाचा.
माझ्या लेखाची इतकी मोठी दखल घेतल्याबद्दल ट्युलिपचे आभार. टाळ्या आणि टिकांचे सारखेच स्वागत.
एक समाज म्हणुन आपण प्रश्नांना थेट हात घालणार आहोत की याला काय वाटेल, त्याला काय वाटेल असा विचार करत अस्तित्वात असलेली माहितीही दाबुन ठेवणार आहोत?
प्रश्नं तुमच्यासमोर मांडला आहे पुराव्यांसहित. आता वाईट बातमी घेऊन येणार्‍या दूताचाच शिरच्छेद करा अथवा प्रश्नं मिटवण्यासाठी प्रयत्नं करा.
तुमच्या भागातील गणेश मंडळांशी संपर्क साधा. त्यांना हे फोटो पाठबा, आपल्या उत्साहाच्या उधाणाचे काय परिणाम होतात ते त्यांना कळू द्या.
ट्युलिपला या विषयावर चर्चा करायची नाही. पण तुम्हाला करायची असेल तर जरूर इथे प्रतिक्रिया द्या.
टीप:
अश्विनी अंतिम युद्धचे पुढचे भाग प्रसिद्ध करते आहे. ते मी प्रवास संपल्यावरच इथे जोडणार आहे.