Wednesday, August 15, 2007

बदलत्या भाषा

मराठीवर आक्रमण होत असल्याची तक्रार बरेच वर्षांपासुन ऐकायला मिळते आहे. याला आक्रमण म्हणायचे की समृद्धतेत पडलेली भर म्हणायचे या विषयी मतभेद आहेतच.
मराठीवर इंग्रजीचाच नव्हे तर मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातुन सतत भडिमार झाल्यामुळे हिंदीचाही प्रभाव पडु लागला. नंतर संगणक आणि इंटरनेट वापरणार्‍या माझ्यासारख्यांनी इतर भाषेतील शब्दं वापरण्याबरोबर व्याकरणाचे नियमही सैल करायला सुरूवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात बारहासारखी सुविधा अस्तित्वात नसताना बर्‍याच लोकांनी रोमन लिपीत मराठी लिहायला सुरूवात केली.
हौशी ब्लॉग लेखकांनी जर नियमांची पायमल्ली केली तर ते समजण्यासारखे आहे. मात्रं काल प्रत्यक्ष
महाराष्ट्र टाईम्स मधे "इतकी सारी कठीण परिस्थिती असतानादेखील तिच्या आईने आपल्या मुलीचं म्युझिकप्रति असलेलं पॅशन तसंच राहावं याची दक्षता घेतली" असं हिंग्लिशमधुन अनुवादित केलेलं वाक्य वाचुन मलाही गरगरलं. याला अक्ष्यमं हलगर्जीपणा म्हणावे की असे वाक्प्रचार मराठीत प्रचलित झाल्याची मान्यता म्हणावे?
अर्थात बदलत्या भाषेविषयी किंवा ती नष्टं होण्याच्या मार्गावर असल्याची भिती वाटणे हे फक्तं मराठीच्याच बाबतीत घडते आहे असे ही नाही. इथे अमेरिकेत कायदेशिर अथवा बेकायदेशिर मार्गाने येणारे मेक्सिकन लोक इंग्रजी शिकत नाहीत याविषयी बहुजनांमधे बराच असंतोष दिसुन येतो. वैश्विकीकरणामुळे सर्वच भाषांचा एकमेकांवर प्रभाव पडु लागला आहे. संगणकावर टाईप करताना you चा u आणि for चा 4 होतो. हिंग्लिश, मॅंल्गिश (मॅंडेरिन आणि इंग्लिश) आणि स्पॅंगलिश (स्पॅनिश आणि इंग्लिश) अशा संकरित भाषाही नव्याने तयार होत आहेत. आपण सगळे मिळून नकळत एका जागतिक भाषेकडे वाटचाल करत आहोत का?

Wednesday, August 08, 2007

उजळो तुझा असाच मंद प्रकाश

अमेरिकन दुतावासाने डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना पुरेसे (?) उत्पन्नं नसल्याच्या कारणास्तव व्हिसा आधी नाकारला आणि मग चुक लक्षात आल्यावर ओशाळून प्रदान केल्याची बातमी कुठेतरी वाचली होती. त्यावरून अखेर त्यांचा अमेरिकेत येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे कळले होते. मात्रं प्रत्यक्षात त्यांच्या भेटीचा योग येईल अशी कल्पनाही नव्हती.
रॅले येथील निशा मिरचंदानी यांनी बाबांच्या जिवनावर "विसडम सॉंग" नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचा अमेरिकेतील प्रकाशन सोहोळा ड्युक विद्यापिठात एका छोटेखानी कार्यक्रमात पार पडला.


आपला व्यवसाय सोडून सामाजिक कार्यात उतरलेल्या निशा मिरचंदानी यांनी वेळोवेळी भारतात जाऊन बाबांच्या आणि आमटे कुटुंबाच्या सहवासात बराच काळ घालवला. त्याचेच फलित म्हणजे हे पुस्तक.

पुस्तकाचे प्रकाशन करताना लेखिका आणि डॉ. प्रकाश.


त्यानंतर आमटे कुटुंबावर केलेला माहितीपट दाखवण्यात आला कारण मुळात मितभाषी असलेल्या या दांपत्याला स्वतःविषयी बोलायला लावणे कठिणच आहे असे लेखिकेने सांगितले आणि त्याची प्रचितीही आली.

इतके मोठे काम करत असुनही अहंकाराचा लवलेश नाही. नवरा बायकोत इतके सामंजस्य की शब्दांचीही गरज पडू नये. व्यक्ति कोण आणि छाया कोण हे कळू नये इतकी एकरूपता.





छायाचित्रे नवर्‍याच्या सौजन्याने.